Posts

श्रीमाताजी आणि समीपता – ०७

भौतिकदृष्ट्या ज्या व्यक्ती श्रीमाताजींच्या निकट आहेत केवळ त्याच व्यक्ती त्यांना जवळच्या आहेत असे नव्हे; तर ज्या व्यक्ती श्रीमाताजींप्रति खुल्या असतात, आंतरिक अस्तित्वातून त्यांच्याजवळ असतात, श्रीमाताजींच्या इच्छेशी एकरूप झालेल्या असतात, त्या व्यक्ती श्रीमाताजींची खरी लेकरे असतात आणि ती श्रीमाताजींना अधिक जवळची असतात.

*

साधक : कधीकधी मी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा मी ‘माँ – माँ – माँ’ असे म्हणत असतो. आणि मग सारे काही निःस्तब्ध होते आणि मला माझ्या अंतरंगामध्ये आणि बाहेरही एक प्रकारच्या महान शांतीचा अनुभव येतो. अगदी अवतीभोवतीच्या वातावरणामधूनसुद्धा मला ‘माँ – माँ – माँ’ असे ऐकू येते. हे खरे आहे का? की, हा केवळ एक प्रतिध्वनी आहे?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगामध्ये येणारा हा अनुभव जसा तुमच्या चेतनेचा एक भाग असतो अगदी त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या अवतीभोवती निर्माण केलेले वातावरण हाही तुमच्या चेतनेचाच भाग असतो. जेव्हा तुम्ही श्रीमाताजींचे नामस्मरण करत असता, तेव्हा त्याचा प्रतिध्वनी तुमच्या चेतनेमध्ये म्हणजे, तुमच्या अंतरंगामध्ये तसेच तुमच्या बाहेरदेखील उमटायला सुरूवात होते. त्यामुळे तुम्हाला हा जो अनुभव आला तो खरा अनुभव आहे आणि तो चांगला अनुभव आहे.

*

साधक : माताजी, माझ्यामध्ये हजारो अपूर्णता असल्या तरीदेखील एक गोष्ट मात्र माझ्या मनात दृढ झाली आहे ती म्हणजे – तुम्ही माझी मायमाऊली आहात आणि मी तुमच्या हृदयातून जन्माला आलो आहे. गेल्या सहा वर्षांत हे एकच सत्य माझ्या प्रचितीस आले आहे. निदान ही गोष्ट जाणवण्याइतपत का होईना, पण मी पात्र ठरलो म्हणून मी तुमच्याप्रति कृतज्ञ आहे.
श्रीअरविंद : येऊ घातलेल्या सत्यांसाठी हे अत्युत्तम असे अधिष्ठान आहे; कारण ती सत्यं या अधिष्ठानाचा परिणाम म्हणूनच उदयाला यायची आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 496, 478-479, 478)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

साधना, योग आणि रूपांतरण – १४६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘ईश्वरा’चे नामस्मरण हे सहसा संरक्षणासाठी, आराधनेसाठी, भक्तीमध्ये वृद्धी व्हावी यासाठी, आंतरिक चेतना खुली व्हावी यासाठी आणि भक्तिमार्गाद्वारे ‘ईश्वरा’चा साक्षात्कार व्हावा यासाठी केले जाते.

*

पूर्णयोगाच्या साधनेचे सूत्र म्हणून केवळ एकच मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे ‘श्रीमाताजीं’चे नाम किंवा ‘श्रीअरविंदां’चे व ‘श्रीमाताजीं’चे नाम!

हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तकामध्ये एकाग्रता या दोन्ही पद्धती या योगामध्ये अवलंबल्या जातात; त्या प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे असे परिणाम असतात.

हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता चैत्य पुरुष (psychic being) खुला होतो आणि तो भक्ती, प्रेम आणि श्रीमाताजींशी एकत्व घडवून आणतो; हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता हृदयामध्ये श्रीमाताजींची उपस्थिती जाणवू लागते आणि प्रकृतीमध्ये, स्वभावामध्ये त्यांच्या शक्तीचे कार्य घडू लागते.

मस्तककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मन हे आत्मसाक्षात्काराप्रत खुले होते; मनाच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत, देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत मन खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 326 & 327)