Tag Archive for: तत्त्वज्ञान

आत्मसाक्षात्कार – ११

(कालच्या भागात श्रीमाताजींनी शरीराच्या पृथगात्मतेविषयी (individualisation) सांगितले होते. आज आता आपण प्राणाच्या पृथगात्मतेविषयी त्या काय सांगत आहेत ते समजावून घेऊ.)

तुम्ही जर सहजपणे तुमच्या शरीरातून बाहेर पडलात आणि प्राणिक विश्वामध्ये (vital world) प्रवेश केलात तर, (तुमच्यापैकी बहुतेकांना हे जमत नाही कारण बहुधा शरीराप्रमाणेच प्राणिक अस्तित्वदेखील फारसे व्यक्तिविशिष्ट झालेले नसते.) तेथे तुम्हाला सर्व गोष्टींची एकमेकांमध्ये सरमिसळ झालेली आहे आणि त्या गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत, विभागलेल्या आहेत असे आढळेल. तिथे सर्व प्रकारची स्पंदनं, शक्तींचे प्रवाह असतात; ते येत असतात, जात असतात; एक-दुसऱ्याशी भांडत असतात; ते एकमेकांना नष्ट करू पाहत असतात, एक दुसऱ्याचा ताबा घेऊ पाहत असतात; एकमेकांना शोषून घेत असतात आणि परस्परांना बाहेर हाकलून देत असतात… आणि तिथे हे असेच चालत राहते. परंतु या सगळयामधून स्वतःचे खरे व्यक्तिमत्त्व शोधणे हे अतिशय कठीण काम असते.

कारण या सगळ्या गोष्टी म्हणजे विविध शक्ती असतात, गतिविधी असतात, इच्छावासना असतात, स्पंदने असतात. अर्थात तिथे स्वतंत्र व्यक्तित्व, व्यक्तिविशिष्टता, पृथगात्मकता (individualised) लाभलेल्या काही व्यक्तीसुद्धा असतात, व्यक्तिमत्त्वं असतात. परंतु त्या व्यक्ती म्हणजे एक प्रकारच्या शक्ती असतात. ज्यांना त्या प्राणिक विश्वामध्ये असे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व असते ते एकतर शूरवीर असतात किंवा दानव असतात. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 258)

आत्मसाक्षात्कार – १०

(कालच्या भागात आपण स्वतंत्र, पृथगात्म (individualised) व्यक्तित्व म्हणजे काय ते पाहिले. येथे आता श्रीमाताजी शरीराच्या पृथगात्मतेविषयी सांगत आहेत.)

(ईश्वरापासून) विभक्त करणारा अहंकार नाहीसा होण्यासाठी, व्यक्तीला स्वतःचे समग्रतया, पूर्णतया, हातचे काहीही राखून न ठेवता आत्मदान करता आले पाहिजे. आणि असे आत्मदान करण्यासाठी, व्यक्तीची ‘व्यक्ती’ म्हणून घडण झालेली असली पाहिजे. त्यासाठी, ती स्वतंत्र, पृथगात्म (individualized) होणे आवश्यक असते.

तुमचे शरीर जर आत्ता आहे त्याप्रमाणे ताठर, कडक, (rigid) नसते, (आत्ता ते फारच अलवचीक आहे.) समजा, ते तसे नसते आणि (श्रीमाताजी निर्देश करून दाखवितात) तुम्हाला जर अशी सघन त्वचाच नसती तर, काय झाले असते? ज्याप्रमाणे तुम्ही प्राणिक व मानसिक क्षेत्रामध्ये असता (म्हणजे स्वतंत्र अस्तित्व नसलेले आणि एकमेकांमध्ये मिसळलेले असे) जर तुम्ही शरीराने असता, म्हणजे प्राणिक व मानसिक क्षेत्रामधील तुमच्या अस्तित्वाचे केवळ प्रतिबिंबच म्हणता येईल असे जर तुम्ही (शरीराने) बाह्यतःदेखील असता तर काय झाले असते? तसे असते तर, तुमची अवस्था एखाद्या जेलीफिशपेक्षासुद्धा वाईट झाली असती. प्रत्येक गोष्टच दुसऱ्या प्रत्येक गोष्टीत मिसळत राहिली असती, विरघळत राहिली असती… आणि मग केवढा मोठा गोंधळ उडाला असता बघा! आणि म्हणून सुरुवातीला असा अगदी जड, कठीण, सघन देहाकार असण्याची आवश्यकता होती.

