Tag Archive for: नैराश्य

नैराश्यापासून सुटका – २९

(पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमामध्ये कायमच्या वास्तव्यास येऊ इच्छिणाऱ्या पण परिस्थितीमुळे तसे करणे शक्य होत नसलेल्या एका साधकाला श्रीअरविंद मार्गदर्शन करत आहेत…)

तुमच्यावर निराशेचे, निरुत्साहाचे मळभ कधीही येऊ देऊ नका आणि ‘ईश्वरी कृपे‌’बाबत कधीही अविश्वास बाळगू नका. बाह्यत: कितीही अडचणी असू देत किंवा तुमच्या स्वत:मध्येसुद्धा कोणत्याही दुर्बलता असू देत पण, तुम्ही जर दृढ श्रद्धा आणि अभीप्सा बाळगलीत तर, ती अदृश्य ‘शक्ती‌’ तुम्हाला त्या साऱ्यामधून पार करेल आणि परत येथे (आश्रमात) घेऊन येईल.

तुम्ही विरोधामुळे आणि अडचणींमुळे अगदी खचून गेलात, जरी तुम्ही डळमळीत झालात, तुम्हाला जरी मार्ग खुंटल्यासारखा वाटला तरीसुद्धा तुमची अभीप्सा (मात्र सदोदित) जागती ठेवा. कधी तुमची श्रद्धा झाकोळल्यासारखी झाली तर, अशा वेळी नेहमीच मनाने आणि अंतःकरणातून आमच्याकडे वळा; म्हणजे ते झाकोळलेपण दूर केले जाईल. …पण मार्गावर दृढपणे वाटचाल करत राहा. मग गोष्टी स्वतःहून उलगडत जातील आणि सरतेशेवटी परिस्थिती आंतरिक चैतन्याला शरण येईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 101)

नैराश्यापासून सुटका – २८

(एका साधकाला ‘सत्या’ची हाक आलेली आहे. त्या मार्गावर वाटचाल करताना त्याची वृत्ती कशी असली पाहिजे हे श्रीअरविंद त्या साधकाला पत्राद्वारे लिहीत आहेत.)

मनामध्ये शंकाकुशंका आल्या किंवा नैराश्य आले तर असे म्हणावे की, ”ईश्वर माझा पाठीराखा आहे, मला अपयश कसे बरे येईल?” तुम्ही पुरेसे शुद्ध नाही किंवा पात्र नाही अशा सर्व सूचनांना उत्तरादाखल म्हणावे की, “मी अमृतपुत्र आहे आणि स्वत: ईश्वराने माझी निवड केली आहे. मी स्वत:शी व ईश्वराशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे आणि मी तसा प्रामाणिक राहिलो तर विजय निश्चित आहे; अगदी मी पडलो, धडपडलो तरी मी निश्चितपणे पुन्हा उभा राहीन.”

या उच्चतर ध्येयाकडे (सत्याच्या हाकेकडे) पाठ फिरवून, कोणतेतरी कनिष्ठ ध्येय पूर्ण करू पाहणाऱ्या सर्व उर्मींना उत्तर द्या की, “माझ्या अंतरंगात वसणाऱ्या आत्म्याचे ज्यामुळे समाधान होऊ शकेल असे हे सर्वात महान ध्येय आहे, एकमेव ‘सत्य’ आहे; दिव्यत्वाच्या दिशेने चाललेल्या या वाटचालीमध्ये मला कोणत्याही कसोट्यांना आणि कितीही संकटांना सामोरे जावे लागले, तरी मी धीराने त्या ध्येयापर्यंत पोहोचेनच.”

