शिक्षक : माताजी, शिक्षकांनी आणि प्रशिक्षकांनीच विद्यार्थ्यांना शिस्त लावली पाहिजे ना?
श्रीमाताजी : विद्यार्थ्यांना अनियमित, उद्धट किंवा निष्काळजी होण्यापासून रोखणे हे अर्थातच अगदी आवश्यक आहे. दुष्टपणाच्या किंवा हानीकारक खोड्या चालवून घेता कामा नयेत.
परंतु एक सर्वसाधारण व निरपवाद नियम असा असला पाहिजे की, विद्यार्थ्यांकडून ज्या गुणांची आपण अपेक्षा करतो त्या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण शिक्षकांनी आणि त्यातही विशेषतः शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षकांनी झाले पाहिजे. शिस्त, नियमितपणा, चांगले वळण, धैर्य, चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा या गोष्टी उपदेशाद्वारे शिकविण्यापेक्षा उदाहरणाद्वारे अधिक चांगल्या प्रकारे शिकविता येतात. जी गोष्ट करण्यास तुम्ही विद्यार्थ्यांना मनाई करता, ती गोष्ट तर तुम्ही त्यांच्यासमोर कधीच करता कामा नये, हा अगदी महत्त्वाचा नियम आहे.
आणखी असे की, कशाप्रकारे सांगितले असता त्या विद्यार्थ्याला सुयोग्य वळण लागेल यावरचा उपाय विद्यार्थ्यागणिक वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्याला चांगले वळण लावण्याच्या दृष्टीने शिक्षकाने त्याच्याबरोबर चातुर्याने व विवेकाने वागले पाहिजे.
आणि म्हणूनच शिक्षक किंवा प्रशिक्षक होणे ही एक सर्वोत्तम साधना असते. अर्थात ती साधना कशी आचरणात आणायची ते त्या शिक्षकाला माहीत असले पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 12 : 361-362)







