Tag Archive for: श्रद्धा

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

(उत्तरार्ध)

एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली नाही किंवा जी अद्यापि प्रत्यक्षात उतरलेली नाही; परंतु ती सत्य आहे आणि अनुसरण्यास किंवा साध्य करून घेण्यास परमयोग्य आहे याची जाणीव आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ‘ज्ञात्या‌’ला असते. अगदी कोणतेही संकेत मिळालेले नसतानासुद्धा ज्ञात्याला तशी जाणीव असते. त्या गोष्टीबाबत असणारे आत्म्याचे साक्षित्व म्हणजे श्रद्धा! मनामध्ये जरी त्या गोष्टीबाबत अगदी ठाम विश्वास नसला किंवा प्राण जरी त्याविरुद्ध झगडत असला, बंड करत असला किंवा त्या गोष्टीस नकार देत असला तरीसुद्धा आपल्या अंतरंगातील ती गोष्ट तशीच टिकून राहू शकते.

योगसाधना करणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी निराशेच्या, अपयशाच्या, अविश्वासाच्या आणि अंधकाराच्या प्रदीर्घ कालावधीस सामोरे जावे लागलेले असते. परंतु त्याच्याठायी अशी एक गोष्ट असते की, जी त्याला आधार देते व त्यामुळे तो टिकून राहतो आणि स्वतःबाबत साशंकता असतानासुद्धा, तो मार्गक्रमण करत राहतो. कारण त्याच्या श्रद्धेला असे जाणवत असते, किंबहुना त्याला हे ज्ञात असते की, तो ज्याचे अनुसरण करत आहे ते आजही सत्यच आहे. ईश्वर अस्तित्वात आहे आणि जिचे अनुसरण केले पाहिजे अशी ईश्वर हीच एकमेव गोष्ट आहे, हे त्याला ज्ञात असते. त्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्यायोग्य नाही, जिवामध्ये उपजत असणारी ही श्रद्धाच, योग‌मार्गामधील मूलभूत श्रद्धा असते.

तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या योगा‌कडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत पावलेली नाही किंवा मंदावलेली नाही. (उलट) ती अधिक दृढ आणि स्थायी झालेली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ही श्रद्धा टिकून असते, तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी पात्र असते. मी तर असेही म्हणेन की, त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कितीही अडथळे असले, तिची प्रकृती अडीअडचणी व नकारांनी अगदी कितीही ठासून भरलेली असली आणि अनेक वर्षे जरी त्या व्यक्तीला संघर्ष करावा लागलेला असला तरीसुद्धा, तिला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 93)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

(पूर्वार्ध)

श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या आधीपासूनच अस्तित्वात असते. सर्वसाधारणपणे असे आढळते की, व्यक्ती अनुभवाच्या बळावर नाही, तर श्रद्धेच्या बळावर योगसाधनेला सुरुवात करते. ही गोष्ट फक्त योगमार्ग आणि आध्यात्मिक जीवनाबाबतीतच लागू पडते असे नाही; तर ती सामान्य जीवनात सुद्धा लागू पडते. कार्यप्रवण व्यक्ती, संशोधक, नवज्ञान-शोधक (inventors), ज्ञाननिर्माते (त्यांच्या वाटचालीला) सुरुवात करतात ती श्रद्धेनेच. जोपर्यंत एखादी गोष्ट सिद्ध होत नाही किंवा घडून येत नाही तोपर्यंत अगदी निराशा जरी आली, अपयश आले, किंवा विरोधी पुरावा सापडला, नकार मिळाला तरीदेखील ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहतात; कारण त्यांच्यामधीलच कोणीतरी त्यांना सांगत असते की, (तुम्ही ज्याचा पाठपुरावा करत आहात) त्यामध्ये तथ्य आहे, त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे, ती गोष्ट साध्य केली पाहिजे.

