Tag Archive for: श्रद्धा

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल, प्रसन्न श्रद्धा आणि विश्वास हा साधनेसाठी सर्वोत्तम पाया असतो. उर्वरित गोष्टींसाठी साधकामध्ये अभीप्सेबरोबरच, ग्रहणशीलतेसाठी सातत्यपूर्ण असे संपूर्ण खुलेपण असणे आवश्यक असते. ही अभीप्सा उत्कट असू शकेल पण ती नेहमीच स्थिरशांत आणि अविचल असली पाहिजे. योगाचा संपूर्ण साक्षात्कार अचानक होत नाही. आधाराची (मन, प्राण व शरीर यांची) बरीच तयारी झाली की मग, साक्षात्कार होतो आणि ती तयारी होण्यासाठी कधीकधी खूप दीर्घ कालावधी लागू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 111-112)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे प्रगतीमध्ये अडथळा येतो. जोपर्यंत व्यक्तीची पुरेशी तयारी झालेली नसते तोपर्यंत त्याची आंतरिक दालनं उघडण्यास विलंब लागतो.

जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा, तुम्हाला जर निश्चलता जाणवत असेल आणि आंतरिक प्रकाश चमकून जात असेल तसेच, आंतरिक ऊर्मी इतकी अधिक वृद्धिंगत होऊ लागली असेल की त्यामुळे तुमची बाह्य गोष्टींबद्दलची आसक्ती कमी होऊ लागली असेल आणि प्राणिक अडचणींमधील जोर कमी होऊ लागला असेल तर, तीच स्वयमेव एक महान प्रगती असते.

योगमार्गाचा प्रवास हा खूप दीर्घ असतो आणि प्रचंड प्रतिकाराच्या विरोधात लढा देऊन, त्या मार्गावरील इंचइंच भूमी जिंकावी लागते. आणि त्यासाठी साधकाकडे धीर आणि एक-लक्ष्यी चिकाटी असणे आवश्यक असते. तसेच, कितीही अडचणी आल्या, विलंब झाला किंवा वरकरणी अपयश येताना दिसले तरीही, त्या सगळ्यामधूनही दृढ राहू शकेल अशी श्रद्धा साधकामध्ये असणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 110)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे असे दिसते. जो कोणी श्रद्धेने आणि विश्वासाने नामस्मरण करतो त्या प्रत्येकाला जसा अनुभव येतो तसाच तुमचा हा अनुभव आहे. एखादी व्यक्ती संरक्षणासाठी जेव्हा अगदी हृदयापासून धावा करते तेव्हा तो धावा कधीच निष्फळ ठरत नाही.

तुमच्यामध्ये जी श्रद्धा आहे ती कोणत्याही बाह्य परिस्थितीमुळे कधीच विचलित होऊ देऊ नका. कारण सर्व प्रकारच्या प्रसंगांमधून, अडचणींमधून वाट काढत, ध्येयाप्रत घेऊन जाण्याचे सामर्थ्य या श्रद्धेशिवाय अन्य कोणत्याच गोष्टीमध्ये नसते. ज्ञान आणि तपस्येमध्ये कितीही ताकद असली तरीही, ती श्रद्धेपेक्षा काकणभर उणीच ठरते. श्रद्धा ही साधकासाठी त्याच्या योगमार्गावरील वाटचालीसाठी सर्वात मजबूत असा आधार असते.

तुमच्यावर श्रीमाताजींची प्रेममय दृष्टी आहे आणि त्यांचे संरक्षक-छत्र तुमच्यावर आहे. त्यावर भरवसा ठेवा आणि त्याप्रत अधिकाधिक खुले व्हा. तसे केलेत तर ते संरक्षक-छत्र तुमच्यावरील सर्व आघात पळवून लावेल आणि तुम्हाला कवेत घेईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 308)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

(मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन का देत नाहीये? असा प्रश्न एका साधकाने विचारला असावा, असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही असे म्हटले पाहिजे की, “मला फक्त ईश्वरच हवा आहे, त्यामुळे मला यशाची खात्री आहे. मी फक्त त्याकडे पूर्ण विश्वासाने वाटचाल केली पाहिजे म्हणजे मग तो माझ्याही नकळत मला, स्वतःच्या हाताने त्याच्या स्वतःच्या मार्गावर आणि त्याने निर्धारित केलेल्या वेळी निश्चितपणे घेऊन जाईल.” हा तुमचा नित्य-मंत्र असला पाहिजे. आणि खरे तर, करण्यासारखी हीच एकमेव तर्कशुद्ध आणि सयुक्तिक गोष्ट आहे. कारण या व्यक्तिरिक्त कोणतीही गोष्ट करणे म्हणजे लक्षणीय स्वरूपाचा तर्कहीन विरोधाभास असतो.

