Tag Archive for: आत्मसाक्षात्कार

आत्मसाक्षात्कार – २३

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

निश्चितच, ‘अधिमानस’ (Overmind) किंवा ‘अतिमानसा’च्या (Supermind) विकसनाच्या कितीतरी आधी ‘चैतन्या’चा (Spirit) साक्षात्कार होतो. प्रत्येक काळातल्या शेकडो साधकांना आजवर उच्चतर मनाच्या पातळीवर आत्मसाक्षात्कार झालेला आहे पण म्हणून त्यांना अतिमानसिक साक्षात्कार झाला आहे असे नाही. व्यक्तीला ‘आत्म्या’चा किंवा ‘चैतन्या’चा किंवा ‘ईश्वरा’चा मानसिक, प्राणिक किंवा अगदी शारीरिक पातळीवरही ‘आंशिक’ साक्षात्कार (partial realisations) होऊ शकतो मात्र व्यक्ती जेव्हा मनुष्याच्या सामान्य मानसिक पातळीच्या वर उच्चतर आणि विशालतर मनामध्ये उन्नत होते तेव्हा, ‘आत्मा’ त्याच्या सर्व सचेत व्यापकतेनिशी प्रकट व्हायला सुरुवात होते.

‘आत्म्या’च्या या व्यापकतेमध्ये संपूर्णतया प्रवेश केल्यामुळे, मानसिक कृती विराम पावणे शक्य होते आणि व्यक्तीला आंतरिक नीरवता लाभते. आणि मग त्यानंतर, व्यक्ती कोणत्याही प्रकारची कृती करत असली तरी तिच्यामधील ही आंतरिक नीरवता तशीच टिकून राहते; व्यक्ती अंतरंगांतून शांत-नीरव राहते. साधनभूत अस्तित्वामध्ये कृती चालू राहते आणि या कृतीच्या अंमलबजावणीसाठी — मग ती कृती मानसिक असो, प्राणिक असो किंवा शारीरिक असो — त्या कृतीसाठी आवश्यक असणारे सर्व संकेत, आत्म्याच्या या सारभूत शांतीला आणि स्थिरतेला धक्का न पोहोचवता, उच्चतर स्त्रोतापासून मिळत राहतात.

मात्र वर वर्णन केलेल्या अवस्थेपेक्षा ‘अधिमानसिक’ आणि ‘अतिमानसिक’ अवस्था या अधिक उच्च स्तरावरील असतात. व्यक्तीला त्यांचे आकलन व्हायला हवे असेल तर, तिला आधी आत्म-साक्षात्कार झालेला असला पाहिजे; आध्यात्मिकीकरण झालेल्या मनाची व हृदयाची पूर्ण कृती तिच्या ठिकाणी होत असली पाहिजे; तिच्या ठिकाणी अंतरात्म्याबाबतची जागृती झालेली असली पाहिजे; बंदिस्त असलेल्या चेतनेची मुक्ती, तसेच आधाराचे शुद्धीकरण व त्याचे पूर्णतया उन्मीलन (opening) झालेले असले पाहिजे. त्यामुळे मुक्त झालेल्या प्रकृतीमध्ये, प्रथम उपरोक्त अधिष्ठान निर्माण करण्याचा प्रयत्न करा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 413)

आत्मसाक्षात्कार – २०

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

ज्या विशालतेमध्ये, नितांत अशा स्थिर-प्रशांततेमध्ये आणि निश्चल-नीरवतेमध्ये विलीन झाल्याची जाणीव तुम्हाला होत आहे त्यालाच ‘आत्मा’ किंवा ‘शांत-ब्रह्म’ असे संबोधले जाते. या आत्म्याचा किंवा शांत-ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणे आणि त्यामध्ये निवास करणे हेच अनेक योगमार्गांचे संपूर्ण ध्येय असते. परंतु आपल्या योगामधील (पूर्णयोगामधील) ईश्वराच्या साक्षात्काराची आणि रूपांतरणाची ही केवळ पहिली पायरी आहे. जीव उच्चतर किंवा दिव्य चेतनेमध्ये वृद्धिंगत होत जाणे यालाच आम्ही ‘रूपांतरण’ असे संबोधतो.

*

एखादा साधक, ‘अवैयक्तिक, निर्गुण ब्रह्मा’पाशीच थांबला आणि त्याने पुढे वाटचालच केली नाही तर मग, तो ‘पूर्णयोगाचा साधक’ आहे, असे म्हणता येणार नाही. ‘निर्गुण साक्षात्कार’ हा स्वयमेव शांत-‘आत्म्याचा’, विशुद्ध ‘सत्‌-चित्‌-आनंदा’चा साक्षात्कार असतो, पण त्यामध्ये ‘सत्यमया’ची, ‘चैतन्यमया’ची, ‘आनंदमया’ची कोणतीही जाणीव नसते. (म्हणजे हे सगुण-साकार विश्व सत्यमय, चैतन्यमय आणि आनंदमय असल्याची जाणीव नसते.) त्यामुळे हा साक्षात्कार ‘निर्वाणा’कडे घेऊन जातो.

आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण सच्चिदानंदाचा साक्षात्कार ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी असली किंवा समग्र ज्ञानाचा तो एक महत्त्वाचा भाग असला तरी, समग्र ज्ञानामधील ती केवळ एक पायरी असते. सर्वोच्च साक्षात्काराचे ते अंतिम साध्य नसते, तर तो केवळ प्रारंभ असतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 393)

कोणतेही विचारच मनात उमटू नयेत अशा प्रकारे मन शांत करणे ही गोष्ट सोपी नाही, बहुधा त्याला बराच काळ लागतो. सर्वात आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की, एक प्रकारची मनाची शांती तुम्हाला जाणवली पाहिजे. विचार जरी मनात आलेच तरी, त्यामुळे तुम्ही विचलित होता कामा नये किंवा त्यांनी तुमच्या मनाचा ताबा घेता कामा नये किंवा तुम्ही त्यामध्ये वाहवत जाता कामा नये; जरी मनात विचार आले तरी, ते नुसतेच निघून जात आहेत, असे व्हावयास हवे.

येणाऱ्या जाणाऱ्या विचारांचे सुरुवाती सुरुवातीला मन ‘साक्षी’ बनते, ते ‘विचारक’ नसते. नंतरनंतर तर ते विचार पाहणारे साक्षीही राहत नाही. त्या विचारांकडे लक्षही जात नाही, विचार केवळ येऊन जात आहेत, असे ते करु शकते. तेव्हा ते स्वत:वरच किंवा त्याने निवडलेल्या एखाद्या वस्तुवर विनासायास लक्ष केंद्रित करू शकते.

साधनेचा पाया म्हणून दोन मुख्य गोष्टी साध्य करून घ्यावयास हव्यात –
• चैत्य पुरुषाचे खुलेपण आणि
• वर असलेल्या आत्म्याचा साक्षात्कार.

चैत्य पुरुषाचे खुलेपण :
श्रीमाताजींवर चित्ताची एकाग्रता आणि त्यांच्याप्रत आत्मार्पण हे चैत्य पुरुष खुले करण्याचे थेट मार्ग आहेत. भक्ती वाढली असल्याचे तुम्हाला जे जाणवते, ती चैत्य विकसनाची पहिली खूण आहे. श्रीमाताजींच्या उपस्थितीची वा त्यांच्या शक्तीची संवेदना किंवा त्या तुम्हाला साहाय्य करत आहेत, समर्थ बनवीत आहेत ह्याचे स्मरण ही पुढची खूण आहे. सरते शेवटी, आतील आत्मा हा अभीप्सेमध्ये सक्रिय व्हावयास सुरुवात होईल. आणि मनाला योग्य विचारांकडे वळण्यासाठी, प्राणाला योग्य गतिविधी व भावभावना यांच्याकडे वळण्यासाठी, चैत्य बोधाकडून (Psychic Perception) मार्गदर्शन मिळू लागेल; ज्या गोष्टी बाजूला सारण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी दाखवून दिल्या जातील आणि त्या बाजूलाही सारल्या जातील आणि अशा प्रकारे व्यक्तीच्या सर्व क्रिया त्या एका ईश्वराकडेच वळविल्या जातील.

आत्मसाक्षात्कार :
आत्मसाक्षात्कारासाठी, मनाची शांती आणि मौन ह्या पहिल्या आवश्यक अटी आहेत. नंतर व्यक्तीला एक प्रकारची सुटका, मुक्तता, व्यापकता जाणवायला सुरुवात होते. व्यक्ती एका शांत, अक्षोभित, कोणत्याच गोष्टीने स्पर्शित नसलेल्या, सर्वत्र आणि सर्वांतर्यामी अस्तित्वात असणाऱ्या, ईश्वराशी एकरूप झालेल्या किंवा ईश्वराशी अभिन्न असलेल्या अशा चेतनेमध्ये जीवन जगू लागते. अंतर्दृष्टी खुली होणे, अंतरंगामध्ये शक्तीचे कार्य चालू असल्याची जाणीव होणे किंवा तिच्या कार्याच्या विविध क्रियाप्रक्रिया किंवा त्या कार्याची लक्षणे इ. इ. जाणवणे ह्यासारखे मार्गातील इतर अनुभव येतील किंवा येऊ शकतील. तसेच व्यक्तीला चेतनेचे आरोहण आणि वरून अवतरित होणारी शक्ती, शांती, आनंद वा प्रकाश ह्यांचीसुद्धा जाणीव होऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 320)