Tag Archive for: आध्यात्मिक रूपांतरण

 

व्यक्तीला हृदय-केंद्र, आज्ञाचक्र, मस्तकाच्या वरच्या बाजूस असणारे केंद्र या तीनपैकी ज्या केंद्रावर चित्त एकाग्र करणे सर्वाधिक सुकर असते किंवा व्यक्तीला ज्या केंद्रावर लक्ष एकाग्र केले असता, सर्वात जास्त परिणाम साध्य होतो त्या केंद्रावर तिने चित्त एकाग्र करण्यास हरकत नाही.

०१) हृदयचक्रावरील एकाग्रता

हृदय-चक्रावर एकाग्रता केल्यास ती एकाग्रता-शक्ती ते चक्र (heart-centre) खुले करते आणि चैत्य पुरुषाला (psychic being) झाकणारा पडदा ती अभीप्सेच्या, प्रेमाच्या, भक्तीच्या व समर्पणाच्या शक्तीद्वारे दूर करते. ही शक्ती, मन, प्राण व शरीराचे शासन अंतराम्याने किंवा चैत्य पुरुषाने करावे यासाठी त्याला अग्रस्थानी आणते आणि मन, प्राण व शरीराला ती पूर्णपणे ईश्वराभिमुख करते, त्यांना ईश्वराप्रत खुले करते. तसेच त्यांना ईश्वराभिमुख करण्याच्या आणि खुले करण्याच्या आड जे काही येईल ते सर्व त्यांच्यामधून काढून टाकते. पूर्णयोगामध्ये यालाच ‘आंतरात्मिक किंवा चैत्य रूपांतरण’ (psychic transformation) असे संबोधले जाते.

०२) मस्तकाच्या वरच्या बाजूस असलेल्या केंद्रावर एकाग्रता

शांती, निश्चल-नीरवता आणण्यासाठी, शारीर-जाणिवेपासून आणि मन व प्राणाशी असलेल्या एकत्वापासून मुक्ती मिळविण्यासाठी तसेच उच्चतर चेतनेशी मीलन घडण्यासाठी कनिष्ठ चेतनेचा (मानसिक, प्राणिक व शारिरीक चेतना) मार्ग खुला व्हावा आणि ती चेतना ऊर्ध्वगामी व्हावी तसेच उच्चतर चेतनेच्या (आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना) शक्ती या मन, प्राण व शरीरामध्ये अवतरित व्हाव्यात म्हणून मस्तकाच्या वरच्या बाजूस (above the head) असलेल्या केंद्रावर एकाग्रता-शक्ती केंद्रित केली जाते. या गोष्टीला पूर्णयोगामध्ये ‘आध्यात्मिक रूपांतरण’ (spiritual transformation) असे संबोधले जाते.

एखाद्या व्यक्तीने जर या प्रक्रियेपासून आरंभ केला तर, ती ऊर्ध्वस्थित शक्ती अवरोहण (descent) करताना, अगदी सर्वात खाली असलेल्या चक्रापर्यंतची सर्व चक्रं खुली करते आणि चैत्य पुरुषास अग्रस्थानी आणते. मात्र हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत कनिष्ठ चेतनेच्या अडथळ्यास सामोरे जाण्याचा संघर्ष करावा लागण्याची किंवा अडचणींना तोंड द्यावे लागण्याची बरीच शक्यता असते. दिव्य कार्यामध्ये कनिष्ठ चेतनेची भेसळ होण्याची किंवा दिव्य कार्यास ती नकार देण्याची शक्यता असते. मात्र, एकदा चैत्य पुरुष सक्रिय झाला की हा संघर्ष आणि या अडचणी बऱ्याच कमी होण्याची शक्यता असते.

०३) आज्ञाचक्रावरील एकाग्रता

आज्ञाचक्रावर एकाग्रता करणे म्हणजे तेथील चक्र खुले करणे, आंतरिक मन व आंतरिक दृष्टी मुक्त करणे तसेच आंतरिक किंवा योगिक चेतना आणि तिचे अनुभव व तिच्या शक्ती मुक्त करणे. येथूनसुद्धा व्यक्ती ऊर्ध्वमुख होत खुली होऊ शकते आणि निम्नतर स्तरांवर असणाऱ्या चक्रांवर कार्य करू शकते. परंतु, या प्रक्रियेमध्ये व्यक्ती अध्यात्माविषयीच्या स्वतःच्याच मानसिक काल्पनिक रचनांमध्ये बंदिस्त होऊन राहण्याचा धोका असतो. तसे झाले तर, ती त्यातून बाहेर पडून, समग्र आध्यात्मिक अनुभूतीच्या आणि ज्ञानाच्या मोकळ्या वातावरणात न येण्याचा आणि परिणामतः अस्तित्वामध्ये व प्रकृतीमध्ये समग्र परिवर्तन न होण्याचा धोका संभवतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 307)

