Tag Archive for: अवतरण

आत्मसाक्षात्कार – २२

पूर्णयोगाचे मूलभूत साक्षात्कार खालीलप्रमाणे आहेत.

१) संपूर्ण भक्ती ही ज्यायोगे हृदयाची मुख्य प्रेरणा व विचारांची स्वामिनी बनेल आणि ज्यायोगे जीवन व कर्म ‘श्रीमाताजीं’च्या आणि त्यांच्या ‘उपस्थिती’च्या नित्य एकत्वात घडत राहील अशा प्रकारचे चैत्य, अंतरात्मिक परिवर्तन (psychic change) घडणे.

२) शरीराच्या पेशी न्‌ पेशी ज्यामुळे भारल्या जातील अशा प्रकारे, ‘उच्चतर चेतने’च्या ‘शांती, प्रकाश, शक्ती’ इत्यादी गोष्टींचे मस्तकाद्वारे व हृदयाद्वारे संपूर्ण अस्तित्वामध्ये अवतरण होणे.

३) सर्वत्र अनंतत्वाने वसणाऱ्या ‘एकमेवाद्वितीय’ अशा ईश्वराची व श्रीमाताजींची अनुभूती येणे आणि त्या अनंत चेतनेमध्ये वास्तव्य घडणे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)

साधना, योग आणि रूपांतरण – २८०

शरीराचे रूपांतरण

(शरीराच्या एखाद्या भागाचे) रूपांतरण घडविताना, अडचणींना सामोरे जाणे आणि व्यक्तित्वाच्या प्रत्येक भागामध्ये जे काही उद्भवते त्याच्यावर मात करणे किंवा त्यामध्ये परिवर्तन करणे अध्याहृत असते; जेणेकरून तो भाग, उच्चतर गोष्टींना प्रतिसाद देऊ शकेल. परंतु समग्र व्यक्तित्वामध्ये संपूर्ण परिवर्तन हे ‘ऊर्ध्वस्थित’ असणाऱ्या ‘ईश्वरा’प्रत केलेल्या आरोहणाद्वारे आणि ‘ईश्वरा’च्या अवतरणाद्वारे शक्य होते. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘आत्म्या’चा साक्षात्कार आणि अगदी शारीर-स्तरापर्यंत येत, उच्चतर शांतीचे झालेले संपूर्ण अवतरण ही त्याची पहिली पायरी असते.

*

हो, नक्कीच. आणि म्हणूनच मी, ज्या जडभौतिक भागाने स्वतःला इतके अग्रस्थान देऊ केले आहे, त्या भागामध्ये साक्षात्कार व्हावा यावर एवढा भर देत आहे. व्यक्तीमधील एखादा भाग जेव्हा अशा रीतीने स्वतःचे सारे दोष व मर्यादा दाखवून देत लक्ष वेधून घेतो, तेव्हा त्या गोष्टींवर मात केली जावी या हेतुने तो पृष्ठस्तरावर येत असतो. येथे (तुमच्या उदाहरणामध्ये) जडत्व किंवा अक्षमता (अप्रवृत्ती), अंधकार किंवा विस्मरण (अप्रकाश) या साऱ्या गोष्टी, त्या नीट व्हाव्यात या हेतुने आणि त्यांचे प्रथमतः किंवा प्राथमिक रूपांतरण व्हावे यासाठी पृष्ठस्तरावर आल्या आहेत.

मनामध्ये शांती आणि प्रकाश, हृदयामध्ये प्रेम आणि सहानुभूती, प्राणामध्ये शांतस्थिरता आणि ऊर्जा, शरीरामध्ये स्थायी ग्रहणशीलता व प्रतिसाद (प्रकाश, प्रवृत्ती) या गोष्टी निर्माण होणे म्हणजे आवश्यक असणारे परिवर्तन होय.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 362, 366)

साधना, योग आणि रूपांतरण – २४०

दिव्य जीवनासाठी फक्त उच्चतर मानसिक चेतनेच्या संपर्कात येणे पुरेसे नसते. ती फक्त एक अनिवार्य अशी अवस्था असते. दिव्य जीवनासाठी अधिक उच्च आणि अधिक शक्तिशाली स्थानावरून ‘दिव्य शक्ती’चे अवतरण होणे आवश्यक असते.