हे जग म्हणजे कायम मानवसमूहांची युद्धभूमीच राहणार का, त्याव्यतिरिक्त हे जग दुसरे काही असूच शकणार नाही का? यासारख्या इतर कोणत्याही गोष्टींबाबत व्यक्ती शंका उपस्थित करू शकते. कारण या शंका तर्कसंगत असू शकतात. पण जी व्यक्ती केवळ एका ईश्वराचीच आस बाळगते ती व्यक्ती ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

प्रत्येक साधकाच्या हृदयाच्या तळाशी ही श्रद्धा असणे आवश्यकच आहे. कारण या वाटचालीमध्ये साधक जर समजा अडखळून पडला, त्याला काही आघात सहन करावा लागला, त्याला जर अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले तर, त्या प्रत्येक वेळी ही श्रद्धाच त्याला साहाय्य करून, तारून नेते.

(पण) तुमच्या मनावर अजूनही मिथ्या संकल्पनाचे सावट आहे आणि त्यामुळे तुमच्यामध्ये श्रद्धा निर्माण होण्यामध्ये अडचण येत आहे. या मिथ्या संकल्पना एकदाच कायमच्या दूर करा आणि या साध्यासरळ आंतरिक सत्याकडे अगदी साधेपणाने व सरळपणाने पाहा, म्हणजे मग, तुमच्या अडचणीच्या मूळ कारणाचाच बिमोड होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 97)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

(उत्तरार्ध)

एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली नाही किंवा जी अद्यापि प्रत्यक्षात उतरलेली नाही; परंतु ती सत्य आहे आणि अनुसरण्यास किंवा साध्य करून घेण्यास परमयोग्य आहे याची जाणीव आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ‘ज्ञात्या‌’ला असते. अगदी कोणतेही संकेत मिळालेले नसतानासुद्धा ज्ञात्याला तशी जाणीव असते. त्या गोष्टीबाबत असणारे आत्म्याचे साक्षित्व म्हणजे श्रद्धा! मनामध्ये जरी त्या गोष्टीबाबत अगदी ठाम विश्वास नसला किंवा प्राण जरी त्याविरुद्ध झगडत असला, बंड करत असला किंवा त्या गोष्टीस नकार देत असला तरीसुद्धा आपल्या अंतरंगातील ती गोष्ट तशीच टिकून राहू शकते.

योगसाधना करणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी निराशेच्या, अपयशाच्या, अविश्वासाच्या आणि अंधकाराच्या प्रदीर्घ कालावधीस सामोरे जावे लागलेले असते. परंतु त्याच्याठायी अशी एक गोष्ट असते की, जी त्याला आधार देते व त्यामुळे तो टिकून राहतो आणि स्वतःबाबत साशंकता असतानासुद्धा, तो मार्गक्रमण करत राहतो. कारण त्याच्या श्रद्धेला असे जाणवत असते, किंबहुना त्याला हे ज्ञात असते की, तो ज्याचे अनुसरण करत आहे ते आजही सत्यच आहे. ईश्वर अस्तित्वात आहे आणि जिचे अनुसरण केले पाहिजे अशी ईश्वर हीच एकमेव गोष्ट आहे, हे त्याला ज्ञात असते. त्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्यायोग्य नाही, जिवामध्ये उपजत असणारी ही श्रद्धाच, योग‌मार्गामधील मूलभूत श्रद्धा असते.

तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या योगा‌कडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत पावलेली नाही किंवा मंदावलेली नाही. (उलट) ती अधिक दृढ आणि स्थायी झालेली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ही श्रद्धा टिकून असते, तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी पात्र असते. मी तर असेही म्हणेन की, त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कितीही अडथळे असले, तिची प्रकृती अडीअडचणी व नकारांनी अगदी कितीही ठासून भरलेली असली आणि अनेक वर्षे जरी त्या व्यक्तीला संघर्ष करावा लागलेला असला तरीसुद्धा, तिला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 93)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

(पूर्वार्ध)

श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या आधीपासूनच अस्तित्वात असते. सर्वसाधारणपणे असे आढळते की, व्यक्ती अनुभवाच्या बळावर नाही, तर श्रद्धेच्या बळावर योगसाधनेला सुरुवात करते. ही गोष्ट फक्त योगमार्ग आणि आध्यात्मिक जीवनाबाबतीतच लागू पडते असे नाही; तर ती सामान्य जीवनात सुद्धा लागू पडते. कार्यप्रवण व्यक्ती, संशोधक, नवज्ञान-शोधक (inventors), ज्ञाननिर्माते (त्यांच्या वाटचालीला) सुरुवात करतात ती श्रद्धेनेच. जोपर्यंत एखादी गोष्ट सिद्ध होत नाही किंवा घडून येत नाही तोपर्यंत अगदी निराशा जरी आली, अपयश आले, किंवा विरोधी पुरावा सापडला, नकार मिळाला तरीदेखील ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहतात; कारण त्यांच्यामधीलच कोणीतरी त्यांना सांगत असते की, (तुम्ही ज्याचा पाठपुरावा करत आहात) त्यामध्ये तथ्य आहे, त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे, ती गोष्ट साध्य केली पाहिजे.