साधना, योग आणि रूपांतरण – २१६

चैत्य पुरुष (psychic being) हा हृदयकेंद्राच्या मागे स्थित राहून मन, प्राण आणि शरीराला आधार पुरवत असतो. चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणामध्ये (psychic transformation) तीन मुख्य घटक असतात.
१) निगूढ अशा आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीराच्या खुलेपणामुळे (opening), पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे असलेल्या साऱ्याची व्यक्तीला जाणीव होते.
२) चैत्य पुरुषाच्या किंवा आत्म्याच्या खुलेपणामुळे, चैत्य पुरुष अग्रस्थानी येऊन मन, प्राण आणि शरीर यांचे शासन करतो आणि त्यांना ‘ईश्वरा’कडे वळवितो.
३) समग्र कनिष्ठ अस्तित्व आध्यात्मिक सत्याप्रत उन्मुख होते, या शेवटच्या गोष्टीला परिवर्तनाचा आंतर-आध्यात्मिक भाग (The psycho-spiritual part) असे म्हणता येईल.

आंतरात्मिक रूपांतरण हे व्यक्तीला तिच्या व्यक्तिगततेच्या अतीत, वैश्विकतेमध्ये घेऊन जाऊ शकते. एवढेच काय पण, गुह्य (occult) उन्मुखतासुद्धा वैश्विक मन, वैश्विक प्राण आणि वैश्विक जडभौतिकाशी व्यक्तीचा संबंध प्रस्थापित करते. अंतरात्म्याला सर्व जीवनाशी, सृष्टीशी (all existence) असलेल्या संपर्काची जाणीव असते. त्याला ‘आत्म्या’ची एकात्मता सर्वत्र अनुभवास येते, त्याला वैश्विक प्रेम आणि इतर साक्षात्कारांची प्रचिती येते आणि ती त्या अंतरात्म्यास वैश्विक चेतनेकडे घेऊन जाते.

परंतु हा सर्व ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आध्यात्मिकतेस उन्मुख झाल्याचा परिणाम असतो. आणि तो परिणाम मन, प्राण व शरीरामध्ये आध्यात्मिक प्रकाशाचे आणि सत्याचे प्रतिबिंब पडल्यामुळे किंवा त्या प्रकाशाचा आणि सत्याचा मन, प्राण व शरीरामध्ये अंतःप्रवेश झाल्यामुळे घडून येतो. जेव्हा व्यक्ती मनाच्या पलीकडे चढून जाते आणि तेथे राहून, वरून सर्वांचा कारभार चालवू लागते तेव्हा मूलभूत आध्यात्मिक रूपांतरणास (spiritual transformation) सुरुवात होते किंवा ते रूपांतरण शक्य होते.

आंतरात्मिक रूपांतरणामध्येसुद्धा व्यक्ती एक प्रकारे मन, प्राण आणि शरीर यांच्या अतीत जाऊ शकते आणि परत येऊ शकते परंतु शिखरस्थानी असलेल्या चेतनेमध्ये म्हणजे जेथे ‘अधिमानसा’चे स्थान असते तेथे, मानवी मनाच्या वर असणाऱ्या इतर स्तरांमध्ये, व्यक्ती अजूनपर्यंत स्थित झालेली नसते. जेव्हा सृष्टीच्या दोन गोलार्धांमध्ये असणारे किंवा कनिष्ठ आणि ऊर्ध्व गोलार्ध यांच्यामध्ये असणारे झाकण, आच्छादन दूर केले जाते आणि ‘अधिमानसा’च्या ऐवजी ‘अतिमानस’ जेव्हा सृष्टीची चालकशक्ती बनते तेव्हा अतिमानसिक रूपांतरण (supramental transformation) घडून येणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 332-333)