पुढील सर्व गोष्टी सद्यस्थितीत अदृश्य असलेल्या शिखरावरून अवतरित होणाऱ्या ‘शक्ती’विना अशक्यप्राय आहेत :
१) उच्चतर चेतनेचे अतिमानसिक प्रकाश आणि शक्तीमध्ये रूपांतरण,
२) प्राण आणि त्याच्या जीवनशक्तीचे विशुद्ध, विस्तृत, स्थिरशांत, दिव्य ऊर्जेच्या शक्तिशाली आणि उत्कट साधनामध्ये रूपांतरण,
३) तसेच स्वयमेव शरीराचे दिव्य प्रकाश, दिव्य कृती, सामर्थ्य, सौंदर्य आणि हर्ष यांच्यामध्ये रूपांतरण

‘ईश्वरा’प्रत आरोहण या एका गोष्टीबाबत इतर योग आणि पूर्णयोग यांमध्ये साधर्म्य आढळते परंतु पूर्णयोगामध्ये केवळ आरोहण पुरेसे नसते तर मन, प्राण, शरीर यांच्या सर्व ऊर्जा रूपांतरित करण्यासाठी ‘ईश्वरा’चे अवतरण होणेदेखील आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 118-119)

साधना, योग आणि रूपांतरण – २३३

फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते घातकच ठरले आहे.

काही विशिष्ट प्रमाणात ध्यान-एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टी आवश्यक असतात. परंतु कर्माविना, कोणतेही कार्य न करता प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तन झाले आणि त्यानंतर जर व्यक्ती लोकांच्या संपर्कामध्ये आली तरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.

व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असली तर, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. सर्व कर्मं जी श्रीमाताजींना अर्पण केली जातात आणि जी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या शक्तिनिशी केली जातात ती सर्व कर्मं एकसमान असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)

साधना, योग आणि रूपांतरण – २२६

व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन घडवू शकत नसेल तर, तिने योगसाधना करण्याचे कष्ट घेणे उपयुक्त ठरणार नाही; कारण प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठीच तर योगसाधना केली जाते, अन्यथा त्याला काही अर्थ नाही, असे श्रीअरविंद आपल्याला सांगतात.
*
‘शांती’चे अवतरण, ‘शक्ती’चे अवतरण, ‘प्रकाशा’चे अवतरण आणि ‘आनंदा’चे अवतरण, या चार गोष्टी ‘प्रकृतीचे रूपांतरण’ घडवून आणतात.

– श्रीमाताजी (CWM 04 : 332), – श्रीअरविंद (CWSA 30 : 449)

साधना, योग आणि रूपांतरण – २१४

आध्यात्मिकीकरण (Spiritualisation) म्हणजे उच्चतर शांती, शक्ती, प्रकाश, ज्ञान, विशुद्धता, आनंद इत्यादीचे अवतरण. या गोष्टी ‘उच्च मना’पासून ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Higher Mind to Overmind) कोणत्याही उच्च स्तराशी संबंधित असू शकतात. कारण त्यांपैकी कोणत्याही स्तरावर ‘आत्म्या’चा साक्षात्कार होऊ शकतो.

आध्यात्मिकीकरणाद्वारे व्यक्तिनिष्ठ रूपांतरण घडून येते. यामध्ये साधनभूत प्रकृतीचे इतपतच रूपांतरण घडते की जेणेकरून त्या प्रकृतीकडून, ‘विश्वात्म्या’ला जे कार्य करून घ्यायचे असते त्याचे ती (सुयोग्य) साधन होऊ शकेल. हे होत असताना अंतरंगातील आत्मा स्थिर, मुक्त आणि ‘ईश्वरा’शी एकत्व पावलेला असा राहतो.

