Tag Archive for: जीवात्मा

साधना, योग आणि रूपांतरण – २१७

चैत्य पुरुष (psychic being) अग्रस्थानी आणा आणि मन, प्राण व शरीरावर त्याची सत्ता चालवीत त्याला तिथे सुस्थिर करा. ज्यामुळे चैत्यपुरुष त्याच्या एकाग्र अभीप्सेची, विश्वासाची, श्रद्धेची आणि समर्पणाची शक्ती त्या तिघांपर्यंत पोहोचवू शकेल. आणि प्रकृतीमधील अनुचित असे जे काही आहे, जे ‘प्रकाश’ आणि ‘सत्य’ यांपासून दूर जाऊन, अहं व प्रमादाकडे वळले आहे त्याचा थेट आणि तात्काळ बोध तो चैत्यपुरुष मन, प्राण व शरीराला करून देऊ शकेल.

सर्व प्रकारचे अहंकार काढून टाका; तुमच्या चेतनेच्या प्रत्येक गतिविधीमधून ते अहंकार काढून टाका. वैश्विक चेतनेचा विकास करा. अहं-केंद्रित दृष्टिकोन विशालतेत, निर्व्यक्तिकतेत (impersonality), वैश्विक ‘ईश्वरा’च्या जाणिवेत, वैश्विक शक्तींच्या बोधात, वैश्विक आविष्काराच्या, (ईश्वरी) लीलेच्या आकलनात आणि साक्षात्कारात लीन होऊ द्या.

जीवात्मा हा ‘ईश्वरी’ अंश असतो, ‘जगन्माते’पासून त्याची उत्त्पत्ती झालेली असते आणि तो आविष्करणाचे साधन असतो. (तुमच्या) अहंने ज्याची जागा घेतली आहे तो जीवात्मा शोधून काढा. ‘ईश्वरा’चा अंश असल्याची आणि त्याचे एक साधन असल्याची जाणीव ही सर्व अभिमानांपासून, अहंच्या जाणिवेपासून किंवा त्याच्या हक्कापासून, श्रेष्ठतेच्या आग्रहीपणापासून, मागणी वा इच्छावासानांपासून मुक्त असली पाहिजे. कारण हे सर्व घटक जर तिथे असतील तर, ती खरी गोष्ट नाही असे समजावे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 333)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१६)

चेतनेच्या दोन अवस्था असतात; त्यांपैकी कोणत्याही एका अवस्थेमध्ये व्यक्ती जीवन जगू शकते. एक अवस्था असते ती म्हणजे जीवनलीलेच्या वर राहून तिला नियंत्रित करणारी ‘उच्चतर चेतना’. तिला ‘जीवात्मा’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ अशा विविध नावांनी संबोधण्यात येते. दुसरी अवस्था असते ती म्हणजे, माणसं ज्या चेतनेमध्ये जगत असतात ती ‘सामान्य चेतना.’ ही चेतना काहीशी वरवरची असते आणि ती जीवनलीलेसाठी ‘आत्म्या’ चे एक साधन म्हणून उपयोगात आणली जाते.

सामान्य चेतनेमध्ये राहून कृती करणारी, जीवन जगणारी माणसं मनाच्या सामान्य आंदोलनांनी संपूर्णपणे संचालित केली जातात आणि ती साहजिकच दुःख, सुख व काळजी, इच्छावासना आणि तत्सम सर्व गोष्टींच्या, म्हणजे ज्या गोष्टींनी हे सर्वसामान्य जीवन बनलेले असते, त्या गोष्टींच्या आधीन असतात. त्यांना मानसिक शांती आणि आनंद मिळू शकतो, पण ती शांती आणि तो आनंद कधीच चिरस्थायी किंवा सुरक्षित असू शकत नाही.

प्रकाश, शांती, शक्ती आणि परमानंद या सर्व गोष्टी म्हणजे ‘आध्यात्मिक चेतना.’ एखादी व्यक्ती जर संपूर्णपणे अशा चेतनेमध्येच राहू शकली तर काही प्रश्नच नाही; स्वाभाविकपणे आणि सुरक्षितपणे या सर्व गोष्टी तिला लाभतात. पण एखादी व्यक्ती अंशत: जरी त्यामध्ये राहू शकली किंवा व्यक्तीने स्वतःला सातत्यपूर्वक त्या चेतनेप्रत खुले ठेवले, तर जीवनातील धक्क्यांमधून सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी पुरेशा प्रमाणात आध्यात्मिक प्रकाश, शांती, सामर्थ्य आणि आनंद या गोष्टी तिला प्राप्त होतात. या आध्यात्मिक चेतनेला खुले झाल्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला काय प्राप्त होणार आहे हे ती व्यक्ती कशाचा शोध घेत आहे, यावर अवलंबून असते; व्यक्ती जर शांतीच्या शोधात असेल तर तिला शांती लाभते; व्यक्तीला जर प्रकाश वा ज्ञान हवे असेल तर ती महान प्रकाशामध्ये जीवन जगू लागते आणि सामान्य माणसाचे मन मिळवू शकेल त्यापेक्षा कितीतरी अधिक सखोल व अधिक सत्य असे ज्ञान तिला प्राप्त होते. व्यक्ती जर शक्ती वा सामर्थ्य मिळवू इच्छित असेल तर व्यक्तीला आंतरिक जीवनासाठी आध्यात्मिक सामर्थ्य किंवा बाह्य कार्य व कृती यांचे नियमन करणारी ‘योगिक’ शक्ती प्राप्त होते; अशा व्यक्तीला जर आनंद हवा असेल तर, सामान्य मानवी जीवन देऊ शकते अशा हर्ष व आनंदापेक्षा कितीतरी अधिक महान अशा परमानंदामध्ये ती व्यक्ती प्रविष्ट होते.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 440-441)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१०)

केवळ ‘अतिमानव’ बनण्याच्या कल्पनेने या ‘योगा’कडे (पूर्णयोगाकडे) वळणे ही प्राणिक अहंकाराची एक कृती ठरेल आणि ती या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ करेल. जे कोणी त्यांच्या सर्व जीवनव्यवहारामध्ये असे उद्दिष्ट ठेवतात त्यांना निरपवादपणे आध्यात्मिक आणि अन्य प्रकारची दुःखं सहन करावी लागतात. प्रथम विभक्तकारी अहंकार (separative ego) दिव्य चेतनेमध्ये विलीन करून, त्याद्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि दुसरे म्हणजे, मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करण्यासाठी अतिमानसिक चेतना या पृथ्वीवर अवतरित करणे हे या ‘योगा’चे ध्येय आहे. (अहंकार दिव्य चेतनेमध्ये विलीन करत असताना, त्या अनुषंगाने, व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या जीवात्म्याचा (individual self) शोध लागतो; हा जीवात्मा म्हणजे मर्यादित, व्यर्थ आणि स्वार्थी मानवी अहंकार नसतो तर तो ‘ईश्वरा’चा अंश असतो.) बाकी सर्व गोष्टी म्हणजे या दोन ध्येयांचे परिणाम असू शकतात, परंतु त्या या ‘योगा’चे प्राथमिक उद्दिष्ट असू शकत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)