Tag Archive for: वेदना

तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो, तुम्हाला एखादी गोष्ट वेदनादायी किंवा अगदी अस्वस्थ करणारी वाटत असते, अशा वेळी जर तुम्ही काळाच्या (time) अनंततेचा आणि अवकाशाच्या (space) असीमतेचा विचार करायला सुरुवात केलीत, आजवर जे काही घडून गेले आहे आणि येथून पुढे जे घडणार आहे, त्याचा तुम्ही विचार केलात आणि आत्ताचा क्षण हा अनंत काळामधील खरोखरच एका श्वासाइतकाच आहे असा तुम्ही विचार केलात तर, काळाच्या अनंततेमध्ये असणाऱ्या या एका एवढ्याशा क्षणामुळे अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच हास्यास्पद वाटू लागेल. …खरोखरच, काळाच्या अनंततेमध्ये एका क्षणाचे मोल ते काय? खरोखरच व्यक्तीला हे प्रत्यक्षात उतरवता आले तर….

डोळ्यांसमोर चित्र आणा की, ज्या इवल्याशा पृथ्वीवर आपण वावरत असतो, ते आपण म्हणजे एक किती किरकोळ व्यक्ती आहोत आणि त्यामध्ये चेतनेचा हा एक चिमुकला कण आहे, एक क्षण आहे, ज्यामुळे आत्ता तुम्ही दुखावल्यासारख्या झाले आहात किंवा तुम्हाला तो दु:खद वाटत आहे तो क्षण डोळ्यांसमोर आणा. वास्तविक, हा क्षण तुमच्या अस्तित्वाचा एक अगदी छोटासा क्षण आहे. आणि खुद्द तुम्हीसुद्धा यापूर्वीच्या अनेक प्रसंगांमधून येथवर आलेला असता आणि यापुढेही अनेक गोष्टी घडायच्या असतात. तेव्हा ज्या गोष्टी आत्ता तुमच्यावर एवढा परिणाम करत आहेत त्या अजून दहा वर्षांनी तुम्ही कदाचित पूर्णपणे विसरून गेलेला असाल किंवा जरी अगदी त्या गोष्टी आठवल्याच तर तुम्ही स्वतःच म्हणाल की, “मी या गोष्टीला इतके का बरे महत्त्व दिले होते?”

तुम्हाला खरोखरच जाणवू लागते की, स्वतःला आणि आपल्याबाबतीत जे घडते आहे त्याला इतके महत्त्व देणे, हे किती हास्यास्पद आहे. तुम्ही जर ही गोष्ट अगदी सुयोग्य रितीने केलीत तर, अगदी तीन मिनिटांमध्ये सारे दुःख नाहीसे होईल. इतकेच काय पण एखादी अगदी तीव्र वेदनासुद्धा अशाच पद्धतीने नाहीशी होईल. त्यासाठी एकाग्रता करायची आणि स्वतःला अनंताच्या व काळाच्या पटलावर ठेवायचे. सर्व अस्वस्थता निघून जाते आणि व्यक्ती तिला भेडसावणाऱ्या त्या त्रासदायक गोष्टीपासून मोकळी होते. ही गोष्ट योग्य पद्धतीने कशी करायची हे माहीत असेल तर, व्यक्ती सर्व आसक्तीपासून आणि अगदी निरतिशय दुःखामधून बाहेर पडू शकते. ही पद्धत तुम्हाला तुमच्या क्षुद्र अहंच्या जाणिवेतून त्वरित बाहेर काढते.

– श्रीमाताजी [CWM 06 : 345-346]

(उत्तरार्ध)

आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित होऊ दिले पाहिजे आणि मग तुम्हाला असे आढळेल की तिथे सुसंवादी, प्रकाशमान, सूर्यप्रकाशित हास्याचा जणू झरा वाहत आहे आणि त्याच्यापुढे कोणत्याही सावटाला किंवा दुःखवेदनेला थाराच उरत नाही. वास्तविक, अगदी कितीही मोठ्या अडचणी, कितीही मोठी दुःखं असू देत किंवा कितीही भयंकर शारीरिक वेदना असू देत, तुम्ही जर त्यांच्याकडे तेथून, त्या दृष्टिकोनातून पाहू शकलात, तर तुम्हाला त्या अडचणीची, त्या दुःखाची, त्या वेदनेची असत्यता दिसून येईल आणि तिथे अन्य काही नाही, तर केवळ एक हर्षभरित आणि प्रकाशमय स्पंदन असल्याचे आढळून येईल.

