(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे. त्याने तसे श्रीअरविंदांना कळविले आहे. त्यावर श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)
अपूर्णता असल्या आणि अगदी कितीही अपूर्णता असल्या किंवा त्या कितीही गंभीर स्वरूपाच्या असल्या तरीही, योगमार्गातील प्रगतीसाठी अपूर्णता या कधीही कायमचा अडथळा ठरू शकत नाहीत. एकच अडथळा हा कायमस्वरूपी अडथळा ठरू शकतो आणि तो म्हणजे अप्रामाणिकपणा. अर्थात हा अडथळासुद्धा कायम राहण्याची गरज नाही कारण त्यामध्येसुद्धा परिवर्तन करता येते. अपूर्णता हा जर योगमार्गातील अडथळा असता तर कोणताही मनुष्य योगमार्गामध्ये यशस्वी होऊ शकला नसता; कारण प्रत्येक जणच अपूर्ण असतो…
योगसाधनेमध्ये एकच गोष्ट अंतिमतः महत्त्वाची असते आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा. आणि त्याबरोबर आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे मार्गावर टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारा धीर. अर्थात बरेच जण धीर नसतानासुद्धा ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. कारण, साधकामध्ये बंडखोरीची भावना असली किंवा अधीरता, नैराश्य, विषाद, थकवा या गोष्टी असल्या किंवा काही काळासाठी त्याची श्रद्धा गमावल्यासारखी झाली तरी किंवा, साधकाच्या मनावर त्या गोष्टींचे मळभ आणि धुके आलेले असतानादेखील, साधकाच्या बाह्यवर्ती ‘स्व’पेक्षा अधिक सामर्थ्यशाली असणारी शक्ती, आत्मशक्ती किंवा जिवाला ईश्वरप्राप्तीची जी निकड वाटते ती प्रेरणा या गोष्टी ते मळभ बाजूला सारून, त्याला त्याच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जातात.
• श्रीअरविंद (CWSA 31 : 661)