परंतु हे व्यक्तिगत रूपांतरण अपूर्ण असते. जेव्हा ‘अतिमानसिक’ परिवर्तन (Supramental change) घडून येते तेव्हाच साधनभूत ‘प्रकृती’चे संपूर्ण रूपांतरण होऊ शकते. तोपर्यंत प्रकृती अनेक अपूर्णतांनी भरलेली असते. परंतु उच्चतर स्तरावरील आत्म्याला त्याने काही फरक पडत नाही कारण तो या सर्वापासून मुक्त असतो, त्याच्यावर या गोष्टींचा कोणताही परिणाम होत नाही. आंतरिक पुरुष देखील अगदी आंतरिक शरीरापर्यंत मुक्त आणि अप्रभावित राहू शकतो. ‘अधिमानस’ हे परिणामकारक ‘दिव्य ज्ञाना’च्या कार्याच्या मर्यादांच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याच्या मर्यादांच्या अधीन असते. ते आंशिक आणि मर्यादित ‘दिव्य सत्या’दी गोष्टींच्या अधीन असते. केवळ ‘अतिमानसा’मध्येच संपूर्ण ‘सत्-चेतना’ (Truth consciousness) व्यक्तीमध्ये अवतरित होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 404)

साधना, योग आणि रूपांतरण – २१२

आंतरात्मिकीकरण (psychisation) आणि आध्यात्मिकीकरण (spiritualisation) या दोन्हींमध्ये फरक आहे. आध्यात्मिकीकरणामध्ये होणारे परिवर्तन हे वरून अवतरित होते, तर आंतरात्मिकीकरणामध्ये होणारे परिवर्तन हे अंतरंगामधून घडून येते. आंतरात्मिकीकरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्यावर अंतरात्म्याचे वर्चस्व निर्माण होते आणि त्यातून हे परिवर्तन घडून येते.

*

तुम्ही पत्रामध्ये वर्णन केलेल्या दोन्ही भावना योग्य आहेत. त्यातून साधनेमधील दोन आवश्यकतांचे सूचन होते.

त्यातील एक आवश्यकता म्हणजे अंतरंगात प्रवेश करायचा आणि चैत्य पुरुष (psychic being) व बाह्यवर्ती प्रकृती यांच्यामधील अनुबंध पूर्णत: खुला करायचा.

दुसरी आवश्यकता म्हणजे ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शांती, शक्ती, प्रकाश, आनंद’ यांच्याप्रत उन्मुख व्हायचे आणि त्यांच्यामध्ये आरोहण करायचे आणि प्रकृतीमध्ये व शरीरामध्ये त्यांचे अवतरण घडवून आणायचे.

वरील दोन्ही प्रक्रियांपैकी, म्हणजे आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक प्रक्रियांपैकी कोणतीच प्रक्रिया एकमेकींशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. आध्यात्मिक आरोहण आणि अवतरण घडून आले नाही तर प्रकृतीचे आध्यात्मिक रूपांतरण होऊ शकणार नाही. आणि संपूर्ण आंतरात्मिक खुलेपण आले नाही आणि चैत्य पुरुष व बाह्यवर्ती प्रकृती यांच्यामध्ये अनुबंध निर्माण करण्यात आला नाही तर ‘रूपांतरण’ परिपूर्ण होऊ शकणार नाही.