साधना, योग आणि रूपांतरण – २१५

स्थितप्रज्ञ असणे याचा अर्थ व्यक्तीचे केवळ विचारी मन (thinking mind) आत्म-साक्षात्कारामधील आध्यात्मिक चेतनेमध्ये सुस्थिर असणे असा होतो. त्यामुळे प्रकृतीच्या अन्य घटकांचे ‘रूपांतरण’ होईलच असे काही आवश्यक नाही. उच्चतर चेतनेचा ‘प्रकाश’ आणि तिची ‘शक्ती’ खाली उतरविणे; चैत्य अस्तित्व (psychic) आणि मन, प्राण व शरीराची केंद्र खुली होणे; आंतरात्मिक आणि उच्चतर चेतनेच्या कार्याला प्रकृतीने संमती देणे आणि तिच्याप्रत स्वीकारशील रीतीने खुले होणे; आणि सरतेशेवटी प्रकृतीने अतिमानसाप्रत खुले होणे, या साऱ्या ‘रूपांतरणा’साठी आवश्यक असणाऱ्या अटी असतात.

उच्चतर चेतना (higher consciousness) ही अशी एक गोष्ट असते की जी मनुष्याच्या मन, प्राण आणि शरीर यांच्या ऊर्ध्वस्थित असते. ती संपूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाची असते. ती प्राप्त करून घेणे याचा अर्थ एवढाच की, व्यक्ती तेथे इच्छेनुसार जाण्यास सक्षम असते किंवा व्यक्ती तिच्या चेतनेच्या कोणत्यातरी एखाद्या घटकानिशी तेथे निवास करू शकते आणि त्या दरम्यान तिचे इतर घटक मात्र जुन्या पद्धतीनेच कार्यरत असतात. समग्र अस्तित्व जेव्हा अंतरात्म्याच्या साच्यामध्ये ओतले जाते (remoulded) तेव्हा ‘आंतरात्मिक रूपांतरण’ (psychic transformation) घडून येते. समग्र अस्तित्वाचे जेव्हा आध्यात्मिकीकरण केले जाते तेव्हा ‘आध्यात्मिक रूपांतरण’ (spiritual transformation) घडून येते. आणि समग्र अस्तित्वाचे जेव्हा अतिमानसिकीकरण केले जाते तेव्हा ‘अतिमानसिक रूपांतरण’ (supramental transformation) घडून येते. व्यक्ती केवळ उच्चतर चेतनेविषयी जागरूक झाली किंवा सामान्य मर्यादित अर्थाने व्यक्तीने ती उच्चतर चेतना प्राप्त करून घेतली म्हणून या सर्व गोष्टी, आपोआप घडून येतात, असे होत नाही.

अर्थात शरीर हे त्याचे अधिष्ठान असते. शरीर, प्राण आणि मन व त्याच्या उच्चतर पातळ्या या सर्वांचा समावेश कनिष्ठ गोलार्धामध्ये होतो. आत्म-सुसूत्रीकरणाचे (self-formulation) साधन असणारे ‘अतिमानस’ (Supermind) आणि ‘दिव्य’ सत्-चित्-आनंद यांचा समावेश ऊर्ध्व गोलार्धामध्ये होतो. कनिष्ठ आणि ऊर्ध्व या दोन गोलार्धाच्या मधोमध ‘अधिमानस’ (Overmind) असते. ‘अधिमानस’ हे कनिष्ठ गोलार्धाच्या शिखरस्थानी असते. अधिमानस हा या दोन्ही गोलार्धातील मध्यावधी किंवा संक्रमणकारी स्तर असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 331-332)

साधना, योग आणि रूपांतरण – २१३

‘दिव्य चेतने’च्या विविध अवस्था असतात. त्याचप्रमाणे रूपांतरणाच्या देखील विविध अवस्था असतात.

प्रथम असते ते आंतरात्मिक रूपांतरण (psychic transformation). यामध्ये सर्व गोष्टी ‘ईश्वरा’शी आंतरात्मिक चेतनेच्या माध्यमातून संपर्कात असतात.

नंतर असते ते आध्यात्मिक रूपांतरण (spiritual transformation). यामध्ये सर्व गोष्टी वैश्विक चेतनेमधील ‘ईश्वरा’मध्ये विलीन होतात.

तिसरे असते ते अतिमानसिक रूपांतरण (supramental transformation). यामध्ये सर्व गोष्टींचे दिव्य विज्ञानमय चेतनेमध्ये अतिमानसिकीकरण होते.

या अंतिम रूपांतरणाबरोबर मन, प्राण आणि शरीर यांचे संपूर्ण रूपांतरण (संपूर्णपणाच्या माझ्या संकल्पनेनुसार) होण्यास सुरुवात होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 414)