Tag Archive for: अहंभाव

जीवन जगण्याचे शास्त्र – २६

पूर्णयोगाचा मार्ग खूप दीर्घ आहे. स्वतःमधील आणि जगातील ईश्वराला आपली सर्व कर्मे त्यागबुद्धीने, यज्ञबुद्धीने समर्पित करणे हे या मार्गावरील पहिले पाऊल असते. हा मनाचा आणि हृदयाचा भाव असतो, त्याचा आरंभ करणे हे फारसे अवघड नाही, परंतु तो दृष्टिकोन पूर्ण मन:पूर्वकतेने अंगीकारणे आणि तो सर्वसमावेशक करणे फार अवघड असते.

कर्मफलावर असणारी आपली आसक्ती सोडून देणे हे या मार्गावरील दुसरे पाऊल असते. आपल्यामध्ये अनुभवास येणारी ‘ईश्वरी उपस्थिती, दिव्य चेतना आणि दिव्य सामर्थ्य’ हे त्यागाचे खरे, अपरिहार्य, अतिशय इष्ट असे फळ असते. ही एक गोष्ट आवश्यक असते. हे फळ मिळाले की, अन्य सर्व गोष्टींची त्याला जोड मिळेलच. हे दुसरे पाऊल म्हणजे आपल्या प्राणिक अस्तित्वातील, आपल्या वासनात्म्यातील (desire-soul), वासनामय प्रकृतीतील अहंभावप्रधान इच्छेचे रूपांतर असते; आणि ते फारच अवघड असते.

केंद्रस्थ अहंभावाचे उच्चाटन आणि एवढेच नव्हे तर, ईश्वराचे साधन झाल्याच्या अहं जाणिवेचे देखील उच्चाटन हे या मार्गावरील तिसरे पाऊल असते. हे रूपांतरण सर्वाधिक अवघड असते; आणि जोपर्यंत पहिली दोन पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत हे रुपांतरण पूर्ण होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तिसऱ्या कळसरूपी पावलाची जोड मिळत नाही म्हणजेच अहंभाव नष्ट करून, वासनेचे मूळच उखडून फेकून दिले जात नाही तोपर्यंत, आधीच्या दोन पावलांचे कार्यसुद्धा पूर्ण होत नाही.

क्षुद्र अहंभाव प्रकृतीतून मुळापासून दूर केला जातो तेव्हाच, साधकाला ऊर्ध्वस्थित असणाऱ्या त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते; ईश्वराची शक्ती आणि ईश्वराचा एक अंशभाग असे त्याचे स्वरूप असते. साधकाला या खऱ्या अस्तित्वाची ओळख होते तेव्हाच तो ईश्वरी शक्तीच्या संकल्पाव्यतिरिक्त असणाऱ्या इतर सर्व प्रेरक-शक्तींचा त्याग करतो.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 247-248)

साधना, योग आणि रूपांतरण – १२६

अहंभावामध्ये राहू नये तर ‘ईश्वरा’मध्ये राहून जीवन जगावे; लहानशा, अहंभावयुक्त चेतनेमध्ये राहून नव्हे, तर ‘सर्वात्मक’ आणि ‘सर्वातीत’ पुरुषाच्या चेतनेमध्ये राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन, जीवन जगावे. सर्व प्रसंगांमध्ये व सर्व जिवांशी पूर्णपणे समत्वाने वागावे; आपले स्वतःबरोबर आणि आपले ‘ईश्वरा’बरोबर जसे वर्तन असते त्याप्रमाणे, आपण इतरांकडे पाहावे व त्यांना जाणून घ्यावे. आपल्या स्वतःमध्ये इतर सर्वांना पाहावे व सर्वांना ‘ईश्वरा’ मध्ये पाहावे; आणि ईश्वर सर्वांमध्ये आहे, आपण स्वतःदेखील इतर सर्वांमध्ये आहोत, ही जाणीव बाळगावी. अहंभावात राहून नव्हे, तर ‘ईश्वरा’मध्ये निमग्न राहून कर्म करावे.