अंधश्रद्धा चुकीची नाही का, असे रामकृष्ण परमहंस यांना विचारले असता, ते तर पुढे जाऊन असे म्हणाले की, श्रद्धा एकाच प्रकारची असू शकते आणि ती म्हणजे अंधश्रद्धा. कारण श्रद्धा ही एकतर अंधच असते अन्यथा ती श्रद्धाच नसते, मग ती इतर काहीतरी असते – मग ते तर्कशुद्ध अनुमान असेल, पुराव्याने सिद्ध केलेली प्रचिती असेल किंवा स्थापित झालेले ज्ञान असेल. (उत्तरार्ध उद्याच्या भागात)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 92-93)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही. मला असे वाटते की, (जे लोक अमुक एका गोष्टीला अंधश्रद्धा असे संबोधतात) त्या गोष्टीवर ते पुराव्याविना विश्वास ठेवणार नाहीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असावा. परंतु पुराव्यानंतर जो निष्कर्ष निघतो तो निष्कर्ष म्हणजे श्रद्धा नसते, तर तो निष्कर्ष म्हणजे एक मानसिक प्रचिती असते किंवा तो त्यातून झालेला बोध असतो.

श्रद्धा ही अशी एक गोष्ट असते की, जी पुराव्याच्या किंवा ज्ञानाच्या आधी व्यक्तीकडे असते आणि ज्ञानाप्रत किंवा अनुभूतीप्रत घेऊन जाण्यासाठी ती तुम्हाला मदत करते. ईश्वर अस्तित्वात आहे याचा कोणताही पुरावा देता येत नाही, परंतु जर माझी त्यावर श्रद्धा असेल तर, मला दिव्यत्वाची अनुभूती येऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 91)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे. जे सत्य मनाला अजूनपर्यंत ज्ञान म्हणून कवळता आलेले नाही त्या सत्याची एक झलक म्हणजे श्रद्धा.

*

साधकाने आध्यात्मिक गोष्टींवर श्रद्धा ठेवावी अशी त्याच्याकडून अपेक्षा केली जाते; पण ती श्रद्धा अज्ञानमय नव्हे तर प्रकाशमय असणे अपेक्षित असते. त्याने अंधकारावर नव्हे तर, प्रकाशावर श्रद्धा ठेवणे अपेक्षित असते. ही श्रद्धा बाह्य रंगरूपांकडून किंवा दृश्यमान तथ्यांकडून मार्गदर्शन घेण्यास नकार देते (ही श्रद्धा बाह्य रंगरूपांना किंवा दृश्यमान तथ्यांना भुलून, त्यांच्या आधारे निर्णय घेत नाही.) कारण त्या पाठीमागे असणारे सत्य तिला दिसत असते. ही श्रद्धा साक्षी, पुरावे यांच्या कुबड्या घेऊन चालत नाही आणि म्हणून शंकेखोर बुद्धीला ती अंधश्रद्धा आहे असे वाटत असते.

(वास्तविक) ती श्रद्धा म्हणजे अंतर्ज्ञान असते. अनुभवाने तिला समर्थन पुरवावे म्हणून हे अंतर्ज्ञान वाट पाहते आणि हे अंतर्ज्ञानच (साधकाला) त्या अनुभवाप्रत घेऊन जाते. मी जर स्वतःला तंदुरुस्त करण्यासाठी, स्वतःच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवत असेन तर, कालांतराने का होईना पण त्याचे मार्ग माझे मला सापडतील. त्याचप्रमाणे, माझी जर रूपांतरणावर श्रद्धा असेल तर, रूपांतरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची उकल करून घेऊन, मी ते साध्य करून घेऊ शकेन.

पण मी जर मनात शंका उपस्थित करूनच (साधनेला) प्रारंभ केला आणि ती शंका मनात तशीच बाळगून वाटचाल केली तर त्या मार्गावर मी कुठवर प्रगत होऊ शकेन? हा प्रश्नच आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 91), (CWSA 28 : 349)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १९

(आपण मागच्या भागात आंतरिक व बाह्य समर्पण यातील फरक थोडक्यात समजावून घेतला. आज आता आंतरिक समर्पणाविषयी अधिक जाणून घेऊ या.)

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आंतरिक समर्पणाचा गाभा आहेत.

