(एका साधकाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे त्यावरून दिव्य प्रकाश स्वीकारण्यासाठी तो सक्षम आहे असे दिसते, असे श्रीअरविंदांनी येथे म्हटले आहे. त्या साधकाला उद्देशून पत्रामध्ये काय मजकूर लिहावा ते श्रीअरविंद साहाय्यकाला सांगत आहेत.)
तुम्ही ‘क्ष’ ला असे सांगू शकता की, योगसाधनेमध्ये मुख्यत्वे करून दोन पायऱ्या असतात. एक असते पूर्वतयारीची पायरी आणि दुसरी पायरी म्हणजे प्रत्यक्ष तीव्र, उत्कट साधना. त्याने पहिल्या पायरीपासून सुरुवात करण्यास हरकत नाही असे त्याला कळवावे.
पहिल्या पायरीवर असताना, हृदयामध्ये प्रार्थनेसह अभीप्सा, भक्ती, ध्यान, जीवन ईश्वरार्पण करण्याचा संकल्प या गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रकृतीचे शुद्धीकरण हे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. आध्यात्मिक अनुभव यावेत यासाठी अति-आतुरता, उतावीळपणा असता कामा नये. मात्र जे अनुभव येतील त्यांचे निरीक्षण केले पाहिजे. योग्य दृष्टिकोनासाठी आणि खऱ्या उन्नतीसाठी जर ते अनुभव उपयोगी पडणारे असतील तर त्यांचा स्वीकार केला पाहिजे. पण ज्यामुळे अहंकार कुरवाळला जाईल किंवा पोसला जाईला अशा सर्व गोष्टींना (जाणीवपूर्वक) नकार दिला पाहिजे.
प्रगती संथगतीने होत असली किंवा मार्गामध्ये अनेक अडचणी आल्या तरीसुद्धा (साधकामध्ये) अधीरता असता कामा नये. त्याने सर्व गोष्टी ‘दिव्य मातेवर’ पूर्ण भरवसा ठेवून आणि स्थिरचित्ताने व धीराने केल्या पाहिजेत. हा कालावधी साधकाच्या क्षमतेची आणि ईश्वराप्रति असलेल्या त्याच्या अभीप्सेच्या प्रामाणिकपणाची कसोटी घेणारा असतो.
– श्रीअरविंद (CWSA 35 : 551)





