धम्मपद : बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या खुरामागोमाग ज्याप्रमाणे बैलगाडीची चाके जातात त्याचप्रमाणे, व्यक्ती जर दुष्ट मनाने बोलत वा वागत असेल तर, त्याच्या पाठी दुःखभोग लागतात.
श्रीमाताजी : सद्यकालीन विश्वात, सामान्य मानवी जीवन हे मनाच्या सत्तेने चालते; त्यामुळे मनावर ताबा मिळविणे, संयम मिळविणे ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे; म्हणून आपले मन विकसित करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण धम्मपदातील साधनामार्गाचे क्रमश: अनुसरण करू.
एका पाठीमागून एक येणाऱ्या अशा चार प्रक्रिया आहेत, परंतु शेवटी त्या एकाच वेळीही घडून येऊ शकतात. स्वत:च्या विचारांचे निरीक्षण करणे ही पहिली, त्या विचारांवर बारकाईने लक्ष ठेवून राहणे ही दुसरी, विचार नियंत्रित करणे ही तिसरी आणि विचारांवर प्रभुत्व मिळविणे ही चौथी प्रक्रिया होय.
निरीक्षण, पाळत, नियंत्रण व प्रभुत्व. दुष्प्रवृत्त मनापासून सुटका करून घेण्यासाठी, हे सारे करावयाचे कारण आपल्याला असे सांगण्यात आले आहे की, नांगरणाऱ्या बैलाच्या खुरांच्या पाठोपाठ बैलगाडीची चाके जातात त्याप्रमाणे जी व्यक्ती वाईट मनाने बोलत वा वागत असते, तिच्यापाठोपाठ दुःखभोग चालत येतात.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 183)