Tag Archive for: अंशावतार

(व्यक्तीचा जेव्हा तिच्या अंतरात्म्याशी किंवा चैत्य पुरुषाशी संपर्क झालेला असतो, तेव्हाचे ते क्षण महत्त्वाचे असतात असे श्रीमाताजी सांगत आहेत…)

अंतरात्म्याशी होणाऱ्या संपर्काचे हे क्षण म्हणजे बरेचदा जीवनातील एखाद्या निर्णायक वळणाचे क्षण असतात. अशा वेळी व्यक्तीचे एक पाऊल पुढे पडलेले असते, चेतनेच्या दृष्टीने तिची प्रगती झालेली असते. आणि बरेचदा त्याचा संबंध संकटाशी किंवा एखाद्या अत्यंत बिकट परिस्थितीशी असतो. अशा प्रसंगी व्यक्तीच्या समग्र अस्तित्वाकडून त्या ईश्वराचा अत्यंत तीव्र, उत्कट धावा केला जातो. तो इतका आर्त असतो की, त्यामुळे व्यक्तीची आंतरिक चेतना, तिला झाकून टाकणारे अचेतनेचे सर्व पडदे भेदून, तिच्या सर्व दीप्तिमानतेनिशी पृष्ठभागावर येते.

व्यक्ती जेव्हा असा अत्यंत आर्ततेने ईश्वराचा धावा करते तेव्हा त्यातून एखाद्या व्यक्तित्वाचे, दिव्य अंशावताराचे (emanation) अवतरणदेखील घडून येऊ शकते. त्या विशिष्ट क्षणी, एखादे नियत कार्य पूर्ण करण्यासाठी, तुमच्या व्यक्तित्वाशी एखादा दिव्य पैलू जोडला जाऊ शकतो. एखादी लढाई जिंकणे किंवा एखादी गोष्ट अभिव्यक्त करणे अशा प्रकारचे हे नियत कार्य असू शकते. आणि एकदा का हे नियत कार्य पूर्ण झाले की, बहुतेक वेळा तो अंशावतार लोप पावतो.

– श्रीमाताजी (CWM 15 : 341)