या दोन प्रक्रियांमध्ये विसंगती नाही. काही जण आंतरात्मिक (चैत्य) रूपांतरणापासून सुरुवात करतात तर काहीजण आध्यात्मिक रूपांतरणापासून सुरुवात करतात. तर काही जण दोन्ही रूपांतरणास एकत्रितपणे सुरुवात करतात. दोन्हीसाठी आस बाळगायची आणि गरजेनुसार आणि प्रकृतीच्या कलानुसार श्रीमाताजींच्या शक्तीला कार्य करू द्यायचे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 380, 383)

साधना, योग आणि रूपांतरण – १९४

‘अतिमानस योग’ (supramental Yoga) म्हणजे एकाच वेळी, ‘ईश्वरा’प्रत आरोहण (ascent) असते आणि ‘ईश्वरा’चे मूर्त प्रकृतीमध्ये अवतरण (descent) देखील असते. आत्मा, मन, प्राण आणि शरीर यांच्या एककेंद्री समुच्चयाच्या ऊर्ध्वमुख अभीप्सेद्वारेच (aspiration) आरोहण साध्य होऊ शकते. आणि समग्र अस्तित्वाने त्या अनंत आणि शाश्वत ‘ईश्वरा’प्रत आवाहन केले तर त्याद्वारेच अवतरण घडून येऊ शकते. जर हे आवाहन व ही अभीप्सा असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाने या गोष्टी उदयाला आल्या, त्या सातत्याने वृद्धिंगत होत राहिल्या आणि त्यांनी जर सर्व प्रकृतीचा ताबा घेतला, तर आणि तरच अतिमानसिक उन्नयन आणि रूपांतरण शक्य होते.

आवाहन आणि अभीप्सा या फक्त प्राथमिक अटी आहेत, त्या बरोबरीने आणि त्यांच्या प्रभावशाली तीव्रतेमुळे सर्व अस्तित्वामध्येच ‘ईश्वरा’प्रत उन्मुखता (opening) आणि संपूर्ण समर्पण उदित होणे आवश्यक असते. मर्त्य अस्तित्वाच्या आधीपासूनच वर असणारी व पाठीमागे असणारी आणि मर्त्य अर्धजागृत अस्तित्वाला कवेत घेणारी एक महान दिव्य ‘चेतना’ असते. ती महान दिव्य चेतना, प्रकृतीला तिच्या सर्व भागांनिशी आणि सर्व स्तरांवर, कोणत्याही मर्यादेविना ग्रहण करता येणे शक्य व्हावे म्हणून, प्रकृतीने स्वत:ला व्यापकतेने खुले करणे म्हणजे ‘उन्मुखता’! या ग्रहणशीलतेमध्ये धारण करण्याची अक्षमता असता कामा नये, किंवा मूलद्रव्यांतरणाच्या तणावामुळे (transmuting stress) शरीर किंवा मज्जातंतू, प्राण किंवा मन, किंवा संपूर्ण व्यवस्थेतील कोणती एखादी गोष्ट कोलमडूनही पडता कामा नये. (म्हणून त्यासाठी) ईश्वरी ‘शक्ती’चे सदोदित बलशाली असणारे आणि अधिकाधिक आग्रही होत जाणारे कार्य धारण करण्यासाठी सतत चढतीवाढती असणारी क्षमता, आणि अपार ग्रहणशीलता असणे आवश्यक असते. अशी ग्रहणशीलता नसेल तर कोणतेच महान आणि चिरस्थायी असे कोणतेही कार्य घडणे शक्य होणार नाही; आणि अशा वेळी ती ‘योगसाधना’ कोलमडून बंद पडेल किंवा जडतायुक्त अडथळा निर्माण झाल्यामुळे बंद होईल किंवा त्या प्रक्रियेमध्येच काहीतरी विनाशक अटकाव किंवा सुस्ती येऊन ती बंद पडेल अशी शक्यता असते; या प्रक्रियेमध्ये अपयश येऊ नये असे जर वाटत असेल तर योगसाधना निरपवाद आणि समग्र असणेच आवश्यक असते.