आता मात्र आपण त्याच्याबद्दल तक्रार करत राहतो. आपण म्हणतो, “हे शरीर किती बद्ध, जखडबंद आहे. किती त्रासदायक आहे हे! ते घडणसुलभ नाही, ते लवचीक नाही. ईश्वरामध्ये विलीन होण्यासाठी लागणारी तरलता, प्रवाहीपणा त्याच्यामध्ये नाही.”

परंतु शरीर तसेच असणे आवश्यक होते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 257-258)

आत्मसाक्षात्कार – ०९

(व्यक्तीचे जेव्हा स्वतंत्र, पृथगात्म (individualised) व्यक्तित्व निर्माण झालेले नसते तेव्हा तिची अवस्था कशी असते हे आपण कालच्या भागात पाहिले. येथे आता श्रीमाताजी पृथगात्म अस्तित्व (individualised being) म्हणजे काय ते समजावून सांगत आहेत.)

व्यक्तीला एखाद्या दिवशी अमुक एक गोष्ट हवी असते तर दुसऱ्याच दिवशी दुसरेच काहीतरी हवे असते. व्यक्ती एका क्षणी या बाजूला तर दुसऱ्याच क्षणी दुसऱ्या बाजूला ढकलल्यासारखी होत असते. आत्ता व्यक्ती आकाशाकडे पाहत असते (आशावादी असते) तर दुसऱ्या क्षणी जणू ती खाली खोलवर कोठेतरी एका खड्ड्यात जाऊन पडलेली असते (निराशेच्या गर्तेत पडलेली असते). व्यक्तीचे अस्तित्व अशा प्रकारचे असते.

सर्वप्रथम व्यक्तीची सचेत, व्यवस्थित घडण झालेली असली पाहिजे, व्यक्तीला स्वत:चे स्वतंत्र असे, पृथगात्म अस्तित्व असले पाहिजे. असे अस्तित्व की, जे स्वतःमध्ये राहून स्वतःचे जीवन स्वतंत्रपणे जगू शकेल, कोणत्याही बाह्य परिस्थितीमध्ये ते अस्तित्व स्वतंत्र राहू शकेल. म्हणजे असे की, त्याने काहीही ऐकले, काहीही वाचले, काहीही पाहिले तरी त्यामुळे ते अस्तित्व विचलित होता कामा नये. व्यक्तीला बाहेरून जे स्वीकारायचे आहे तेच ती स्वीकारते; तिच्या नियोजनामध्ये जे बसत नाही अशा सर्व गोष्टींना अशी व्यक्ती आपोआपच नकार देते. आपण अमुक एका गोष्टीचा प्रभाव स्वीकारायचा असे व्यक्ती स्वत:हून ठरवीत नाही तोपर्यंत, तिच्यावर कोणत्याच गोष्टीचा ठसा उमटू शकणार नाही. असे जेव्हा घडून येते तेव्हा, व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र बनायला लागते; तिला व्यक्तिविशिष्टता, पृथगात्मकता (individuality) लाभायला सुरुवात होते. आणि व्यक्तीला जेव्हा अशी व्यक्तिविशिष्टता लाभते तेव्हाच ती त्याचे अर्पण करू शकते. कारण, स्वतःकडेच काही नसेल तर ती व्यक्ती देणार तरी काय आणि कशी? त्यामुळे प्रथम व्यक्तीची, ‘व्यक्ती’ म्हणून घडण झाली पाहिजे त्यानंतरच ती आत्मदान करू शकेल. जोपर्यंत व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म अस्तित्वच तयार होत नाही, तोपर्यंत ती काहीच अर्पण करू शकत नाही. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 257)

आत्मसाक्षात्कार – ०८

(‘ईश्वरामध्ये आपला अहंकार विलीन करायचा असेल तर, तो कसा करावा, असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे. त्यावर श्रीमाताजींनी खूप विस्तृत उत्तर दिले आहे.

