Tag Archive for: काळजी

विचारशलाका १५

‘दिव्य अस्तित्व’ तुमच्या अंतरंगातच असते. ते तुमच्या आतच असते, आणि तुम्ही मात्र त्याचा बाहेर शोध घेत राहता; अंतरंगात डोकावून पाहा. ते तुमच्या आतच आहे. तेथे त्या ‘अस्तित्वा’ची उपस्थिती असते. सामर्थ्य मिळण्यासाठी तुम्हाला इतरांकडून प्रशंसा हवी असते – त्यातून ते सामर्थ्य तुम्हाला कधीही मिळणार नाही. सामर्थ्य तुमच्या अंतरंगातच आहे. तुम्हाला जर ते सामर्थ्य हवे असेल तर, तुम्हाला जे सर्वेाच्च उद्दिष्ट – सर्वोच्च प्रकाश, सर्वोच्च ज्ञान, सर्वोच्च प्रेम – आहे असे वाटते, त्यांविषयी तुम्ही अभीप्सा बाळगू शकता. ते तुमच्या अंतरंगातच आहे – अन्यथा तुम्ही कधीच त्याच्याशी संपर्क साधू शकणार नाही. तुम्ही जर अंतरंगात पुरेसे खोलवर गेलात तर नेहमीच सरळ वर जाणाऱ्या प्रज्वलित ज्योतीप्रमाणे तेथे तुम्हाला ‘त्या’चे अस्तित्व सापडेल.

आणि हे करणे खूप अवघड आहे, असे समजू नका. ते अवघड आहे, असे वाटते कारण तुमची दृष्टी कायम बाह्याकडेच वळलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला ‘त्या’च्या उपस्थितीची जाणीव होत नाही. पण जर आधारासाठी, साहाय्यासाठी तुम्ही बाहेरच्या ऐवजी अंतरंगांत लक्ष केंद्रित केलेत आणि – प्रत्येक क्षणी काय करायला हवे ते जाणण्यासाठी, त्याचा मार्ग जाणण्यासाठी, अंतरंगांमध्ये, सर्वोच्च ज्ञानाकडे – प्रार्थना केलीत; आणि तुम्ही जे काही आहात व तुम्ही जे काही करता, ते सर्व तुम्ही पूर्णत्वप्राप्तीसाठी समर्पित केलेत, तर तुम्हाला तेथेच अंतरंगातच आधार असल्याचे आणि तो तुम्हाला कायमच साहाय्य व मार्गदर्शन करत असल्याचे जाणवेल.

आणि जर कधी अडचण आली तर तिच्याशी दोन हात करण्यापेक्षा; तिला हाताळण्यासाठी – सर्व वाईट इच्छा, सर्व गैरसमजुती आणि सर्व अनिष्ट प्रतिक्रिया यांना हाताळण्यासाठी – तुम्ही त्या अडचणीला सर्वोच्च प्रज्ञेकडे सुपुर्द करा. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात, तर तो आता तुमच्या काळजीचा विषय उरतच नाही : तो त्या ‘परमेश्वरा’चा विषय बनतो, ‘परमेश्वर’ स्वत:च तो हाती घेतो आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे इतर कोणापेक्षाही तोच अधिक चांगल्या रीतीने जाणतो. यातून बाहेर पडण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, केवळ हाच मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 15 : 399-400]

पूर्णयोग आणि बौद्धमत – १६

धम्मपद : स्नेह, प्रेम यामध्ये दुःखाचा उगम होतो, त्यातून भीती उदयाला येते. जो प्रेमापासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याला भीती तरी कशाची?

आसक्तीतून दुःखाचा उमग होतो, त्यातून भीती उदयाला येते. पण जो आसक्तीतून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याने भ्यायचे तरी कशाला?

अभिलाषेमधून दुःखाचा उमग होतो, त्यातून भीती उदयाला येते. पण जो अभिलाषेपासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याने भ्यायचे तरी कशाला?

श्रीमाताजी : मला नेहमीच असे वाटत आले आहे की, ‘जाणते बना’ असे सांगण्यासाठी जी कारणे सर्वसाधारपणे दिली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात. : “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल, तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” ….परंतु ह्यामुळे जाणीव अधिकाधिक निबर बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदना यांना घाबरत असते.

मला वाटते असे सांगितले गेले पाहिजे की, जाणिवेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये आनंद निर्भेळ असतो, प्रकाश छायेविरहित असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात; अशी स्थिती अभीप्सेने आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती ह्या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात; स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वराला सोपविलेले असते.

स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक असा आनंद आहे, की जो शब्दांत व्यक्त करताच येणार नाही. स्वत:बद्दल विचार करीत राहणे, काय करावे आणि काय करू नये याची चिंता बाळगणे, तुमच्यासाठी काय चांगले काय वाईट, कशाला मुरड घालावयाची आणि कशाचा ध्यास घ्यावयाचा, ह्यासारखे विचार सतत करीत बसणे – बापरे ! किती थकविणारे आहे, किती कंटाळवाणे, रटाळ, किती अळणी आहे हे !

त्यापेक्षा सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे जर व्यक्ती त्या परम चेतनेसमोर, परम प्रज्ञेसमोर, परम प्रकाश, परम प्रेमासमोर, स्वत:ला अगदी खुली करू शकली; ज्याला सर्वकाही ज्ञात आहे, जो सारे काही करू शकतो, जो तुमच्या जीवनाचा ताबा घेऊ शकतो अशा परमेश्वरासमोर स्वत:ला अगदी खुली करू शकली, तर मग अशा व्यक्तीला कोणत्याही चिंता, काळज्या भेडसावणार नाहीत, ही आदर्श स्थिती आहे.

पण मग हे असे का केले जात नाही?

कारण व्यक्ती त्याचा विचारच करत नाही, व्यक्ती ते करावयाचे विसरून जाते, जुन्या सवयी परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अचेतनामध्ये किंवा अबोध मनामध्ये आत खोलवर कोठेतरी, एक घातक शंका नकळतपणे घर करून असते, ती कानात कुजबुजते : “बघ हं ! तू जर काळजी घेतली नाहीस तर तुझ्याबाबतीत काहीतरी दुर्घटना घडेल. जर तू स्वत:कडे लक्ष पुरविले नाहीस तर काय घडेल काही सांगता येत नाही.” – आणि तुम्ही एवढे खुळे असता, इतके अंध झालेले असता की, तुम्ही तेच ऐकता आणि तुम्ही स्वत:कडे लक्ष पुरवायला सुरुवात करता आणि मग सगळेच बिघडून जाते.

मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुमच्या पेशींना थोडेसे शहाणपण, थोडेसे सामान्य ज्ञान पुरवावे लागते आणि काळजी करू नका, हे शिकवावे लागते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 255-257)