Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २४३

मनाचे रूपांतरण

मनाची ग्रहणशील निश्चल-नीरवता (silence), मानसिक अहंकाराचा निरास आणि मनोमय पुरुष साक्षीभावाच्या भूमिकेत उतरणे, ‘दिव्य शक्ती’बरोबर असलेला घनिष्ठ संपर्क आणि अन्य कोणाप्रत नव्हे तर, त्या दिव्य शक्तीच्या ‘प्रभावा’प्रत खुलेपणा या गोष्टी ‘ईश्वरा’चे साधन बनण्यासाठी, आणि केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’द्वारेच संचालित होण्यासाठी आवश्यक अटी असतात. केवळ मनाच्या निश्चल-नीरवतेमुळे अतिमानसिक चेतना अवतरित होते असे नाही. मानवी मन आणि अतिमानस (supermind) यांच्या दरम्यान चेतनेच्या बऱ्याच अवस्था, बऱ्याच पातळ्या, बरेच स्तर असतात.

निश्चल-नीरवतेमुळे मन आणि उर्वरित अस्तित्व हे महत्तर गोष्टींप्रत खुले होते, कधीकधी ते ब्रह्मांडगत चेतनेप्रत खुले होते, कधीकधी शांत ‘आत्म्या’च्या अनुभवाप्रत खुले होते. तर कधी ते ‘ईश्वरा’च्या शक्तीप्रत किंवा उपस्थितीप्रत खुले होते; कधीकधी ते मानवी मनापेक्षा अधिक उच्च असणाऱ्या चेतनेप्रत खुले होते. या पैकी कोणतीही गोष्ट घडण्यासाठी मनाची निश्चल-नीरवता ही सर्वाधिक अनुकूल परिस्थिती असते.

‘दिव्य-शक्ती’ सर्वप्रथम व्यक्तिगत चेतनेवर आणि नंतर त्या चेतनेमध्ये अवतरित होण्यासाठी आणि ती चेतना रूपांतरित करण्याचे तिचे कार्य करण्यासाठी, तसेच आवश्यक असे अनुभव प्रदान करण्यासाठी, आणि व्यक्तीचा दृष्टिकोन व तिच्या वृत्तीप्रवृत्ती पूर्णतः बदलून टाकण्यासाठी आणि व्यक्ती जोवर अंतिम अतिमानसिक परिवर्तनसाठी तयार होत नाही तोपर्यंत तिला टप्प्याटप्याने पुढे घेऊन जाण्यासाठी, मनाची निश्चल-नीरवता ही पूर्णयोगामधील सर्वात अनुकूल परिस्थिती असते. अर्थात हीच केवळ एकमेव अनुकूल परिस्थिती असते असे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 266-267)

साधना, योग आणि रूपांतरण – ७३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
चेतना अंतरंगामध्ये प्रविष्ट झाल्याचा तुम्हाला आलेला हा अनुभव म्हणजे ज्याला सामान्यत: ‘समाधी’ असे संबोधले जाते तो अनुभव होता. वास्तविक त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे मन आणि प्राणामध्ये (तुम्हाला) आलेला निश्चल-नीरवतेचा अनुभव, की जी नीरवता अगदी शरीरापर्यंत पूर्णपणे विस्तारित झाली होती.

निश्चल-नीरवतेची (silence) आणि शांतीची (peace) क्षमता प्राप्त होणे ही साधनेमधील सर्वाधिक महत्त्वाची पायरी असते. ती प्रथमतः ध्यानामध्ये प्राप्त होते आणि ती निश्चल-नीरवता चेतनेस अंतर्मुख करून, तिला समाधी-अवस्थेकडे नेण्याची शक्यता असते. परंतु नंतर ही क्षमता जाग्रतावस्थेमध्ये सुद्धा प्राप्त होणे आवश्यक असते आणि समग्र जीवन व कार्य यासाठी तिने एक स्थायी पाया म्हणून स्वतःला प्रस्थापित करणे आवश्यक असते. ही स्थिती ‘आत्म’साक्षात्कारासाठी आणि प्रकृतीच्या आध्यात्मिक रूपांतरणासाठी आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 248)

साधना, योग आणि रूपांतरण – ५७

(कालच्या भागामध्ये आपण मन निश्चल-नीरव करण्याच्या विविध पद्धती समजावून घेतल्या. विचारांना अनुमती न देणे, विचारांकडे साक्षी पुरुषाप्रमाणे अलिप्तपणे पाहणे आणि मनात येणाऱ्या विचारांना ते आत प्रवेश करण्यापूर्वीच अडविणे यासारख्या पद्धतींचा अवलंब करूनही, जर मन निश्चल-नीरव झाले नाही तर काय करावे, असा प्रश्न येथे साधकाने विचारला असावा असे दिसते. त्यास श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

यापैकी कोणतीच गोष्ट घडली नाही तर अशा वेळी (विचारांना) नकार देण्याची सातत्यपूर्ण सवय ही आवश्यक ठरते. येथे तुम्ही त्या विचारांशी दोन हात करता कामा नयेत किंवा त्यांच्याशी संघर्षही करता कामा नये. फक्त एक अविचल आत्म-विलगीकरण (self-separation) आणि विचारांना नकार देत राहणे आवश्यक असते. सुरुवातीला लगेच यश येते असे नाही, पण तुम्ही त्या विचारांना अनुमती देणे सातत्याने रोखून ठेवलेत, तर अखेरीस विचारांचे हे यंत्रवत गरगर फिरणे कमीकमी होत जाईल आणि नंतर ते बंद होईल. तेव्हा मग तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार आंतरिक अविचलता (quietude) किंवा निश्चल-नीरवता (silence) प्राप्त होईल.

येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, काही अगदी अपवादात्मक उदाहरणे वगळता, योगिक प्रक्रियांचे परिणाम हे त्वरित दिसून येत नाहीत आणि म्हणून, परिणाम दिसून येत नाहीत तोपर्यंत तुम्ही या प्रक्रिया अगदी धीराने अवलंबल्या पाहिजेत. व्यक्तीची बाह्य प्रकृती (मन, प्राण आणि शरीर) खूप विरोध करत असेल तर, हे परिणाम दिसून येण्यास कधीकधी बराच कालावधी लागू शकतो.

जोपर्यंत तुम्हाला उच्चतर ‘आत्म्या’ची चेतना गवसलेली नाही किंवा तिचा अनुभवच जर तुम्हाला आलेला नाही, तर तुम्ही तुमचे मन त्या उच्चतर आत्म्यावर कसे काय स्थिर करू शकता? तुम्ही ‘आत्म्या’च्या संकल्पनेवरच लक्ष एकाग्र करू शकता किंवा मग तुम्ही ‘ईश्वरा’च्या किंवा ‘दिव्य माते’च्या संकल्पनेवर लक्ष एकाग्र करू शकता किंवा त्यांच्या मूर्तीवर, चित्रावर किंवा भक्तीच्या भावनेवर लक्ष एकाग्र करू शकता; ‘ईश्वरा’ने किंवा ‘दिव्य माते’ने तुमच्या हृदयात प्रविष्ट व्हावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला तुम्ही आवाहन करू शकता किंवा तुमच्या शरीर, हृदय आणि मनामध्ये ‘दिव्य शक्ती’ने कार्य करावे म्हणून, तसेच तुमची चेतना मुक्त करून, तुम्हाला तिने आत्म-साक्षात्कार प्रदान करावा म्हणून, तुम्ही ‘दिव्य शक्ती’ला आवाहन करू शकता.

तुम्ही जर ‘आत्म्या’च्या संकल्पनेवर लक्ष एकाग्र करू इच्छित असाल तर ती संकल्पना मन आणि त्याचे विचार, प्राण आणि त्याची भावभावना, शरीर आणि त्याच्या कृती यांपासून काहीशी भिन्न असलीच पाहिजे; या सर्वापासून अलिप्त असली पाहिजे, ‘आत्मा’ म्हणजे एक ‘अस्तित्व’ किंवा ‘चेतना’ आहे अशा सघन जाणिवेपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला पाहिजेत. म्हणजे आजवर मन, प्राण, शरीर यांच्या गतिविधींमध्ये मुक्तपणे समाविष्ट असूनही त्यांच्यापासून अलिप्त असणारा ‘आत्मा’ अशा सघन जाणिवेपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 303-304)

साधना, योग आणि रूपांतरण – ५५

किरकोळ बारीकसारीक विचार मनामध्ये सातत्याने घोळत राहणे हे यांत्रिक मनाचे स्वरूप असते, मनाची संवेदनशीलता हे त्याचे कारण नसते. तुमच्या मनाचे इतर भाग हे अधिक शांत आणि नियंत्रणाखाली आले आहेत, आणि त्यामुळेच यांत्रिक मनाची ही खळबळ तुम्हाला अधिक ठळकपणे लक्षात येत आहे आणि ती मनाचा अधिकांश प्रदेशदेखील व्याप्त करत आहे. तुम्ही त्यांना सातत्याने नकार देत गेलात तर ते विचार सहसा आपोआप निघून जातात.

*

यांत्रिक मनाच्या मनोव्यापारापासून स्वतःला विलग करता येणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. तसे करता आले तर यांत्रिक मनाचे ते किरकोळ विचार जणू रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या गोंगाटाप्रमाणे वाटू लागतील आणि मग तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकाल. आणि मग ते विचार पुन्हापुन्हा जरी मनात उद्भवत राहिले तरी आता मनाची अविचलता आणि शांती न ढळता तशीच कायम राहू शकेल. वरून शांती आणि निश्चल-नीरवता या गोष्टी अवतरित होत राहिल्या तर त्या बहुतेक वेळी इतक्या प्रबळ होतात की, कालांतराने त्या शारीर-मनावर नियंत्रण मिळवितात.

*

कदाचित तुम्ही या यंत्रवत विचारांकडे फारच लक्ष देत आहात. यंत्रवत चाललेल्या त्या कृतीकडे दुर्लक्ष करून तिला तशीच पुढे निघून जाऊ देणे आणि एकाग्रता साधणे हे सहज शक्य असते.

*

बाह्यवर्ती अस्तित्वामध्ये अंतरात्म्याचा प्रभाव जसजसा अधिकाधिक विस्तारत जाईल तसतशा अवचेतन मनाच्या यंत्रवत गतिविधी शांत होत जातील. हा सर्वोत्तम मार्ग आहे. मन शांत करण्यासाठी थेट प्रयत्न करणे ही काहीशी अवघड पद्धत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 314), (CWSA 29 : 314-315), (CWSA 29 : 315), (CWSA 29 : 315)