अंधश्रद्धा चुकीची नाही का, असे रामकृष्ण परमहंस यांना विचारले असता, ते तर पुढे जाऊन असे म्हणाले की, श्रद्धा एकाच प्रकारची असू शकते आणि ती म्हणजे अंधश्रद्धा. कारण श्रद्धा ही एकतर अंधच असते अन्यथा ती श्रद्धाच नसते, मग ती इतर काहीतरी असते – मग ते तर्कशुद्ध अनुमान असेल, पुराव्याने सिद्ध केलेली प्रचिती असेल किंवा स्थापित झालेले ज्ञान असेल. (उत्तरार्ध उद्याच्या भागात)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 92-93)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही. मला असे वाटते की, (जे लोक अमुक एका गोष्टीला अंधश्रद्धा असे संबोधतात) त्या गोष्टीवर ते पुराव्याविना विश्वास ठेवणार नाहीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असावा. परंतु पुराव्यानंतर जो निष्कर्ष निघतो तो निष्कर्ष म्हणजे श्रद्धा नसते, तर तो निष्कर्ष म्हणजे एक मानसिक प्रचिती असते किंवा तो त्यातून झालेला बोध असतो.

श्रद्धा ही अशी एक गोष्ट असते की, जी पुराव्याच्या किंवा ज्ञानाच्या आधी व्यक्तीकडे असते आणि ज्ञानाप्रत किंवा अनुभूतीप्रत घेऊन जाण्यासाठी ती तुम्हाला मदत करते. ईश्वर अस्तित्वात आहे याचा कोणताही पुरावा देता येत नाही, परंतु जर माझी त्यावर श्रद्धा असेल तर, मला दिव्यत्वाची अनुभूती येऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 91)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे. जे सत्य मनाला अजूनपर्यंत ज्ञान म्हणून कवळता आलेले नाही त्या सत्याची एक झलक म्हणजे श्रद्धा.

*

साधकाने आध्यात्मिक गोष्टींवर श्रद्धा ठेवावी अशी त्याच्याकडून अपेक्षा केली जाते; पण ती श्रद्धा अज्ञानमय नव्हे तर प्रकाशमय असणे अपेक्षित असते. त्याने अंधकारावर नव्हे तर, प्रकाशावर श्रद्धा ठेवणे अपेक्षित असते. ही श्रद्धा बाह्य रंगरूपांकडून किंवा दृश्यमान तथ्यांकडून मार्गदर्शन घेण्यास नकार देते (ही श्रद्धा बाह्य रंगरूपांना किंवा दृश्यमान तथ्यांना भुलून, त्यांच्या आधारे निर्णय घेत नाही.) कारण त्या पाठीमागे असणारे सत्य तिला दिसत असते. ही श्रद्धा साक्षी, पुरावे यांच्या कुबड्या घेऊन चालत नाही आणि म्हणून शंकेखोर बुद्धीला ती अंधश्रद्धा आहे असे वाटत असते.

(वास्तविक) ती श्रद्धा म्हणजे अंतर्ज्ञान असते. अनुभवाने तिला समर्थन पुरवावे म्हणून हे अंतर्ज्ञान वाट पाहते आणि हे अंतर्ज्ञानच (साधकाला) त्या अनुभवाप्रत घेऊन जाते. मी जर स्वतःला तंदुरुस्त करण्यासाठी, स्वतःच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवत असेन तर, कालांतराने का होईना पण त्याचे मार्ग माझे मला सापडतील. त्याचप्रमाणे, माझी जर रूपांतरणावर श्रद्धा असेल तर, रूपांतरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची उकल करून घेऊन, मी ते साध्य करून घेऊ शकेन.

पण मी जर मनात शंका उपस्थित करूनच (साधनेला) प्रारंभ केला आणि ती शंका मनात तशीच बाळगून वाटचाल केली तर त्या मार्गावर मी कुठवर प्रगत होऊ शकेन? हा प्रश्नच आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 91), (CWSA 28 : 349)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १९

(आपण मागच्या भागात आंतरिक व बाह्य समर्पण यातील फरक थोडक्यात समजावून घेतला. आज आता आंतरिक समर्पणाविषयी अधिक जाणून घेऊ या.)

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आंतरिक समर्पणाचा गाभा आहेत.