अहंकार विलीन करण्यापूर्वी आधी व्यक्तीचे स्वत:चे स्वतंत्र असे व्यक्तित्व, एक पृथगात्म व्यक्तित्व, (individualised) निर्माण व्हावे लागते, व्यक्तीचे असे स्वतंत्र व्यक्तित्व नसते तेव्हा तिची अवस्था कशी असते, त्याची आवश्यकता का असते; इत्यादी सर्व गोष्टी श्रीमाताजी येथे तपशिलवार सांगत आहेत. हा भाग विस्तृत असल्याने तो क्रमश: देत आहोत. पण नंतर हे सर्व भाग एकत्रितपणे वाचल्यास सर्व विषय अधिक नेमकेपणाने लक्षात येईल, हे येथे नमूद करावेसे वाटते.)

श्रीमाताजी : ‘ईश्वरा’मध्ये व्यक्तीने आपला अहंकार कसा विलीन करायचा, असे तुम्हाला विचारायचे आहे का? अहंकार विलीन करायचा असेल तर, त्यासाठी व्यक्ती आधी, पूर्णपणे स्वतंत्र, पृथगात्म (individualised) झाली पाहिजे. अन्यथा, अहंकाराचे ईश्वरामध्ये विलीनीकरण करणे शक्य होणार नाही. पूर्णपणे पृथगात्म होणे म्हणजे काय? आणि बाहेरच्या सर्व प्रभावांना प्रतिकार करण्याची क्षमता असणे म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत आहे का?

काही दिवसांपूर्वी मला एक पत्र आले होते. त्यात त्या पत्रलेखकाने लिहिले होते की, (आध्यात्मिक ग्रंथांव्यतिरिक्त) सामान्य साहित्य उदा. कादंबऱ्या, नाटके इ. पुस्तके वाचण्याबाबत तो जरा नाखूष असतो. कारण त्या पुस्तकामध्ये ज्या व्यक्तिरेखा रंगविलेल्या असतात त्यांचे प्रभाव ग्रहण करण्याची आणि त्या व्यक्तिरेखांच्या भावना, त्यांचे विचार यानुसार, आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे जगायला सुरुवात करण्याची न टाळता येण्याजोगी एक प्रवृत्ती त्याच्या प्रकृतीमध्ये आहे.

तुम्हाला कल्पना नाहीये, पण तुम्हाला वाटते त्यापेक्षा अनेक जणं या पत्रलेखकासारखी असतात. अशा व्यक्ती जेव्हा एखादे पुस्तक वाचतात तेव्हा ते वाचताना, स्वत:मध्ये तशा प्रकारच्या (पुस्तकात वर्णन केल्यासारख्या) भावना, विचार, इच्छा, हेतू, वेगवेगळ्या योजना त्यांना जाणवू लागतात; इतकेच काय पण त्या पुस्तकामध्ये वर्णन करण्यात आलेले आदर्शसुद्धा अशा व्यक्ती मानू लागतात. ते जणूकाही त्या पुस्तकाच्या वाचनात वाहवत जातात. आणि त्याची त्यांना जाणीवसुद्धा नसते, कारण अशा व्यक्तींचा नव्याण्णव टक्के स्वभाव हा जणू मऊ लोण्याने बनलेला असतो. त्याच्यावर अंगठ्याने थोडा जरी दाब दिला तर, त्याच्यावर त्या अंगठ्याचा ठसा उमटतो.

आणि (त्यांच्या बाबतीत) प्रत्येक गोष्टच ही त्या ‘अंगठ्या’सारखी असते. म्हणजे एखादा अभिव्यक्त झालेला विचार असेल, एखादे वाचलेले वाक्य असेल, एखादी पाहिलेली वस्तू असेल किंवा दुसरी एखादी व्यक्ती काय करत आहे याचे निरीक्षण करणे असेल किंवा शेजाऱ्याच्या इच्छेचे निरीक्षण करणे असेल, अशा साऱ्या गोष्टीच जणू त्या ‘अंगठ्यासारख्या’ ठसा उमटविणाऱ्या असतात. आणि मग व्यक्ती जेव्हा त्यांच्याकडे पाहते तेव्हा त्या साऱ्या इच्छा तिथेच (व्यक्तीच्या आतमध्येच) असतात, एकमेकांमध्ये अगदी मिसळून गेलेल्या असतात, (श्रीमाताजी हाताची बोटे एकमेकांत गुंफून दाखवितात) त्यातील प्रत्येक इच्छाच दुसऱ्या इच्छेवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत असते आणि परिणामतः अंतरंगामध्ये आणि बाहेर एक प्रकारचा सततचा झगडा चालू असतो. जणू विद्युतप्रवाह बाहेर पडावा तसा तो माणसांमधून बाहेर पडत असतो आणि आत जात असतो; आले लक्षात?

