Tag Archive for: आत्म-उन्मुखता

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०९

प्रकाश, शांती, आनंद इ. गोष्टी सोबत घेऊन येणाऱ्या ‘दिव्य शक्ती’ला व्यक्तीने स्वत:मध्ये प्रवाहित होऊ देणे आणि तिला रूपांतरणाचे कार्य करू देणे, हे आत्म-उन्मुखतेचे (self-opening) उद्दिष्ट असते. अशा रितीने, व्यक्ती जेव्हा दिव्य शक्तीचे ग्रहण करते आणि ती शक्ती त्या व्यक्तीमध्ये कार्य करते आणि जेव्हा त्या कार्याचे परिणाम दिसू लागतात (भलेही मग, त्या व्यक्तीला त्या प्रक्रियेची जाणीव असो किंवा नसो) तेव्हा ती व्यक्ती खुली (open) आहे, असे म्हटले जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०८

पूर्णयोगाच्या साधनेमध्ये, कोणतीही एकच एक अशी ठरावीक साचेबंद मानसिक शिकवण नसते किंवा ध्यानधारणेचे कोणते नेमून दिलेले प्रकार किंवा कोणत्या मंत्र-तंत्रादी गोष्टीदेखील नसतात.

तर अभीप्सेद्वारे आणि अंतर्मुख व ऊर्ध्वमुख अशा आत्म-एकाग्रतेद्वारे, आणि आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शक्ती’प्रत व तिच्या कार्याप्रत, तिच्या ‘दिव्य प्रभावा’प्रत स्वतःला उन्मुख केल्यामुळे, तसेच हृदयामध्ये असणाऱ्या ‘दिव्य अस्तित्वा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे ही साधना घडत जाते. तसेच या सर्वांना विरोधी असणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणेही या साधनेमध्ये अभिप्रेत असते.

श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांद्वारेच केवळ ही आत्म-उन्मुखता (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 20)

साधना, योग आणि रूपांतरण – १८०

श्रीअरविंद-आश्रमामध्ये जो योगमार्ग आचरला जातो त्या पूर्णयोगाचे इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानमय विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हेच केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे; या इहलोकामध्ये ‘ईश्वरा’चे आविष्करण घडविणे आणि ‘जडभौतिका’मध्ये दिव्य जीवन निर्माण करणे, हे पूर्णयोगाचे ध्येय आहे. हे ध्येय अत्यंत कठीण आहे आणि हा योगमार्गही अत्यंत कठीण आहे; बऱ्याच जणांना किंबहुना, बहुतेकांना तर तो अशक्यप्रायच वाटतो.

सर्वसाधारण अज्ञानमय विश्व-चेतनेच्या साऱ्या प्रस्थापित शक्ती या ध्येयाच्या विरोधात असतात आणि त्या शक्ती त्याला नाकारतात आणि त्या शक्ती त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. साधकाला असे आढळून येईल की, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शरीरामध्येच या साक्षात्कारासाठी प्रतिकूल असे सर्वाधिक हट्टी अडथळे ठासून भरलेले आहेत. तुम्ही जर हे ध्येय अगदी अंतःकरणपूर्वक स्वीकारलेत, साऱ्या अडीअडचणींना सामोरे गेलात, भूतकाळ आणि त्याचे सारे बंध तुम्ही मागे टाकून दिलेत, आणि सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार झालात, त्या दिव्य शक्यतेसाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार झालात, तरच तुम्हाला त्या पाठीमागील ‘सत्य’ हे अनुभूतीद्वारे सापडण्याची काही आशा करता येईल.

‘पूर्णयोगा’ची साधना, कोणत्याही ठरावीक साचेबंद मानसिक शिकवणुकीच्याद्वारे किंवा ध्यानधारणेच्या विहित प्रकारांद्वारे किंवा कोणत्याही मंत्रांद्वारे अथवा तत्सम गोष्टींद्वारे प्रगत होत नाही; तर अभीप्सेद्वारे आणि अंतर्मुख व ऊर्ध्वमुख अशा आत्म-एकाग्रतेद्वारे, ईश्वरी शक्तीच्या ‘दिव्य प्रभावा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे, आणि आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शक्ती’प्रत व तिच्या कार्याप्रत स्वतःला उन्मुख केल्यामुळे, तसेच हृदयामध्ये असणाऱ्या ‘दिव्य अस्तित्वा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे आणि उपरोक्त सर्व गोष्टींना ज्या ज्या गोष्टी परक्या असतात त्या सर्व गोष्टींना नकार दिल्यामुळे ही साधना प्रगत होत जाते. केवळ श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांद्वारेच ही आत्म-उन्मुखता (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 19-20)