”मला दुसरेतिसरे काहीही नको, केवळ ईश्वरच हवा, असा दृष्टिकोन व्यक्ती अंगीकारते… मी ईश्वराला संपूर्णपणे समर्पित होऊ इच्छितो आणि ती माझ्या आत्म्याचीच मागणी असल्याने, इतर काहीही नको, तर फक्त तोच हवा. मी त्याला भेटेन, मी त्याचा साक्षात्कार करून घेईन. मी त्याव्यतिरिक्त इतर काहीही मागणार नाही. ज्यामुळे, मला त्याच्या सन्निध जाता येईल असे कार्य त्याने माझ्यामध्ये करावे; मग ते कार्य गुप्त असेल अथवा उघड असेल, ते पडद्याआडून असेल किंवा प्रकट असेल, ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. सर्व गोष्टी, मी म्हणतो त्या पद्धतीनेच आणि तेव्हाच घडायला हव्यात असा आग्रह मी धरणार नाही. त्याने त्याच्या त्याच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीने सारे काही करावे. मी त्याच्यावर विश्वास ठेवेन. त्याची इच्छा प्रमाण मानेन, त्याच्या प्रकाशाची, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या आनंदाची, अविचलपणे अभीप्सा बाळगेन. कितीही अडचणी आल्या, कितीही विलंब लागला तरी मी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहीन आणि हा मार्ग कधीही सोडणार नाही. माझे मन शांत होऊ दे व त्या ईश्वराकडे वळू दे आणि त्याने माझे मन त्याच्या प्रकाशाप्रत खुले करू देत; माझा प्राण शांत होऊ दे आणि केवळ त्याच्याकडेच वळू दे, त्याने त्या प्राणाला त्याच्या शांतीप्रत आणि त्याच्या आनंदाप्रत खुले करू देत. सारे काही त्याच्यासाठीच आणि मी स्वतःसुद्धा त्याच्यासाठीच आहे. काहीही झाले तरी, मी ही अभीप्सा आणि आत्मदान दृढ ठेवीन आणि ते घडून येईलच अशा पूर्ण विश्वासाने वाटचाल करत राहीन.”

व्यक्तीने हा दृष्टिकोन चढत्यावाढत्या प्रमाणात बाळगला पाहिजे. कारण या गोष्टी एकदम एकाच वेळी परिपूर्ण होणे शक्य नसते; मानसिक व प्राणिक गतिविधी त्यांच्या आड येत राहतात. पण व्यक्ती जर वरीलप्रमाणे इच्छा बाळगेल, तर त्या गोष्टी व्यक्तीमध्ये वृद्धिंगत होत राहतील. उर्वरित गोष्टी या (ईश्वरी मार्गदर्शनाचे) आज्ञापालन करण्याचा भाग असतात; ईश्वरी मार्गदर्शन जेव्हा स्वतःला आविष्कृत करू लागते तेव्हा, व्यक्तीने स्वतःच्या मानसिक किंवा प्राणिक गतिविधींना त्यामध्ये लुडबूड करू न देता त्या मार्गदर्शनाचे पालन केले पाहिजे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 70-71)

नैराश्यापासून सुटका – ३८

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

आपल्याला काही किंमतच नाही अशी आत्म-अवमूल्यनाची (self-depreciation) अतिरंजित भावना, हताशपणा, असहाय्यता या भावना म्हणजे विरोधी शक्तींच्या सूचना असतात आणि त्या सूचनांचा व्यक्तीने कधीही स्वतःमध्ये शिरकाव होऊ देता कामा नये. तुम्ही ज्या दोषांबद्दल सांगत आहात ते दोष सर्व मानवी प्रकृतीमध्ये असतातच आणि प्रत्येकच साधकाचे बाह्यवर्ती अस्तित्व हे असे दोषयुक्त असते. त्या दोषांची जाणीव होणे ही गोष्ट रूपांतरणासाठी (transformation) आवश्यक असते, परंतु ते रूपांतरणाचे कार्य चैत्य पुरुषाला (psychic being) स्वाभाविक असे म्हणजे अविचल मनाने, ईश्वरा‌विषयीच्या श्रद्धेने व समर्पणाने आणि उच्चतर चेतनेबद्दलच्या प्रगाढ अभीप्सेने केले गेले पाहिजे.