”मला दुसरेतिसरे काहीही नको, केवळ ईश्वरच हवा, असा दृष्टिकोन व्यक्ती अंगीकारते… मी ईश्वराला संपूर्णपणे समर्पित होऊ इच्छितो आणि ती माझ्या आत्म्याचीच मागणी असल्याने, इतर काहीही नको, तर फक्त तोच हवा. मी त्याला भेटेन, मी त्याचा साक्षात्कार करून घेईन. मी त्याव्यतिरिक्त इतर काहीही मागणार नाही. ज्यामुळे, मला त्याच्या सन्निध जाता येईल असे कार्य त्याने माझ्यामध्ये करावे; मग ते कार्य गुप्त असेल अथवा उघड असेल, ते पडद्याआडून असेल किंवा प्रकट असेल, ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. सर्व गोष्टी, मी म्हणतो त्या पद्धतीनेच आणि तेव्हाच घडायला हव्यात असा आग्रह मी धरणार नाही. त्याने त्याच्या त्याच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीने सारे काही करावे. मी त्याच्यावर विश्वास ठेवेन. त्याची इच्छा प्रमाण मानेन, त्याच्या प्रकाशाची, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या आनंदाची, अविचलपणे अभीप्सा बाळगेन. कितीही अडचणी आल्या, कितीही विलंब लागला तरी मी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहीन आणि हा मार्ग कधीही सोडणार नाही. माझे मन शांत होऊ दे व त्या ईश्वराकडे वळू दे आणि त्याने माझे मन त्याच्या प्रकाशाप्रत खुले करू देत; माझा प्राण शांत होऊ दे आणि केवळ त्याच्याकडेच वळू दे, त्याने त्या प्राणाला त्याच्या शांतीप्रत आणि त्याच्या आनंदाप्रत खुले करू देत. सारे काही त्याच्यासाठीच आणि मी स्वतःसुद्धा त्याच्यासाठीच आहे. काहीही झाले तरी, मी ही अभीप्सा आणि आत्मदान दृढ ठेवीन आणि ते घडून येईलच अशा पूर्ण विश्वासाने वाटचाल करत राहीन.”

व्यक्तीने हा दृष्टिकोन चढत्यावाढत्या प्रमाणात बाळगला पाहिजे. कारण या गोष्टी एकदम एकाच वेळी परिपूर्ण होणे शक्य नसते; मानसिक व प्राणिक गतिविधी त्यांच्या आड येत राहतात. पण व्यक्ती जर वरीलप्रमाणे इच्छा बाळगेल, तर त्या गोष्टी व्यक्तीमध्ये वृद्धिंगत होत राहतील. उर्वरित गोष्टी या (ईश्वरी मार्गदर्शनाचे) आज्ञापालन करण्याचा भाग असतात; ईश्वरी मार्गदर्शन जेव्हा स्वतःला आविष्कृत करू लागते तेव्हा, व्यक्तीने स्वतःच्या मानसिक किंवा प्राणिक गतिविधींना त्यामध्ये लुडबूड करू न देता त्या मार्गदर्शनाचे पालन केले पाहिजे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 70-71)

नैराश्यापासून सुटका – ३८

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

आपल्याला काही किंमतच नाही अशी आत्म-अवमूल्यनाची (self-depreciation) अतिरंजित भावना, हताशपणा, असहाय्यता या भावना म्हणजे विरोधी शक्तींच्या सूचना असतात आणि त्या सूचनांचा व्यक्तीने कधीही स्वतःमध्ये शिरकाव होऊ देता कामा नये. तुम्ही ज्या दोषांबद्दल सांगत आहात ते दोष सर्व मानवी प्रकृतीमध्ये असतातच आणि प्रत्येकच साधकाचे बाह्यवर्ती अस्तित्व हे असे दोषयुक्त असते. त्या दोषांची जाणीव होणे ही गोष्ट रूपांतरणासाठी (transformation) आवश्यक असते, परंतु ते रूपांतरणाचे कार्य चैत्य पुरुषाला (psychic being) स्वाभाविक असे म्हणजे अविचल मनाने, ईश्वरा‌विषयीच्या श्रद्धेने व समर्पणाने आणि उच्चतर चेतनेबद्दलच्या प्रगाढ अभीप्सेने केले गेले पाहिजे.

बाह्यवर्ती अस्तित्वाचे (external being) रूपांतरण ही पूर्णयोगा‌मधील सर्वात कठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी श्रद्धा, धीर, अविचलता आणि दृढ निश्चयाची आवश्यकता असते. नैराश्य वगैरे सर्व गोष्टी तुम्ही भिरकावून दिल्या पाहिजेत आणि योगमार्गावर स्थिरपणाने वाटचाल केली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 207)