परंतु कोणत्याही मानवी प्रणालीमध्ये ही अनंत ग्रहणशीलता आणि अमोघ क्षमता नसते, म्हणून ‘ईश्वरी शक्ती’ जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये अवतरित होते तेव्हा, ती त्या व्यक्तीची (ग्रहण)क्षमता वृद्धिंगत करत नेते. ईश्वरी ‘शक्ती’ वरून त्या व्यक्तीमध्ये प्रविष्ट होताना, व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कार्य करण्यासाठी ‘सामर्थ्य’ निर्माण करते. ते सामर्थ्य आणि ती ग्रहणक्षमता जेव्हा त्या ईश्वरी शक्तीद्वारे समतुल्य केली जाते तेव्हाच, अतिमानसिक ‘योग’ यशस्वी होण्याची शक्यता असते. आपण ‘जेव्हा आपले अस्तित्व हळूहळू चढत्यावाढत्या समर्पणाद्वारे ईश्वरा’च्या हाती सोपवीत जातो तेव्हाच ही गोष्ट शक्य होते. तेथे एक समग्र आणि अखंडित अशी सहमती आणि कार्यासाठी जी गोष्ट करणेच आवश्यक आहे ती गोष्ट ‘ईश्वरी शक्ती’ला करू देण्याची धैर्ययुक्त इच्छाशक्ती असणेच आवश्यक असते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद (CWSA 12 : 169-170)

साधना, योग आणि रूपांतरण – १८९

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०५

ऊर्ध्वगामी उन्मुखता (upward opening) ही अपरिहार्यपणे फक्त शांती, नीरवता आणि ‘निर्वाणा’कडेच घेऊन जाते असे नाही. साधकाला आपल्या वरच्या दिशेस, जणूकाही आपल्या मस्तकाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या व्यापकतेची आणि सर्व भौतिक व अतिभौतिक प्रदेश व्यापून टाकणाऱ्या एका महान, अंतिमत: एक प्रकारच्या अनंत शांतीची, नीरवतेचीच जाणीव होते असे नाही तर, त्याला इतर गोष्टींचीही जाणीव होते. सर्व ऊर्जा ज्यामध्ये सामावलेली असते अशा एका महान ‘शक्ती’ची, सर्व ज्ञान ज्यामध्ये सामावलेले असते अशा एका महा‘प्रकाशा’ची, सर्व आनंद आणि हर्ष ज्यामध्ये सामावलेला असतो अशा एका अपार ‘आनंदा’ची साधकाला जाणीव होते. सुरूवातीला या गोष्टी अनिवार्य आवश्यक, अनिश्चित, निरपवाद, साध्या, केवल अशा स्वरूपात त्याच्या समोर येतात. निर्वाणामध्ये उपरोक्त साऱ्या गोष्टी शक्य असल्याचे त्याला वाटते.

परंतु पुढे त्याला हेही आढळते की, या ‘दिव्य शक्ती’मध्ये अन्य शक्ती सामावलेल्या आहेत, या ‘दिव्य प्रकाशा’मध्ये अन्य सारे प्रकाश, या ‘दिव्य आनंदा’मध्ये शक्य असणारे सारे हर्ष आणि आनंद सामावलेले आहेत. आणि या साऱ्या गोष्टी आपल्यामध्येही अवतरित होऊ शकतात, हेही त्याला उमगू लागते. फक्त शांतीच नव्हे तर यांपैकी कोणतीही एक किंवा सर्व गोष्टी अवतरित होऊ शकतात. एवढेच की परिपूर्ण स्थिरता आणि शांती यांचे अवतरण घडवणे हे सर्वाधिक सुरक्षित असते कारण त्यामुळे इतर सर्व गोष्टींचे अवतरण हे अधिक निर्धोक होते. अन्यथा, बाह्य प्रकृतीला एवढी ‘शक्ती’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’ किंवा ‘आनंद’ धारण करणे किंवा तो पेलणे अवघड जाऊ शकते. आपण जिला ‘उच्चतर, आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना’ असे म्हणतो, तिच्यामध्ये वरील सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो.

