Posts

(श्रीअरविंद यांना त्यांच्या शिष्याने एक प्रश्न विचारला, त्याला श्रीअरविंद यांनी जे उत्तर दिले आहे ते उद्बोधक आहे.)

चंपकलाल : काही दिवसांपूर्वी मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला असे दिसले की, मी ज्या मार्गाने चाललो होतो तो मार्ग खूप लांबचा आणि खडतर होता. त्या मार्गाला अनेक फाटे फुटले होते आणि त्यामुळे मी गोंधळून गेलो होतो. खूप प्रयत्न करूनदेखील मला माझा मार्ग सापडत नव्हता. शेवटी मी वर पाहिले. मला तेथे खूप उंचावर श्रीमाताजी दिसल्या. त्यांनी तेथून माझ्याकडे एक दोरी पाठविली. कालांतराने माझ्या असे लक्षात आले की, ती दोरी नाही तर ऊर्ध्व दिशेने थेट जाणारा एक धवलशुभ्र, तेजोमय प्रकाश आहे. तेव्हा मला जाणीव झाली की, इकडे तिकडे धडपड करत बसण्यापेक्षा मी सरळ वरच पाहायला हवे होते कारण तेथून तो रस्ता सरळ वरच जात होता. या स्वप्नाचा अर्थ काय?

श्रीअरविंद : व्यक्ती उच्चतर चेतनेकडे वळण्यापूर्वी आणि तिने श्रीमाताजींचा धवलशुभ्र प्रकाशाचा मार्ग अनुसरण्यापूर्वी तिची मनाच्या, प्राणाच्या आणि शरीराच्यादवारे जी अवघड अशी धडपड चालू असते त्याचे ते प्रतीक आहे – नंतर मात्र (श्रीमाताजींच्या धवलशुभ्र प्रकाशाकडे वळल्यानंतर) मार्ग सरळ आणि तेजोमय बनतो.

(Champaklal Speaks: 361-362)