‘दिव्य प्रकाश आणि दिव्य हाक यांच्याप्रत निष्ठा‌’ याचा मला अभिप्रेत असणारा अर्थ हा असा आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 99)

नैराश्यापासून सुटका – २५

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

नैराश्यामुळे स्वत:ला निराश होऊ द्यायचे नाही, तर त्यापासून चार पावले मागे होऊन, त्याच्या कारणाचा शोध घ्यायचा आणि ते कारण दूर करायचे, हा ‘योगा’मधील एक नियम आहे. बरेचदा ते कारण तुमच्या स्वतःमध्येच असते. कदाचित कोठेतरी एखादा प्राणिक दोष असतो, एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये व्यक्ती गुंतून पडते किंवा एखादी किरकोळ इच्छा तिच्या अंगलट येते. कधीकधी इच्छेची पूर्ती केल्यामुळे तर कधी ती पूर्ण न केल्यामुळे असे घडून येते.

योगामध्ये बरेचदा असे होते की, एखादी इच्छा-वासना अपूर्ण राहिल्यामुळे जेवढे अधःपतन होते, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने अधःपतन तिच्या उपभोगामुळे किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीला डोक्यावर चढवून ठेवल्यामुळे होते. तर मग तुम्ही काय केले पाहिजे? इच्छा-वासनांची पूर्ती झाल्याचा किंवा न झाल्याचा त्रास आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (Psychic being) होत नाही; कारण ईश्वराशी असलेल्या त्याच्या सख्यत्वावर तो सुस्थिरपणे उभा असतो आणि त्याच्या खऱ्या अस्तित्वाच्या दृष्टीने या छोट्याछोट्या गोष्टींकडे, त्या परक्या असल्याप्रमाणे तो पाहत असतो. पण इच्छा-वासनांची पूर्ती झाल्याचा किंवा न झाल्याचा जास्त परिणाम बाह्यवर्ती प्राण व मन यांच्यावर होत असतो. तेव्हा बाह्यवर्ती प्राणिक व मानसिक जीवनात फारसे न राहता, तुम्ही अधिकाधिक सखोलपणे अंतरंगामध्ये राहून जीवन जगले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 189)

नैराश्यापासून सुटका – २४

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

जीवन निरर्थक झाले आहे अशा प्रकारची भावना, या प्रकारची खिन्नता तुम्ही दूर केलीच पाहिजे. जीवनात यश मिळू दे, नाहीतर अडचणी येऊ देत पण, जोपर्यंत जीवन हे ‘ईश्वराभिमुख’ असते तोपर्यंत जीवनाला काही ना काही अर्थ असतो. तुम्हाला संरक्षण पुरविले जाईल पण तुम्ही निराशा दूर केलीच पाहिजे; तसे केल्यामुळे तुम्ही शक्ती व साहाय्य स्वीकारू शकाल आणि ते उपयोगात आणू शकाल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 188)

नैराश्यापासून सुटका – २३

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुमची ही अडचण अविश्वास आणि अवज्ञेतूनच आलेली दिसते. कारण अविश्वास आणि अवज्ञा (distrust and disobedience) या गोष्टी मिथ्यत्वासारख्याच असतात. (त्या स्वतःही मिथ्या असतात आणि मिथ्या कल्पना व आवेगांवर आधारित असतात.) त्या ‘ईश्वरी शक्ती‌’च्या कार्यामध्ये ढवळाढवळ करतात. त्या गोष्टी व्यक्तीला ईश्वरी शक्तीची जाणीव होऊ देत नाहीत; तसेच ईश्वरी शक्तीचे व्यक्तीमध्ये जे कार्य चालू असते ते पूर्ण करण्यामध्ये त्या गोष्टी आडकाठी आणतात आणि त्यांच्यामुळे (तुम्हाला लाभलेली) ईश्वरी संरक्षणा‌ची शक्ती क्षीण होते.

फक्त आंतरिक एकाग्रतेच्या वेळीच नव्हे तर, तुमच्या बाह्य कृती आणि जीवनव्यवहार यांमध्येही तुम्ही योग्य दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. तुम्ही जर तसे केलेत आणि सारेकाही श्रीमाताजींच्या मार्गदर्शनानुसार केलेत तर, अडचणी कमी कमी होत चालल्या आहेत किंवा त्या अधिक सहजतेने सुटत चालल्या आहेत आणि गोष्टी अधिक सुरळीत होत चालल्या आहेत, असे तुम्हाला आढळून येईल.