आणि येथे पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, वैयक्तिक गरजा वा वैयक्तिक प्रमाण डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही कृतीची निवड करायची नाही; तर आपल्या ऊर्ध्वस्थित असणारे असे जे जिवंत सर्वोच्च ‘सत्य’ आहे त्याची आज्ञा असेल त्यानुसार कृतीची निवड करायची.

दुसरी गोष्ट, आपण आध्यात्मिक चेतनेच्या पायावर पुरेसे सुस्थिर झालो तरीही आपल्या स्वत:च्या स्वतंत्र इच्छेने वा विचाराने, कृती करायची नाही; तर आपल्या अतीत असणाऱ्या ‘ईश्वरी इच्छे’च्या मार्गदर्शनानुसार आणि तिच्या प्रेरणेच्या प्रभावाने आपल्या कृतीला घडू देण्यास आणि विकसित होण्यास मुभा द्यायची.

आणि शेवटी या साधनेचा सर्वश्रेष्ठ परिणाम म्हणजे, आपण स्वतःला उन्नत करून, ‘ईश्वरी शक्ती’शी एकरूप व्हायचे; ज्ञान, शक्ती, चेतना, कृती आणि अस्तित्वाचा आनंद या सर्व बाबतीत आपण ‘ईश्वरी शक्ती’शी एकरूप व्हायचे; आपली क्रियाशीलता मर्त्य अशा वासनेने, प्राणिक प्रेरणेने, भ्रामक मानसिक ‘स्वतंत्र’ इच्छेने प्रेरित व शासित होत नसून, ती अमृत आत्मानंद आणि अनंत आत्मज्ञान यांच्या प्रेरणेने, स्वच्छ ज्ञानाच्या प्रकाशात योजली जात आहे आणि विकसित होत आहे, ही जाणीव व भावना आपल्या ठिकाणी स्थिर करायची. (आपल्यातील) प्रकृतीजन्य मनुष्याला दिव्य ‘आत्म्या’च्या आणि शाश्वत ‘चैतन्या’च्या जाणीवपूर्वक आधीन केल्याने आणि विलीन केल्यानेच ही गोष्ट घडून येते…

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 101)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

साधना, योग आणि रूपांतरण – ११०

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही. परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत. जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ‘ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो. साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, किंबहुना त्यामानाने खरेखुरे प्रेम आणि भक्ती या गोष्टी अधिक सोप्या असतात. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते.

*

कुटुंब, समाज, देश या गोष्टी म्हणजे ‘ईश्वर’ नव्हेत; या गोष्टी म्हणजे अहम् चे व्यापक रूप आहेत. कुटुंब, समाज, देश या उद्दिष्टांसाठी कार्य करावे असा ‘ईश्वरी आदेश’ मिळाला असल्याची जर व्यक्तीला जाणीव असेल किंवा (ते कार्य करत असताना) व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगामध्ये कार्य करणाऱ्या ‘ईश्वरी शक्ती’ची जाणीव असेल तरच ती व्यक्ती कुटुंब, समाज, देश यांच्यासाठी कार्य करत असूनही, मी ‘ईश्वरा’साठी कार्य करत आहे, असे म्हणू शकते. अन्यथा, देश वगैरे गोष्टी म्हणजे ‘ईश्वर’च आहेत, ही केवळ मनाची एक कल्पना असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216), (CWSA 28 : 438)

व्यक्तिगत मोक्षाच्या इछेचे स्वरूप कितीही उदात्त असले तरी, ती एक प्रकारची वासनाच असते आणि ती अहंभावातून निर्माण झालेली असते. आपल्या व्यक्तित्वाची कल्पना प्रामुख्याने आपल्या समोर असते; आपल्याला व्यक्ती म्हणून वैयक्तिक हिताची, वैयक्तिक कल्याणाची इच्छा असते; दुःखापासून सुटका व्हावी अशी एक व्यक्ती म्हणून आपली तळमळ असते; जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून सुटका व्हावी अशी आपल्या मनात तीव्र इच्छा उत्पन्न होते; आणि यातूनच मोक्षाची कल्पना निर्माण होते; अर्थात ही कल्पना हे अहंभावाचे अपत्य आहे.