व्यक्तीला या सगळ्याची जाणीवदेखील नसते. त्या सर्वच इच्छा स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांचा परस्परांमध्ये अखंड झगडा चालू असतो आणि त्यामध्ये जी इच्छा सर्वात प्रबळ असते, ती यशस्वी होते. परंतु या इच्छा अनेकविध असल्याने आणि त्या सगळ्यांशी व्यक्तीला एकाकी झुंज द्यावी लागत असल्याने, हा झगडा सोपा नसतो. त्यामुळे समुद्राच्या लाटांवर एखादा लाकडाचा तुकडा जसा खालीवर हेलकावे खात असतो तशी व्यक्तीची अवस्था होते (व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व नसते तेव्हा व्यक्तीची अशी अवस्था असते.)… (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 256-257)

आत्मसाक्षात्कार – ०७

(श्रीमाताजी सांगत आहेत की, व्यक्ती ईश्वर-साक्षात्कारासाठी प्रयत्न करू लागली की, आत्मदान करण्याऐवजी सहसा ईश्वरालाच स्वत:कडे ओढू पाहते. आणि त्यामुळेच ती त्यात यशस्वी होत नाही. कारण असे केल्यामुळे व्यक्ती स्वत:च्या अहंमध्येच बंदिस्त होऊन राहते आणि ईश्वर व स्वत:मध्ये एक प्रकारची भिंत उभी करते. यावर उपाय म्हणजे आत्मदान. स्वत:ला शक्य तितके ईश्वराप्रत अर्पण करायला शिका, असे श्रीमाताजींनी सांगितले आहे, त्यावर एका साधकाने पुढील प्रश्न विचारला आहे.)

साधक : ‘ईश्वर’च अस्तित्वात आहे आणि व्यक्तीला स्वत:चे असे काही अस्तित्वच नाही, अशी जाणीव बाळगण्याचा प्रयत्न केला तर, तो अहंकारातून बाहेर पडण्याचा मार्ग असू शकतो का?

श्रीमाताजी : म्हणजे व्यक्तीचे अस्तित्वच नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? अशा रितीने केवळ मनाने विचार करून काही साध्य होईल असे मला वाटत नाही, कारण हा एक प्रकारचा मानसिक प्रयत्न झाला. व्यक्ती अशा प्रकारच्या मानसिक रचना करत राहते आणि त्याद्वारे तिला फारसे काही साध्य होत नाही. अभीप्सेची एक उत्स्फूर्त, उत्कट अशी ज्योत, असे काहीतरी व्यक्तीच्या अंतरंगामध्ये अखंड प्रज्वलित असले पाहिजे…

परंतु (ईश्वर-साक्षात्कार) ही गोष्ट जर केवळ डोक्यामध्येच चालू असेल, म्हणजे ती केवळ मानसिक पातळीवरची असेल तर त्यातून फारसे काहीच साध्य होत नाही.

– श्रीमाताजी (CWM 06 : 138)

आत्मसाक्षात्कार – ०६

बरेचदा असे आढळून येते की, जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या प्राण्यांशी, झाडांशी मैत्री होते. पण केवळ असे एकटे राहिल्यामुळे, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची वा ‘परमसत्या’शी ऐक्य साधून राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते असे मात्र अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला करण्यासारखे इतर काहीच नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित ते सोपे असेलही पण मला ते काही तितकेसे पटत नाही.

व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत काही ना काही उद्योग शोधून काढू शकते. मला माझ्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींचे दमन करण्यात यशस्वी होते; ‘ईश्वरी कृपे’द्वारे व्यक्तीला ज्या कोणत्या परिस्थितीत ठेवण्यात आलेले असते ती परिस्थिती तशीच असतानादेखील, जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील चिरंतन ‘उपस्थिती’सोबत एकांतात राहण्यात यशस्वी होते; अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खरा, अधिक गहन व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा काही त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. तो आकर्षक नक्कीच आहे. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते; ते म्हणतात, “झाडाखाली अगदी एकांतात, एकटे बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे, बोलण्याची वा कृतीची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल!” त्यांना हे असे वाटते याचे कारण त्या दिशेने त्यांच्या विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते.