बाह्यवर्ती अस्तित्वाचे (external being) रूपांतरण ही पूर्णयोगा‌मधील सर्वात कठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी श्रद्धा, धीर, अविचलता आणि दृढ निश्चयाची आवश्यकता असते. नैराश्य वगैरे सर्व गोष्टी तुम्ही भिरकावून दिल्या पाहिजेत आणि योगमार्गावर स्थिरपणाने वाटचाल केली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 207)

नैराश्यापासून सुटका – ३७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

जे काही घडत आहे ते घडणे एक प्रकारे आवश्यकच होते आणि तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे ईश्वराला चांगले माहीत आहे, अशी चढतीवाढती श्रद्धा जर तुमच्यामध्ये असेल तर, ही मुळातच एक खूप मोठी गोष्ट आहे. त्याशिवाय तुम्ही जर कायम ध्येयाभिमुख राहण्याची इच्छा आणि कितीही अडीअडचणी आल्या किंवा वरकरणी कितीही नकार मिळाले तरी त्या सगळ्यातून तुम्हाला त्या ध्येयाच्या दिशेने नेले जात आहे, असा विश्वास यांची भर त्यामध्ये घातलीत तर, साधनेसाठी यापेक्षा अन्य कोणतेच अधिक चांगले मानसिक अधिष्ठान असू शकणार नाही. तसेच फक्त मानसिकच नव्हे तर, प्राणिक व शारीरिक चेतनेमध्येदेखील (vital and physical consciousness) हीच श्रद्धा बाणवता आली तर, निराशा येणेच एकतर शक्य नाही किंवा ती चेतनेचा भाग नसून, ती बाहेरून लादण्यात आलेली एक बाह्य गोष्ट आहे, हे तुम्हाला इतके स्पष्टपणे जाणवेल की, त्यामुळे निराशा तुमचा अजिबात ताबा घेऊ शकणार नाही.

अशा प्रकारची श्रद्धा असणे हे अतिशय उपयुक्त असे पहिले पाऊल असते. चेतनेच्या ज्या प्रतिक्रमणामुळे (reversal of consciousness) व्यक्ती गोष्टींच्या बाह्यवर्ती दृश्यमान वैशिष्ट्यांकडे पाहण्याऐवजी, त्यांच्या आंतरिक सत्याकडे पाहू लागते, त्या प्रतिक्रमणाच्या दिशेने पडलेले हे पहिले पाऊल असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 195)

नैराश्यापासून सुटका – २७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

ईश्वर जर अस्तित्वात आहे आणि त्याने जर तुम्हाला या मार्गासाठी हाक दिलेली आहे (आणि ती हाक आलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे), तर मग या सगळ्या पाठीमागे निश्चितपणे ‘ईश्वरी मार्गदर्शन‌’ असले पाहिजे आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणी असतानासुद्धा तुम्ही त्यांमधून पार व्हाल आणि या मार्गावर खात्रीपूर्वक येऊन पोहोचाल, अशी श्रद्धा तुम्ही विकसित करणे आवश्यक आहे. आणि ती तर्क व सामान्य जाणीव (common sense) यांच्याशी मिळतीजुळती देखील असेल.

तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही अशा सूचना देणाऱ्या विरोधी आवाजांकडे लक्ष देऊ नका; किंवा त्यांना प्रतिसाद देणाऱ्या अधीर, घाईगडबड करणाऱ्या प्राणिक आवाजांकडेदेखील लक्ष देऊ नका. पुष्कळ अडचणी असल्यामुळे यश मिळण्याची काही शक्यता दिसत नाही, या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तसेच ईश्वराने आत्तापर्यंत त्याचे अस्तित्व तुम्हाला जाणवू दिले नाही, त्यामुळे तो पुढेही स्वतःला कधीच प्रकट करणार नाही, अशा समजुतीवर मुळीच विश्वास ठेवू नका. ज्यांनी ज्यांनी आपले मन अतिशय महान व अवघड अशा एखाद्या ध्येयावर केंद्रित केलेले असते, त्यांची अशी भूमिका असते की, “मला यश मिळेपर्यंत मी वाटचाल करतच राहीन. मग भले कितीही अडचणी आल्या तरी, मी यशस्वी होईनच होईन.” अशीच तुमची भूमिका असू दे.

ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या मनुष्याच्या जोडीला आणखी एक गोष्ट असते, ती अशी की, “ईश्वर अस्तित्वात आहे, तो आहेच आणि जर तो अस्तित्वात आहे तर, मग मी त्याचे जे अनुसरण करत आहे, त्यामध्ये मला कधीही अपयश येऊच शकणार नाही. मला जोपर्यंत त्याचा शोध लागत नाही, तोपर्यंत कितीही दुःख वा संकटे आली तरी, त्यांवर मात करून, मी वाटचाल करतच राहीन.”

– श्रीअरविंद (CWSA 29 : 94)

नैराश्यापासून सुटका – ०३

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली नाही, किंवा जी अद्यापि प्रत्यक्षात उतरलेली नाही; परंतु ती सत्य आहे आणि अनुसरण्यास किंवा साध्य करून घेण्यास परमयोग्य आहे याची जाणीव आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ‘ज्ञात्या‌’ला असते. अगदी कोणतेही संकेत मिळालेले नसतानासुद्धा ज्ञात्याला तशी जाणीव असते. त्या गोष्टीबाबत असणारे आत्म्याचे साक्षित्व म्हणजे श्रद्धा! मनामध्ये जरी त्या गोष्टीबाबत अगदी ठाम विश्वास नसला किंवा प्राण जरी त्याबाबतीत झगडत असला, बंड करत असला किंवा त्या गोष्टीस नकार देत असला तरीसुद्धा आपल्या अंतरंगातील ती गोष्ट तशीच टिकून राहू शकते.

योगसाधना करणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी निराशेच्या, अपयशाच्या, अविश्वासाच्या आणि अंधकाराच्या प्रदीर्घ कालावधीस सामोरे जावे लागलेले असते. परंतु त्याच्याठायी अशी एक गोष्ट असते की, जी त्याला आधार देते व त्यामुळे तो टिकून राहतो आणि स्वतःबाबत साशंकता असतानासुद्धा, तो मार्गक्रमण करत राहतो. कारण त्याच्या श्रद्धेला असे जाणवत असते, किंबहुना त्याला हे ज्ञात असते की, तो ज्याचे अनुसरण करत आहे ते आजही सत्यच आहे. ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि जिचे अनुसरण केले पाहिजे अशी ‘ईश्वर’ हीच एकमेव गोष्ट आहे, हे त्याला ज्ञात असते. त्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्यायोग्य नाही, ही जिवामध्ये उपजत असणारी श्रद्धाच, योग‌मार्गामधील मूलभूत श्रद्धा असते.

तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या योगा‌कडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत पावलेली नाही किंवा मंदावलेली नाही. (उलट) ती अधिक दृढ आणि स्थायी झालेली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ही श्रद्धा टिकून असते, तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी पात्र असते. मी तर असेही म्हणेन की, त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कितीही अडथळे असले, तिची प्रकृती अडीअडचणी व नकारांनी अगदी कितीही ठासून भरलेली असली आणि अनेक वर्षे जरी त्या व्यक्तीला संघर्ष करावा लागलेला असला तरीसुद्धा, तिला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 93)

आत्मसाक्षात्कार – २१

खालील चार गोष्टींवर साक्षात्कार आधारित केला गेला पाहिजे.

१) मनाच्या वर असणाऱ्या केंद्रामध्ये उन्नत होणे
२) वैश्विक चेतनेप्रत खुले होणे
३) चैत्य खुलेपण
४) उच्चतर चेतनेचे तिच्या शांती, प्रकाश, शक्ती, ज्ञान, आनंद इत्यादीसहित अस्तित्वाच्या अगदी भौतिक स्तरापर्यंतच्या सर्व स्तरांमध्ये अवतरण होणे.

श्रीमाताजींच्या शक्ती-कार्याला तुमच्या अभीप्सेची, श्रद्धेची आणि समर्पणाची जोड देऊन, उपरोक्त साऱ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. हाच मार्ग आहे. बाकी साऱ्या गोष्टी म्हणजे या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न आहेत, आणि त्यासाठी श्रीमाताजी तुमच्यामध्ये जे कार्य करत आहेत त्यावर श्रद्धा असणे आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)