खरेतर, अडचणींचे निराकरण करण्याचा, दुःखाचा परिहार करण्याचा आणि वेदना नाहीशी करण्याचा हा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे. यातील पहिल्या दोन गोष्टी (अडचणींचे निराकरण, दुःखाचा परिहार) या तुलनेने सोप्या आहेत. पण शारीरिक वेदना नाहीशी करणे ही गोष्ट काहीशी अधिक कठीण आहे. कारण देह आणि त्याच्या जाणिवा या अत्यंत खऱ्या व मूर्त असतात असे मानण्याची आपल्याला सवय लागलेली असते. परंतु आपला देह हा एक द्रव आहे; तो घडणसुलभ (plastic) आहे, त्यामध्ये बदल होऊ शकतो आणि तो वर्धनशील आहे असे समजण्याची आपल्याला सवय नसते. कारण ते आपण शिकलेलो नसतो इतकेच. सर्व अंधकार, सर्व अडीअडचणी, सर्व ताणतणाव, सर्व विसंवाद नाहीसे करणारे हे जे प्रकाशमान हास्य असते, आडकाठी निर्माण करणाऱ्या, शोक आणि विलाप करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा निरास करणारे, हे जे प्रकाशमान हास्य असते ते हास्य शरीरामध्ये उतरविण्यास आपण शिकलेलो नसतो.

आणि हा सूर्य, दिव्य हास्याचा हा सूर्य, प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असतो. तो त्या सर्व गोष्टींमागील सत्य असतो. हा आंतरिक सूर्य कसा पाहायचा, तो कसा अनुभवायचा आणि तो कसा जगायचा हे आपण शिकलेच पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 10 : 156)

….‘निसर्गा’मध्ये स्वतःला पूर्णतः कसे झोकून द्यायचे हे जर एखाद्याला माहीत असेल, आणि तो जर ‘निसर्गा’च्या कार्याला विरोध करत नसेल, तर तो कधीच आजारी पडणार नाही. ‘निसर्गा’ची स्वतःची अशी काही साधने असतात आणि व्यक्तीने भीतीपोटी किंवा संकोचापोटी त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही तर, निसर्ग तुम्हाला आश्चर्यकारकरित्या त्वरेने बरे करतो. ‘निसर्गा’च्या तालाशी ताल जुळवून कसे जगायचे हे व्यक्तीला समजले तर तो ‘निसर्ग’च तुम्हाला सर्व संकटांतून काळजीपूर्वकपणे बाहेर पडण्याचा मार्ग दाखवितो. ‘निसर्गा’च्या प्रवाहाबरोबर वाटचाल कशी करायची ते व्यक्तीने स्वतः शिकले पाहिजे – मग त्या लाटाच तुम्हाला अगदी हळूवारपणे तुमच्या अंतिम गंतव्यापर्यंत घेऊन जातात.

…स्वतःला झोकून देणे, ‘प्रकृती’च्या हाती स्वतःला सोपविणे, तिच्या लाटेवर प्रवाहित होणे… (असे करता आले तर) अडीअडचणी आणि धोके पूर्णतः नाहीसे होतात. जणू काही व्यक्ती स्वतःला मोकळे सोडते – पूर्णतः खुले करते – जणू काही व्यक्ती त्यावर तरंगत राहते… मग अशा या स्थितीमध्ये, पाण्याच्या तळाशी असलेल्या काळोखाकडे न पाहता, आकाशाकडे पाहत, प्रकाशाकडे पाहत, व्यक्तीने मार्गदर्शन मिळावे म्हणून स्वतःला ‘प्रकृती’च्या हाती सोपवले तर… व्यक्ती जेव्हा अशा रीतीने वागेल, तेव्हा तिला कोणतीही वेदना स्पर्श करू शकणार नाही.

– श्रीमाताजी
(Throb of Nature : 139)