ज्या ध्यानामध्ये एकाएकी तुमचे अनुसंधान साधले जाते ते ध्यान सर्वोत्तम असते. अशावेळी एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याव्यतिरिक्त तुम्ही काही करूच शकत नाही, इतकी त्या क्षणी ध्यानाला बसण्याची अनिवार्य निकड तुम्हाला जाणवत असते. आणि त्यासाठी अरण्यामध्ये एकांतवासात जाण्याची गरज नसते; जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ‘ईश्वरी कृपा’ तुमच्यासोबत असते, तेव्हा हे घडून येते.

मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा थोडा टप्पा गाठलेला आहे आणि आता जीवनामध्ये राहूनच खरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या बाह्य परिस्थितीत असतानादेखील, त्या ‘चिरंतन’, ‘अनंत’ अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहारांमध्ये व्यग्र असतानादेखील, त्यांपासून मुक्त होऊन, त्या ‘परमेश्वरा’ला आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच खरा विजय!

– श्रीमाताजी (CWM 03 : 276)

आत्मसाक्षात्कार – ०५

साधक : पूर्णयोगामध्ये ‘साक्षात्कारा’चे स्वरूप काय असते?

श्रीअरविंद : या योगामध्ये आपण सत्य-चेतना’ (Truth-consciousness) समग्र अस्तित्वामध्ये उतरवू इच्छित आहोत. अस्तित्वाचा कोणताही भाग त्याविना रिक्त राहता कामा नये. हे कार्य स्वयमेव ‘उच्चतर शक्ती’द्वारेच केले जाऊ शकते. मग तुम्ही काय करणे आवश्यक असते? तर, तुम्ही स्वतःला तिच्याप्रत खुले करायचे असते.

साधक : उच्चतर शक्तीच जर कार्य करणार असेल तर मग ती सर्व माणसांमध्येच ते का करत नाही?

श्रीअरविंद : कारण, सद्यस्थितीत, मनुष्य त्याच्या मनोमय अस्तित्वामध्ये, त्याच्या प्राणिक प्रकृतीमध्ये आणि त्याच्या शारीर-चेतनेमध्ये आणि त्यांच्या मर्यादांमध्ये बंदिस्त आहे. तुम्ही स्वतःला खुले केले पाहिजे. खुले करणे (an opening) म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, ऊर्ध्वस्थित असणारी ‘शक्ती’ खाली अवतरित व्हावी म्हणून हृदयामध्ये अभीप्सा (Aspiration) बाळगली पाहिजे आणि ‘मना’मध्ये किंवा ‘मना’च्या वर असणाऱ्या पातळ्यांमध्ये त्या शक्तीप्रत खुले होण्याची इच्छा बाळगली पाहिजे.

उच्चतर शक्ती कार्य करू लागल्यावर प्रथम ती अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये शांती प्रस्थापित करते आणि ऊर्ध्वमुख खुलेपणा आणते. ही शांती म्हणजे केवळ मानसिक शांती नसते तर, ती शक्तीने ओतप्रोत भरलेली असते आणि त्यामुळे अस्तित्वामध्ये कोणतीही क्रिया घडली तरी समता, समत्व हा तिचा पाया असतो आणि शांती व समता कधीही विचलित होत नाहीत. ऊर्ध्वदिशेकडून शांती, शक्ती व हर्ष या गोष्टी अवतरित होतात. त्याचबरोबरीने उच्चतर शक्ती, आपल्या प्रकृतीच्या विविध भागांमध्ये परिवर्तन घडवून आणते, जेणेकरून हे भाग उच्चतर शक्तीचा दबाव सहन करू शकतील.

टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये ज्ञानदेखील विकसित व्हायला लागते आणि ते आपल्या अस्तित्वामधील कोणत्या गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी जपून ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याला दाखवून देते. खरंतर, ज्ञान आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्रितपणे येतात. आणि त्यासाठी तुम्ही त्या मार्गदर्शनाला सातत्याने संमती देणे आवश्यक असते. एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूने होणारी प्रगती काहीशी अधिक होत आहे, असे असू शकते. परंतु काहीही असले तरी, उच्चतर शक्तीच कार्य करत असते. बाकी सर्व गोष्टी या अनुभव आणि शक्तीच्या गतिविधीशी संबंधित असतात.