तुम्ही एकाग्रचित्त होण्याच्या वेळी जे काही करता तेच तुम्ही तुमच्या कर्मामध्ये आणि कृतींमध्येही केले पाहिजे. श्रीमाताजींप्रति खुले व्हा, तुमच्या सर्व कृती त्यांच्या मार्गदर्शनानुसार करा; शांती, साहाय्यक शक्ती‌, संरक्षण लाभावे यासाठी त्यांना आवाहन करा आणि त्यांना तुमच्यामध्ये कार्य करता यावे म्हणून सर्व चुकीच्या प्रभावांना नकार द्या. (अन्यथा) हे प्रभाव चुकीच्या, निष्काळजी किंवा चेतनारहित गतीविधींद्वारे मार्गामध्ये अडथळा ठरू शकतात. या तत्त्वाचे अनुसरण करा म्हणजे मग तुमचे समग्र अस्तित्व एकसंध होईल आणि मग ते शांती व आश्रयदायी ‘शक्ती‌’ आणि ‘प्रकाश’ यांच्या एकछत्री अंमलाखाली येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 143)

नैराश्यापासून सुटका – २२

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

प्राणिक अस्वस्थतेमध्ये आणि उदासीनतेमध्ये रममाण होण्याची तुमची वृत्ती पुन्हा एकदा उफाळून आली आहे, असे तुम्ही लिहिलेल्या पत्रावरून दिसते. त्यासाठी तिला विशेष असे काही कारण लागत नाही, पण स्वतःचे पोषण व्हावे म्हणून ती प्रत्येक गोष्टीचाच ताबा घेते; वस्तुतः ही मज्जातंतूंच्या दुर्बलतेची केवळ जुनाट अशी सवय आहे. व्यक्ती जेवढी अधिक कुढत बसते, तेवढी उदासीनता अधिकच वाढत राहते.

त्यावर मात करण्याचे तीन मार्ग आहेत. स्वतःमध्ये रमण्यापेक्षा अन्य कोणत्यातरी गोष्टीमध्ये रस घेणे आणि त्यात स्वतःला गुंतवून ठेवणे तसेच तुमच्या मन:स्थितीचा शक्य तितका कमीत कमी विचार करणे, हा पहिला मार्ग आहे.

दुसरा मार्ग म्हणजे या प्राणिक अस्वस्थतेपासून आणि उदासीनतेपासून स्वतःला शक्य तितके विलग करणे आणि त्यांना (धीराने) सामोरे जाणे. जसे तुम्ही आत्ता करत आहात त्याप्रमाणे, त्यांचा स्वीकार करण्यास जोमाने आणि निर्धारपूर्वक नकार देणे.

तिसरा मार्ग म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या शांतीला आवाहन करण्यासाठी, मनाला ऊर्ध्वमुख करण्याची सवय लावून घेणे. ती शांती ऊर्ध्वस्थित आहे आणि तुम्ही जर स्वतःला खुले केलेत तर, ती खाली अवतरित होण्याची प्रतीक्षा करत आहे. ती शांती जर अवतरली तर, ती तुमची या दुःखभोगापासून, त्रासापासून कायमची सुटका करेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 180-181)

नैराश्यापासून सुटका – १९

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुमच्यामध्ये शक्ती व शांती अवतरित होत आहेत आणि तुमच्यामध्ये स्थिरावण्यासाठी त्या अधिकाधिक कार्य करत आहेत, असे स्पष्ट दिसत आहे. उदास राहावेसे वाटणे, आनंदी असण्याची भीती वाटणे यांसारख्या भावना, तसेच आपण अक्षम आहोत किंवा अपात्र आहोत अशा सूचना ही प्राणिक रचनेची (vital formation) नेहमीचीच आंदोलने असतात, पण ती आंदोलने म्हणजे तुम्ही नाही (हे ओळखा.) ती तुम्हाला अजमावण्यासाठी किंवा तुमच्यामधील परिवर्तन रोखण्यासाठी निर्माण होत आहेत. या ज्या सूचना येत आहेत त्यांचा स्वीकार करण्यास नकार द्यायचा आणि तुम्हाला मुक्त व आनंदी करणाऱ्या तुमच्यामधील ‘सत्या’च्या बाजूने तुम्ही चिकाटीने उभे राहायचे, एवढेच तुम्हाला करायचे आहे. तसे केलेत तर सारे काही ठीक होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 180)

