आत्मसाक्षात्कार – ०७
(श्रीमाताजी सांगत आहेत की, व्यक्ती ईश्वर-साक्षात्कारासाठी प्रयत्न करू लागली की, आत्मदान करण्याऐवजी सहसा ईश्वरालाच स्वत:कडे ओढू पाहते. आणि त्यामुळेच ती त्यात यशस्वी होत नाही. कारण असे केल्यामुळे व्यक्ती स्वत:च्या अहंमध्येच बंदिस्त होऊन राहते आणि ईश्वर व स्वत:मध्ये एक प्रकारची भिंत उभी करते. यावर उपाय म्हणजे आत्मदान. स्वत:ला शक्य तितके ईश्वराप्रत अर्पण करायला शिका, असे श्रीमाताजींनी सांगितले आहे, त्यावर एका साधकाने पुढील प्रश्न विचारला आहे.)
साधक : ‘ईश्वर’च अस्तित्वात आहे आणि व्यक्तीला स्वत:चे असे काही अस्तित्वच नाही, अशी जाणीव बाळगण्याचा प्रयत्न केला तर, तो अहंकारातून बाहेर पडण्याचा मार्ग असू शकतो का?
श्रीमाताजी : म्हणजे व्यक्तीचे अस्तित्वच नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? अशा रितीने केवळ मनाने विचार करून काही साध्य होईल असे मला वाटत नाही, कारण हा एक प्रकारचा मानसिक प्रयत्न झाला. व्यक्ती अशा प्रकारच्या मानसिक रचना करत राहते आणि त्याद्वारे तिला फारसे काही साध्य होत नाही. अभीप्सेची एक उत्स्फूर्त, उत्कट अशी ज्योत, असे काहीतरी व्यक्तीच्या अंतरंगामध्ये अखंड प्रज्वलित असले पाहिजे…
परंतु (ईश्वर-साक्षात्कार) ही गोष्ट जर केवळ डोक्यामध्येच चालू असेल, म्हणजे ती केवळ मानसिक पातळीवरची असेल तर त्यातून फारसे काहीच साध्य होत नाही.
– श्रीमाताजी (CWM 06 : 138)






