Tag Archive for: आशा

नैराश्यापासून सुटका – ०२

तुम्ही कधीच एकाकी नसता, हे कधीही विसरू नका. ‘ईश्वर’ तुमच्या सोबत असून तो तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे. ‘तो’ असा सोबती आहे की जो कधीच साथसंगत सोडत नाही; ‘तो’ असा मित्र आहे, ज्याचे प्रेम तुम्हाला सामर्थ्यवान बनविते आणि समाधान देते. तुम्हाला जितका जास्त एकाकीपणा जाणवेल, तेवढे तुम्ही त्या ईश्वराच्या तेजोमय उपस्थितीची जाणीव होण्यासाठी अधिक तयार व्हाल. श्रद्धा बाळगा, ‘तो’ तुमच्यासाठी सारेकाही करेल.
*
जेव्हा परिस्थिती वाईटाहून अधिक वाईट होत आहे असे वाटते, तत्क्षणी, आपण श्रद्धेची परमोच्च कृती केली पाहिजे आणि ‘ईश्वरी कृपा’ आपल्याला कधीच अंतर देणार नाही, हे आपण जाणून असले पाहिजे. अरूणोदयापूर्वीच्या घटिका या नेहमीच सर्वाधिक अंधकारमय असतात. स्वातंत्र्य जवळ येण्यापूर्वीची गुलामी ही सर्वात जास्त वेदनादायी असते. परंतु श्रद्धायुक्त अंतःकरणामध्ये आशेची चिरंतन ज्योत तेवत असते आणि ती निराशेला जागाच ठेवत नाही.

– श्रीमाताजी (CWM 14 : 09), (CWM 15 : 177)

अमृतवर्षा १०

 

धीर धरा! उगवता सूर्य दररोज प्रात:काळी आपल्या पहिल्यावहिल्या किरणांच्या द्वारे जी शिकवण, जो संदेश या पृथ्वीतलावर प्रक्षेपित करतो आहे, तो ऐका;  तो आशेचा आणि दिलासादायक संदेश असतो. जे रडत आहेत, जे दु:खभोग सहन करत आहेत, जे भयकंपित झाले आहेत, ज्यांना दु:खवेदनांचा अंतच दिसत नाही असे तुम्ही सारे, धीर धरा!

अशी कोणतीच निशा नाही जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी अरुणोदय होतो. सूर्यप्रकाशाने भेदले जाणार नाही असे कोणतेच धुके नसते आणि त्याच्या उज्ज्वल किरणांनी ज्याची कड सोनेरी होत नाही असा कोणताच मेघ नसतो. असा कोणता अश्रू आहे की जो कधीच सुकणार नाही? असे कोणते तुफान आहे की ज्याच्या शेवटी विजयदर्शक इंद्रधनु सप्त किरणांनी चमकणार नाही? सूर्यप्रकाशाने वितळणार नाही असे बर्फ कुठे आहे का?

– श्रीमाताजी [CWM 02 : 44]

धीर धरा ! उगवता सूर्य दररोज प्रात:काळी आपल्या पहिल्यावहिल्या किरणांच्या द्वारे जी शिकवण, जो संदेश या पृथ्वीतलावर प्रक्षेपित करतो आहे, तो ऐका; तो आशेचा आणि दिलासादायक संदेश आहे. जे रडत आहेत, जे दु:खभोग सहन करत आहेत, जे भयकंपित झाले आहेत, ज्यांना दु:खवेदनांचा अंतच दिसत नाही असे तुम्ही सारे, धीर धरा !

अशी कोणतीच निशा नाही जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी अरुणोदय होतो. सूर्यप्रकाशाने भेदले जाणार नाही असे कोणतेच धुके नसते आणि त्याच्या उज्ज्वल किरणांनी ज्याची कड सोनेरी होत नाही असा कोणताच मेघ नसतो. असा कोणता अश्रू आहे की जो कधीच सुकणार नाही? असे कोणते तुफान आहे की ज्याच्या शेवटी विजयदर्शक इंद्रधनु सप्त किरणांनी चमकणार नाही? सूर्यप्रकाशाने वितळणार नाही असे बर्फ कुठे आहे का?

– श्रीमाताजी
(CWM 02:44)