अहंभावाचा पाया पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, व्यक्तिगत मोक्षाच्या इच्छेच्या वर उठणे आवश्यक असते. आपण जर ईश्वर-प्राप्तीसाठी धडपडत असू, तर ती धडपड केवळ ईश्वरासाठीच असली पाहिजे, अन्य कोणत्याही कारणासाठी नव्हे; कारण आपल्या जीवाला आलेली ती परमोच्च हाक असते, आपल्या चैतन्याचे ते सर्वात गहन असे सत्य असते.

*

वैयक्तिक आत्म्याने सर्व जगताच्या अतीत जाऊन, विश्वात्मक ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे एवढ्यापुरताच ‘पूर्णयोग’ मर्यादित नाही; तर तो ‘सर्व आत्म्यांची एकत्रित बेरीज’, म्हणजे विश्वात्मक साक्षात्कार देखील आपल्या कवेत घेतो; असा हा ‘पूर्णयोग’ व्यक्तिगत मोक्ष किंवा सुटका एवढ्यापुरता मर्यादित राहूच शकत नाही. पूर्णयोगाचा साधक विश्वात्मक मर्यादांच्या अतीत झालेला असूनही, तो सर्वात्मक ईश्वराशी देखील एकात्म असतो. या विश्वातील त्याचे दिव्य कर्म अजूनही शिल्लक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 269-70)

पूर्णयोगाचा मार्ग फार दीर्घ आहे; आपल्यातील आणि जगातील ईश्वराला आपली सर्व कर्मे त्यागबुद्धीने, यज्ञबुद्धीने समर्पित करणे हे या मार्गावरील पहिले पाऊल आहे; हा मनाचा आणि हृदयाचा दृष्टिकोन आहे, त्याचा आरंभ करणे हे फारसे अवघड नाही, परंतु तो दृष्टिकोन पूर्ण मन:पूर्वकतेने अंगीकारणे आणि तो सर्वसमावेशक करणे फार अवघड आहे.

या मार्गावरील दुसरे पाऊल म्हणजे, कर्मफळावर असणारी आपली आसक्ती सोडून देणे हे आहे. त्यागाचे खरे, अटळ, अतिशय इष्ट असे फळ, एकमेव आवश्यक असे फळ म्हणजे ईश्वराने आमच्यामध्ये प्रकट व्हावे आणि आम्हामध्ये दिव्य जाणीव व दिव्य शक्ती यावी हे आहे; हे फळ मिळाले म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतीलच मिळतील. हे दुसरे पाऊल म्हणजे आपल्या प्राणिक अस्तित्वातील, आपल्या वासनात्म्यातील, वासनामय प्रकृतीतील अहंभावप्रधान इच्छेचे रूपांतर हे होय; कर्मसमर्पण-वृत्तीहूनही रूपांतराची ही गोष्ट फारच अवघड आहे.

या मार्गावरील तिसरे पाऊल, केंद्रस्थ अहंभावाचे उच्चाटन आणि एवढेच नव्हे तर, ईश्वरी साधन झाल्याच्या अहं संवेदनेचे देखील उच्चाटन हे आहे. हेच रूपांतर सर्वात अधिक अवघड असते; आणि जोपर्यंत पहिली दोन पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत हे रुपांतर पूर्णपणे होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत अहंभाव नष्ट करून, वासनेचे मूळच उखडून फेकले जात नाही तोपर्यंत, म्हणजेच ह्या तिसऱ्या कळसरूपी पावलाची जोड मिळत नाही तोपर्यंत, आधीच्या दोन पावलांचे कार्यसुद्धा पूर्ण होत नाही.

जेव्हा हा क्षुद्र अहंभाव प्रकृतीतून मुळापासून दूर केला जातो तेव्हाच साधकाला स्वत:च्या वर असणाऱ्या त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते; ईश्वराचे सामर्थ्य आणि ईश्वराचा एक अंशभाग असे त्याचे स्वरूप असते. साधकाला ह्या खऱ्या अस्तित्वाची ओळख होते तेव्हाच तो ईश्वरी-शक्तीच्या इच्छेव्यतिरिक्त असणाऱ्या इतर सर्व प्रेरक-शक्तींचा व प्रेरणांचा त्याग करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 247)