– श्रीअरविंद (Evening talks with Sri Aurobindo : 34-35)

आत्मसाक्षात्कार – ०४

साधक : माताजी, ‘ईश्वराचा साक्षात्कार होणे’ याचा नेमका काय अर्थ आहे ?

श्रीमाताजी : स्वत:च्या अंतरंगात असणाऱ्या किंवा आध्यात्मिक शिखरावर असणाऱ्या ‘ईश्वरी उपस्थिती’बाबत सजग होणे, सचेत होणे आणि एकदा का तुम्ही त्या ईश्वरी उपस्थितीबाबत सचेत झालात की, ईश्वराच्या इच्छेव्यतिरिक्त, तुमची स्वतःची अशी कोणतीही स्वतंत्र इच्छा शिल्लक राहणार नाही, इतक्या पूर्णपणे त्याला समर्पित होणे आणि अंतिमतः स्वत:ची चेतना ही त्याच्या चेतनेशी एकरूप करणे, याला म्हणतात ‘ईश्वराचा साक्षात्कार’!

*

‘ईश्वराचा साक्षात्कार’ होणे अशक्य आहे असा या जगात कोणीही नाही. मात्र काही जणांना त्यासाठी अनेक जन्म लागतील, तर काहीजण अगदी याच जन्मामध्ये तो साध्य करून घेऊ शकतील. हा इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. इथे निवड तुम्ही करायची असते. पण मी हे निश्चितपणे सांगेन की, सद्यकालीन परिस्थिती त्यासाठी विशेष अनुकूल आहे.

– श्रीमाताजी (CWM 16 : 409-410)

आत्मसाक्षात्कार – ०३

अधिक गहन व आध्यात्मिक अर्थाने सांगायचे झाले तर, ज्या गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे ती गोष्ट, जेव्हा इतर कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षाही अधिक वास्तव व गतिशील आणि चेतनेच्या दृष्टीने अधिक निकट असल्याचे जाणवते, तेव्हा अशा साक्षात्काराला ‘सघन साक्षात्कार’ म्हणतात. अशा प्रकारे वैयक्तिक, सगुण ईश्वराचा (personal Divine) किंवा निर्व्यक्तिक, निर्गुण ब्रह्माचा (impersonal Brahman) किंवा आत्म्याचा (Self) साक्षात्कार हा सहसा, साधनेच्या प्रारंभीच किंवा साधनेच्या पहिल्या काही वर्षांत होत नाही किंवा साधनेला खूप वर्ष झाली तरीही होत नाही. साधनेच्या प्रारंभीच साक्षात्कार होणे ही गोष्ट फारच थोड्या जणांच्या बाबतीत घडते. कोणतीही योगसाधना न करतानासुद्धा, लंडनमध्ये मला आलेल्या अनुभवानंतर, पंधरा वर्षांनी म्हणजे, मी योगसाधनेला सुरुवात केल्यानंतर, पाचव्या वर्षी मला तो अनुभव आला. आणि तो सुद्धा माझ्या दृष्टीने खूप असाधारणरित्या लवकरच आलेला आहे, जणू जलदगती आगगाडीचा वेगच. अर्थात, यापेक्षाही अधिक लवकर काही उपलब्धी घडून आल्या आहेत, यात शंका नाही.

पण इतक्या लवकर त्याची अपेक्षा बाळगणे आणि त्याची मागणी करणे आणि अनुभव आला नाही म्हणून हताश होणे आणि युगामध्ये दोन तीन व्यक्तींचा अपवाद वगळता, इतरांना हा योग करता येणे अशक्य आहे असे म्हणणे, ही गोष्ट एखाद्या अनुभवी योग्याच्या किंवा साधकाच्या दृष्टीने पाहता, उतावळ्या आणि विकृत अधीरतेमध्ये गणली जाईल. बहुतेक जण हेच सांगतील की, पहिल्या काही वर्षांमध्ये धीम्या गतीने प्रगतीची आशा बाळगणे हे चांगले. आणि जेव्हा प्रकृती तयार होते आणि जेव्हा ती पूर्णपणे ईश्वराभिमुख होते, तेव्हाच असे परिपक्व अनुभव येऊ शकतात.

