Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ०३

व्यक्तीने (साधनेसाठी) तिच्या दैनंदिन जीवनाच्या परिस्थितीतून बाहेर पडलेच पाहिजे असे काही बंधनकारक नाही; मात्र व्यक्तीने तिचा आंतरिक दृष्टिकोन पूर्णपणे बदलणे आवश्यक असते. व्यक्तीने तिच्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी करायला हरकत नाहीत पण त्या करताना तिचा दृष्टिकोन मात्र निराळा असावा. योगसाधना करण्यासाठी जीवनातील सर्व गोष्टींचा परित्याग करून एकांतवासात निघून जाणे, एखाद्या आश्रमात जाऊन राहणे गरजेचे आहे, असे माझे म्हणणे नाही.

एक मात्र खरे आहे की, एखादी व्यक्ती जर प्रपंचात व प्रापंचिक परिस्थितीमध्ये राहून योगाचरण करीत असेल तर ते अधिक अवघड असते; अर्थात ते अधिक परिपूर्णसुद्धा असते. कारण प्रत्येक क्षणी प्रापंचिक व्यक्तीला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्यांना, सर्वसंगपरित्याग करून एकांतवासात गेलेल्या व्यक्तीला तोंड द्यावे लागत नाही; कारण अशा व्यक्तीच्या बाबतीत समस्यांचे प्रमाण अगदीच कमी झालेले असते. पण प्रापंचिक व्यक्तीला मात्र अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते; व्यक्तीच्या भोवती असणाऱ्या, आणि ज्यांच्याशी तिचा सतत संबंध येतो त्या त्या व्यक्तींना तुमच्या वागण्याचे आकलन न होण्यापासूनच याची सुरुवात होते; व्यक्तीने त्यासाठी तयार असले पाहिजे, सहनशीलता आणि अतीव अलिप्तता यांसह सुसज्ज असले पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय विचार करतात व काय बोलतात याची, योगमार्गाची वाटचाल करणाऱ्या व्यक्तीने पर्वा करता कामा नये; हा अगदी अपरिहार्य असा आरंभबिंदू असतो.

जग तुमच्याबद्दल काय बोलते अथवा विचार करते, ते तुम्हाला कशी वागणूक देते याबाबत तुम्ही पूर्णपणे निर्लिप्त असले पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय समजूत करून घेतात याचे तुम्हाला फारसे महत्त्व वाटता कामा नये आणि त्याचा तुम्हाला यत्किंचितही स्पर्श होता कामा नये. यामुळेच (हे साध्य करणे अवघड असल्यामुळेच) सर्वसंगपरित्याग करून एकांतवासात जाऊन योगसाधना करण्यापेक्षा, व्यक्तीला तिच्या नेहमीच्या परिस्थितीमध्ये राहून योगसाधना करणे हे सहसा अधिक अवघड असते. हे खरोखरच जास्त कठीण असते, पण आपण येथे सोप्या गोष्टी करण्यासाठी आलेलो नाही. रुपांतरणाचा विचारच ज्यांच्या मनाला शिवत नाही त्यांच्यासाठी आपण त्या गोष्टी सोडून देऊ.

– श्रीमाताजी (CWM 04 : 377-378)

विचार शलाका – २४

व्यक्तीने आपले एक पाऊल एकीकडे आणि दुसरे पाऊल दुसरीकडेच तर पडत नाही ना, आपापल्या मार्गाने जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या बोटींमध्ये तर आपण उभे नाही ना, याची काळजी घ्यावयास हवी. श्रीअरविंदांचे हेच सांगणे आहे की, व्यक्तीने ‘दुहेरी जीवन’ (‘double life’) जगता कामा नये. तिने एक तर ही गोष्ट सोडावयास हवी किंवा ती – एकाच वेळी दोन्हींचे अनुसरण करता येत नाही….

अर्थात त्यासाठी व्यक्तीने तिच्या जीवनात असलेल्या परिस्थितीतून बाहेर पडलेच पाहिजे असे काही आवश्यक नाही; व्यक्तीने तिचा आंतरिक दृष्टिकोन मात्र पूर्णपणे बदलणे आवश्यक असते. जे करणे व्यक्तीच्या सवयीचे झाले आहे ते तिने करावयास हरकत नाही पण ते करताना दृष्टिकोन मात्र निराळा असावा. योगसाधना करण्यासाठी जीवनातील सर्व गोष्टींचा परित्याग करून एकांतवासात जाणे, एखाद्या आश्रमातच जाऊन राहणे गरजेचे आहे, असे मी म्हणत नाही. पण, एक मात्र खरे आहे की, एखादी व्यक्ती जर प्रपंचात व प्रापंचिक परिस्थितीमध्ये राहून योगाचरण करीत असेल तर ते अधिक अवघड असते, परंतु ते अधिक परिपूर्ण सुद्धा असते. कारण प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्या, सर्वसंगपरित्याग करून एकांतवासात गेलेल्या व्यक्तीसमोर उभ्या ठाकत नाहीत; कारण अशा व्यक्तीच्या बाबतीत समस्यांचे प्रमाण अगदीच कमी झालेले असते. प्रापंचिक व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते; त्याच्या भोवती असणाऱ्या, आणि ज्यांच्याशी तिचा सतत संबंध येतो त्या व्यक्तींच्या वागण्याचे आकलन न होण्यापासून याची सुरुवात होते; व्यक्तीने त्यासाठी तयार असले पाहिजे, सहनशीलता आणि अतीव अलिप्तता यांसह सुसज्ज असले पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय विचार करतात व काय बोलतात याची योगमार्गाची वाटचाल करणाऱ्या व्यक्तीने पर्वा करू नये; हा पूर्णपणे अपरिहार्य असा आरंभबिंदू असतो. तुमच्याबद्दल जग काय बोलते अथवा विचार करते, तुम्हाला ते कसे वागवते याबाबत तुम्ही पूर्णपणे निर्लिप्त असले पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय समजूत करून घेतात हे तुमच्यालेखी गौण असले पाहिजे आणि त्याचा तुम्हाला यत्किंचितही स्पर्श होता कामा नये. याच कारणामुळे, सर्वसंगपरित्याग करून एकांतवासात जाऊन योगसाधना करण्यापेक्षा, व्यक्तीला तिच्या सभोवताली असलेल्या नेहमीच्या परिस्थितीमध्ये राहून योगसाधना करणे हे सहसा अधिक अवघड असते. हे खरोखरच जास्त अवघड असते, पण आपण येथे (आश्रमात) सोप्या गोष्टी करण्यासाठी आलेलोच नाही.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 377-378)