साधना, योग आणि रूपांतरण – ३०४
अचेतनाचे रूपांतरण
(दि. ९ एप्रिल १९४७ रोजी श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
तुम्हाला या अडचणी इतक्या तीव्रतेने भेडसावत आहेत त्याचे कारण की योगसाधना आता ‘अचेतना’च्या आधारशिलेपर्यंत येऊन पोहोचली आहे. ही अचेतनता, आत्म्याच्या व ईश्वरी कार्याच्या विजयाला (ज्या विजयाकडे तिची वाटचाल चालली आहे त्या विजयाला) व्यक्तिगत स्तरावर व या जगामध्ये जो प्रतिकार होत असतो, त्या प्रतिकाराचा मूळ आधार आहे.
या अडचणी श्रीअरविंद-आश्रमामध्ये आणि बाहेरच्या जगामध्येसुद्धा आहेत. शंकाकुशंका, हतोत्साह, श्रद्धा कमी होणे किंवा नाहीशी होणे, आदर्शाबाबत असेलला प्राणिक जोम, उत्साह क्षीण होणे, मनाचा उडालेला गोंधळ आणि भवितव्याच्या आशेला बसलेला धक्का ही या अडचणींची सर्वसाधारण अशी लक्षणं आहेत.
बाहेरच्या जगामध्ये तर त्याची यापेक्षाही अधिक वाईट लक्षणं दिसून येत आहेत. उदाहरणार्थ, नैराश्यवादामध्ये झालेली वाढ, कोणत्याच गोष्टीवर विश्वास न ठेवणे, सचोटीमध्ये घट, प्रचंड प्रमाणात होणारा भष्ट्राचार, उच्चतर गोष्टी वगळून, अन्न, पैसा, सुखसोयी, मौजमजा यांमध्येच गुंतून पडणे आणि या जगामध्ये काहीतरी वाईट घडून येणार आहे याबद्दल असलेली एक सार्वत्रिक अपेक्षा, (अशा गोष्टी जगामध्ये दिसून येत आहेत.)
या गोष्टी कितीही भयंकर असल्या तरीही त्या तात्पुरत्या आहेत. आणि या जगामधील उर्जेची कार्यप्रणाली आणि आत्म्याची कार्यप्रणाली ज्यांना ज्ञात आहे अशा व्यक्तींची यासाठी तयारी करून घेण्यात आलेली आहे. हे असे निकृष्टतम घडून येणार हे मला आधी ज्ञात झाले होते, परंतु या गोष्टी म्हणजे उषःकालापूर्वीची रात्र आहे, त्यामुळे मी नाउमेद झालेलो नाही. या अंधकारापाठीमागे कशाची तयारी चालू आहे हे मला माहीत आहे, आणि त्याच्या आगमनाच्या प्रारंभिक काही खुणा मला दिसू लागल्या आहेत, मला त्या जाणवत आहेत. जे ईश्वराचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांनी त्यांच्या शोधकार्यामध्ये चिकाटी बाळगली पाहिजे, त्यावर दृढ राहिले पाहिजे. कालांतराने हा अंधकार भेदला जाईल, नाहीसा होईल आणि ‘दिव्य प्रकाश’ उदयास येईल.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 619)