Tag Archive for: महाकालीचे प्रहार

(श्रीमाताजी येथे सामान्य आघात आणि महाकालीचे प्रहार यातील फरक सांगत आहेत…)

साधक : एखाद्या व्यक्तीला किती आघात सहन करावे लागणार त्यांचे प्रमाण हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते का?

श्रीमाताजी : हो, ते त्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणजे मी म्हटले त्याप्रमाणे ते तिच्या प्रगती करण्याच्या क्षमतेवर, तिच्या सामर्थ्यावर आणि ईश्वरी शक्तीला तिच्याकडून होणाऱ्या प्रतिरोधावर अवलंबून असते. ज्यांना या आघातांची आवश्यकता नसते असे फारच थोडे जण असतात.

साधक : महाकालीच्या आघाताचे स्वरूप कसे असते?

श्रीमाताजी : महाकालीने केलेल्या प्रहारामुळे तुम्हाला खूप आनंद होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये एक गोडशी ऊब जाणवते. तुम्हाला समाधान वाटते.

साधक : व्यक्तीने तशा प्रहाराची इच्छा बाळगली पाहिजे का? की तो प्रहार आपोआपच होतो?

श्रीमाताजी : हो, व्यक्तीला प्रगती करण्याची खरोखरच इच्छा असली पाहिजे, त्या इच्छेमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. व्यक्तीने खरोखर अगदी प्रामाणिकपणे असे म्हटले पाहिजे, “हो, मला प्रगती करायची आहे”, “काहीही झाले तरी मला प्रगती करायची आहे.” तेव्हा मग महाकालीकडून प्रहार केला जातो. परंतु मी म्हटले त्याप्रमाणे, ज्यामध्ये उत्कट आनंदाची धारणा असते अशा समृद्धीच्या शक्तीसहित तो आघात होतो.

तुम्ही जर एकदा निर्णय घेतला असेल, उदाहरणार्थ, स्वतःमधील एखादी चुकीची सवय थांबविण्याचा तुम्ही निश्चय केला असेल, किंवा तुम्ही जी चूक एकदा केली होती तीच पुन्हा न करण्याचा निश्चय केला असेल किंवा करायला अवघड वा अशक्यप्राय आहे आणि तरीही ती केली पाहिजे, अशी कोणतीतरी गोष्ट करण्याचा निर्णय तुम्ही घेतला असेल आणि असा निर्णय घेऊन, स्वतःच्या इच्छेबाबत तुमच्यापाशी पूर्ण प्रामाणिकपणा असेल तर, अशा वेळी तुम्ही जे करायचे ठरविले आहे तेच करण्यास भाग पाडण्यासाठी तुमच्यावर जर प्रचंड आघात झाला, तर तो आघातच असतो पण तेव्हा तुम्हाला तुमचा गौरव झाल्यासारखे वाटते, तुम्ही आनंदी होता, तुम्हाला हृदयामध्ये काहीतरी भव्योदात्त असे वाटू लागते. (कारण तो महाकालीचा प्रहार असतो.)

निव्वळ बाह्यवर्ती, यांत्रिक, भौतिक चेतनेमध्ये आणि अज्ञानदशेमध्ये जीवन जगत असताना, ज्या ज्या मूर्खपणाच्या गोष्टी तुम्ही करता, त्याचे स्वाभाविक परिणाम म्हणून अटळपणे व अघटितपणे तुमच्यावर होणारे आघात आणि तुम्ही स्वतःवर प्रभुत्व मिळविण्याचा निश्चय केल्यानंतर, तुम्ही ज्या उच्चतर अवस्थेत उन्नत होता आणि काहीही झाले तरी, सत्याच्या चेतनेमध्येच जीवन व्यतीत करायचा तुम्ही निर्धार करता, प्रगतीसाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण प्रगती करायचीच, असे जेव्हा तुम्ही ठरविता तेव्हा अशा तुमच्या उच्चतर अवस्थेमध्ये, तुमच्यावर होणारे आघात यांमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते.