काही जणांच्या बाबतीत तुलनेने अगदी सुरुवातीच्या काळात असतानादेखील, काही पूर्वतयारी करून घेणारे अनुभव अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकतात, पण तेथेही चेतनयुक्त प्रयत्न करावेच लागतात, त्यापासून त्यांची सुटका नसते; या प्रयत्नांमुळे मग पुढे, अशा अनुभवांची, चिरस्थायी आणि परिपूर्ण अशा साक्षात्कारामध्ये परिणती होते…

वास्तविक, जी माणसं कृतज्ञ असतात, आनंदी असतात; आवश्यकता पडली तर, अगदी छोटी छोटी पावले का असेनात, पण एकेक पाऊल टाकण्याची ज्यांची तयारी असते, अशी माणसं खरंतर अधिक वेगाने वाटचाल करतात आणि आणि जे प्रत्येक पावलागणिक निराश होतात, कुरकुर करत राहतात अशा अधीर, उतावळ्या लोकांपेक्षा ही माणसं अधिक खात्रीने वाटचाल करतात. मला तरी नेहमी असेच आढळून आले आहे; याला विरोधी अशीही काही उदाहरणे असतील देखील, पण मला एवढेच सांगायचे आहे की, जर तुम्ही ‘आशा, उत्साह आणि श्रद्धा’ कायम बाळगू शकलात तर, अधिक मोठ्या शक्यतेला वाव असेल, इतकेच.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 112)

आत्मसाक्षात्कार – ०२

आपल्यासाठी ‘ईश्वरा’चे तीन पैलू असतात.

१) सर्व वस्तुंच्या व व्यक्तींच्या अंतरंगामध्ये व पाठीमागे असणारे ‘चैतन्य’ आणि ‘विश्वात्मा’ म्हणजे ‘ईश्वर’. ज्याच्यापासून आणि ज्याच्यामध्ये विश्वातील सर्वाचे आविष्करण झाले आहे तो म्हणजे ईश्वर. सद्यस्थितीत हे आविष्करण अज्ञानगत असले तरीसुद्धा ते ईश्वराचेच आविष्करण आहे.

२) आपल्या अंतरंगातील, आपल्या अस्तित्वाचा ‘स्वामी’ व ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. आपण त्याची सेवा केली पाहिजे; आपण आपल्या सर्व वर्तनामधून त्याची इच्छा अभिव्यक्त करायला शिकले पाहिजे, तसे केल्यामुळे आपल्याला अज्ञानामधून प्रकाशाकडे उन्नत होता येईल.

३) परात्पर ‘अस्तित्व’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. तो सर्व आनंद, प्रकाश, दिव्य ज्ञान आणि शक्ती आहे. त्या सर्वोच्च ईश्वरी अस्तित्वाकडे व त्याच्या प्रकाशाकडे आपण उन्नत झाले पाहिजे; तसेच त्याची सत्यता आपण आपल्या चेतनेमध्ये व आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक उतरविली पाहिजे.

सर्वसाधारण जीवनात आपण अज्ञानामध्ये जगत असतो आणि आपल्याला ईश्वर काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती (undivine forces) असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना व अचेतनेचा एक पडदा विणतात आणि त्यामुळे ईश्वर आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ‘ईश्वर’ म्हणजे काय हे जाणते आणि त्यामध्ये जाणिवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर व सखोल चेतनेमध्ये प्रविष्ट व्हायचे असेल तर, आपण कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका करून घेतली पाहिजे आणि दिव्य शक्तीच्या क्रियेसाठी आपण स्वत:ला खुले केले पाहिजे. तसे केल्याने ती दिव्य शक्ती, आपल्या चेतनेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर घडवून आणेल.

ही आहे ‘ईश्वरा’ची, ‘दिव्यत्वा’ची संकल्पना आणि तिच्यापासून आपण प्रारंभ केला पाहिजे. दिव्यत्वाच्या सत्याचा साक्षात्कार, चेतना खुली होण्याने आणि तिच्या परिवर्तनामुळेच होणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)