हृदय-चक्राच्या माध्यमातून येणारा आंतरात्मिक खुलेपणा (Psychic opening) आपल्याला मूलतः व्यक्तिगत ‘ईश्वरा’च्या, आपल्याशी असलेल्या ‘ईश्वरा’च्या आंतरिक नात्याच्या संपर्कात आणतो. हा विशेषतः प्रेम आणि भक्तीचा मूलस्रोत असतो. ऊर्ध्वमुखी उन्मुखता (Upward opening) थेटपणे आपले नाते समग्र ‘ईश्वरा’शी जोडून देते आणि ती उन्मुखता आपल्यामध्ये दिव्य चेतना निर्माण करू शकते, ती आपल्या आत्म्याचे एक किंवा अनेक नवजन्म घडवून आणू शकते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 326-327)

साधना, योग आणि रूपांतरण – १८५

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया खुलासेवार उलगडवून दाखविली आहे. हे पत्र महत्त्वाचे पण बरेच विस्तृत आहे. त्यामुळे आपण ते क्रमश: विचारात घेणार आहोत.)

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०१

‘शांति’ (Peace) किंवा ‘नीरवता’ (Silence) लाभण्यासाठी वरून होणारे अवतरण हा निर्णायक मार्ग असतो. वास्तविक, दृश्यरूपात नेहमीच तसे दिसले नाही तरी, प्रत्यक्षात मात्र या गोष्टी नेहमीच अशा रीतीने घडून येतात. ‘दृश्यरूपात नेहमीच तसे दिसत नसले’, असे म्हणण्याचे कारण की साधकाला या प्रक्रियेची नेहमीच जाणीव असते असे नाही. त्याच्यामध्ये शांती स्थिरावते आहे किंवा किमान आविष्कृत तरी होत आहे असे त्याला जाणवते, पण ती कशी आणि केव्हा येते याची त्याला जाणीव नसते. तरीही हे सत्य आहे की, जे जे काही उच्चतर चेतनेशी संबंधित असते ते वरून येते; केवळ आध्यात्मिक शांती, नीरवता याच गोष्टी नव्हेत तर ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘ज्ञान’, उच्चतर दृष्टी आणि विचार, ‘आनंद’ या सर्वच गोष्टी वरून येतात.

एका विशिष्ट टप्प्यापर्यंत या गोष्टी अंतरंगातून सुद्धा येऊ शकतात; परंतु ते यामुळे शक्य होते कारण ‘चैत्य पुरुष’ (psychic being) त्यांच्याप्रत थेटपणे खुला झालेला असतो आणि त्यामुळे उपरोक्त गोष्टी आधी तेथे येतात आणि चैत्य पुरुषाद्वारे, किंवा त्याच्या पुढे येण्यामुळे, या गोष्टी स्वतःला, अस्तित्वाच्या इतर अंगांमध्येदेखील प्रकट करतात.

अंतरंगातून होणारे प्रकटीकरण किंवा वरून होणारे अवतरण हे ‘योगसिद्धी’चे दोन सार्वभौम मार्ग आहेत. बाह्य पृष्ठवर्ती मनाचा प्रयत्न किंवा भावना, एखाद्या प्रकारची तपस्या या सगळ्यांमधून या गोष्टींची काहीशी घडण होते असे वाटते, पण त्यांचे परिणाम हे, या दोन मूलगामी मार्गांच्या तुलनेत, बहुतेक वेळा अनिश्चित आणि आंशिक असतात. आणि म्हणूनच आम्ही या ‘पूर्णयोगा’मध्ये ‘उन्मुखते’वर, खुलेपणावर (opening) नेहमीच एवढा भर देत असतो. आपल्या आंतरिक मनाचे, प्राणाचे, शरीराचे आपल्या आंतरतम भागाप्रत, चैत्य पुरुषाप्रत असलेले खुलेपण आणि मनाच्या ऊर्ध्वदिशेस असणाऱ्या तत्त्वाप्रत उन्मुखता, या गोष्टी साधनेच्या फलप्राप्तीसाठी अपरिहार्य असतात. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 323-324)