या उच्चतर अवस्थेमध्ये तुमच्या बाबतीत ज्या घटना घडतात त्या इतक्या अर्थपूर्ण असतात की, तुम्हाला त्या घटनांमध्ये दीप्तिमान असणारे सत्य स्पष्टपणे दिसून येते; जणू काही तुम्हाला दीपस्तंभ दिसावा त्याप्रमाणे तुमचा मार्ग उजळवून टाकणारा प्रकाश तुम्हाला दिसतो, तो प्रकाश तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि हे सारे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येते. तुमच्या पाठीवर एखादा धोंडा येऊन कोसळावा त्याप्रमाणे तो आघात तुमचा विनाश करणारा नसतो तर, त्यामध्ये उत्कट दीप्तिमानता असते. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की, फक्त पहिल्या पायरीवरच प्रयत्नांची खरी आवश्यकता असते. येथे पहिली पायरी म्हणजे त्या अज्ञानदशेच्या पातळीवरून बाहेर पडून तिच्या वर असणाऱ्या पातळीवर चढून जाणे आणि असे झाल्यानंतर मग सारे, सारे काही बदलून जाते. परंतु व्यक्तीने त्या पातळीवरून पूर्णतः बाहेर पडले पाहिजे, तिने तिथेच थांबून राहता कामा नये, व्यक्तीने दोन दगडांवर पाय ठेवता कामा नये, कारण तसे चालत नाही.

– श्रीमाताजी (CWM 06 : 324-326)

(महाकालीचे प्रहार कधीकधी व्यक्तीच्या प्रगतीसाठी आवश्यक का असतात त्याचे कारण कालच्या भागात आपण विचारात घेतले. त्यावर एका साधकाने शंका विचारली आहे.)

साधक : मग व्यक्तीवर सर्व आघात एकदमच का होत नाहीत?

श्रीमाताजी : तसे झाले तर ते तुम्हाला मारक ठरेल. कारण तो प्रहार जर तुम्हाला वठणीवर आणण्याइतपत पुरेसा जोरदार असेल तर तो तुम्हाला चिरडूनदेखील टाकू शकेल. तुमचं अगदी चिपाड होऊन जाईल. परंतु तुम्ही जर थोडी थोडी प्रगती करत राहिलात, आज थोडी, उद्या थोडी अशी क्रमाक्रमाने प्रगती करत राहाल, ते आघात पचवत राहाल तर मग तुम्ही टिकून राहू शकाल.

अर्थातच ही गोष्ट आंतरिक सामर्थ्यावर, आंतरिक प्रामाणिकपणावर आणि प्रगती करण्याच्या तुमच्या क्षमतेवर, अनुभवातून शहाणपण शिकण्यावर आणि मुख्य म्हणजे, मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे ते शहाणपण विसरून न जाण्यावर अवलंबून असते. ते न विसरण्याइतपत जर व्यक्ती भाग्यवान असेल तर मग ती वेगाने प्रगती करू शकते. अशी व्यक्ती वेगाने पुढे जाऊ शकते.

आणि त्याच वेळी जर समजा व्यक्तीकडे आंतरिक नैतिक सामर्थ्य असेल तर, तिची प्रगती अधिक वेगाने सुद्धा होऊ शकते. म्हणजे समजा, व्यक्ती त्या दुःखाग्नीमुळे पोळून निघाली आणि त्याची धग कमी होऊ न देता जर ती व्यक्ती त्या दुःखाच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचली तर, तिची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. परंतु बहुसंख्य लोक एवढे सामर्थ्यशाली नसतात. उलट ते चटकन ती गोष्ट लपवून ठेवण्याचा, अगदी स्वतःपासूनसुद्धा ती गोष्ट लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. व्यक्ती स्वतःच स्वतःला अगदी क्षुद्र किरकोळ स्पष्टीकरणं देत असते. व्यक्तीने जो मूर्खपणा केलेला असतो त्यासाठी ती अनेकानेक कारणं सांगत असते. (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 06 : 324)