नैराश्यापासून सुटका – १८

 

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुमच्या प्राणामधील जो भाग बंड करू इच्छित आहे त्याच्याकडे, त्या बंडाचे समर्थन करण्यासारखी खरंतर कोणतीही कारणं नाहीयेत; त्यामुळे तो अडचणीत सापडल्याची किंवा अपेक्षाभंगाची तीव्र वेदना यांपैकी कोणत्यातरी एका मनोदशेला (mood) कवटाळून बसला आहे. प्राणामधील हा भाग अस्वस्थ, इच्छा-वासनामय, उतावळ्या, उदासीन, चंचल अशा सर्व प्रकारच्या मानवी प्रकृतीमधील एक घटक असतो. त्यापासून स्वतःला वेगळे करा आणि त्याला तुम्ही, तुमच्यावर शासन करण्याची किंवा तुम्हाला संचालित करण्याची मुभा देऊ नका.

प्राणाचा एक सुयोग्य भाग देखील असतो. तो उत्कट असतो, उच्चतर गोष्टींबाबत तो संवेदनशील असतो, त्याच्याकडे महान प्रेमाची आणि भक्तीची क्षमता असते. त्याचा उपयोग केलाच पाहिजे. प्राणाच्या त्या भागाला सामर्थ्यवान बनवा. अंतरात्म्याचा आणि वरून येणाऱ्या शांतीचा व विशालतेचा त्याला आधार द्या.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 142)

नैराश्यापासून सुटका – १५

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

अभिमाना‌पासून तुम्ही स्वतःची जेवढी लवकरात लवकर सुटका करून घ्याल तेवढे अधिक बरे. जो कोणी अभिमानाला खतपाणी घालतो तो विरोधी शक्तींच्या अंमलाखाली जातो. खऱ्या प्रेमाचा आणि अभिमानाचा काहीही संबंध नसतो; मत्सराप्रमाणेच (jealousy) अभिमान हा देखील प्राणिक अहंकाराचाच एक भाग असतो.

*

त्वरित परिणाम दिसून आले नाहीत तरी, नाउमेद न होणे हे अतिशय महत्त्वाचे असते, कारण अशावेळी आंतरिक शक्ती क्षीण होते. जेव्हा ती आंतरिक शक्ती क्षीण होते तेव्हा, ’तपोभंग‌’ होतो. पूर्वीचे ऋषीमुनी याविषयी नेहमी तक्रार करत असत. कारण ज्या ज्या वेळी असा तपोभंग होत असे तेव्हा तेव्हा पूर्वपदावर येण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी अगदी पहिल्यापासून पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागत असे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 245, 182)

नैराश्यापासून सुटका – १४

 

उद्वेग, असंतोष यांसारख्या भावावेगांना सावधपणे नकार द्या. अन्यथा त्यातून पुन्हा गोंधळ आणि नैराश्य निर्माण होते. हे भावावेग येण्यापूर्वीच त्यांना परतवून लावणे व्यक्तीला प्रत्येक वेळी जमेलच असे नाही, मात्र मनात ते भावावेग निर्माण झाल्याबरोबर लगेचच व्यक्ती ते काढून टाकू शकते. ते जितके जास्त नाकारले जातील, तितके त्यांचे पुन्हा पुन्हा येणे अवघड होत जाईल. किंवा जर ते भावावेग उत्पन्न झालेच तर, ते अगदी क्षणिक काळासाठीच तुमचा ताबा घेतील आणि नंतर नाहीसे होतील. त्यांना थारा देणे म्हणजे पुन्हा एकदा त्यांना खरी चेतना झाकोळू देण्याची संधी देण्यासारखे होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 187)