Tag Archive for: ईश्वरी उपस्थिती

मनुष्यामध्ये असणारी ईश्वरी उपस्थिती हे प्रत्येक व्यक्तीचे सत्य असते, तो व्यक्तीचा आंतरिक धर्म (inner law) असतो. आणि हा आंतरिक धर्मच तिच्या जीवनाचा स्वामी आणि मार्गदर्शक असला पाहिजे. तुम्ही जेव्हा या आंतरिक धर्माचे म्हणणे शिरसावंद्य मानण्याची सवय लावून घेता, जेव्हा तुम्ही त्याचे पालन करता, जेव्हा तुम्ही त्याचे अनुसरण करता, त्या धर्माने तुमच्या जीवनाला मार्गदर्शन करावे असा अधिकाधिक प्रयत्न तुम्ही करता, तेव्हा तुम्ही स्वतःभोवती सत्य, शांती, सुसंवाद यांचे एक वातावरण निर्माण करता. आणि साहजिकपणे त्याचा परिणाम वस्तुमात्रांवर, परिस्थितीवर होतो. म्हणजे तुम्ही ज्या वातावरणात वावरता त्या वातावरणावर त्याचा परिणाम होतो. जेव्हा तुम्ही न्याय, सत्य, सुसंवाद, करुणा, समजूतदारपणा, परिपूर्ण सदिच्छा यांची जणू मूर्तीच असता तेव्हा, ही आंतरिक वृत्ती, जितकी जास्त प्रामाणिक आणि समग्र असेल तेवढ्या प्रमाणात तिचा बाह्य परिस्थितीवर परिणाम होतो. म्हणजे त्यामुळे जीवनातील अडचणी नाहीशा होतात असे नाही, पण त्या आंतरिक वृत्तीमुळे, या अडीअडचणींना एक नवीन अर्थ प्राप्त होतो आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला एक नवे सामर्थ्य लाभते, एक नवीन शहाणीव (wisdom) प्राप्त होते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 278-279)

 

(श्रीमाताजींनी बालकांना प्रामाणिकपणाचे महत्त्व कसे समजावून सांगितले, ते आपण कालच्या भागात समजावून घेतले.)

मुलांना एक गोष्ट अवश्य शिकवावी असे माझे पालकांना आणि शिक्षकांना सांगणे आहे. मुलांना असे सांगावे की, ‘’मुलांनी ते चांगले आहेत असे ‘दाखविणे‌’, जणू काही ते फार आज्ञाधारक आहेत असे ‘दाखविणे‌’ किंवा ते खूप उत्तम रितीने अभ्यास करत आहेत असे ‘दाखविणे‌’ हे अजिबात उपयोगाचे नाही.” (तशा प्रकारची कोणतीही गोष्ट मुळात नसताना केवळ ‘दाखविणे‌’ काहीच उपयोगाचे नसते, हे मुलांना शिकवावे.) पण बरेचदा आपली मुले अशी ‘दिसावीत’ यासाठी पालक आणि शिक्षकच मुलांना प्रोत्साहन देत असतात.

बरेचदा असेही घडते की, एखादे मूल अगदी सहजस्वाभाविकपणे, अगदी प्रांजळपणे त्याची चूक कबूल करण्यासाठी पालकांकडे किंवा शिक्षकांकडे जाते; पण तेव्हा त्याला ओरडा खावा लागतो. पालकांची ही सर्वात मोठी चूक असते. मुलाला कधीही रागवता कामा नये आणि त्यासाठी स्वतः पालकांकडे पुरेसा संयम असावा लागतो. अगदी त्या मुलाने कितीही किमती किंवा अतिशय मौल्यवान अशी वस्तू मोडलेली असेल तरीही त्याला रागावता कामा नये. त्याला फक्त असे विचारावे की, “हे असे कसे झाले? नक्की काय झाले?” असे केल्यामुळे, नक्की काय घडले व ते तसे का घडले हे मुलाला समजेल, म्हणजे मग पुढच्या वेळी तो अधिक काळजी घेऊ शकेल. बस इतकेच. तुम्ही असे वागलात तर, ते मूल तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करणार नाही, तर ते तुमच्यापाशी प्रांजळपणे चूक कबूल करेल. ढोंगीपणा ही स्वतःच्या व्यक्तित्वाच्या रूपांतरणातील सर्वात मोठी अडचण असते. तुम्ही तुमच्या मुलाबरोबर वागताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवलीत तर तुम्ही त्याचे खूप भले करू शकाल. अर्थात, तुम्ही त्याला उपदेशाचे डोस पाजत बसता कामा नये किंवा भाषणबाजीसुद्धा करता कामा नये.

व्यक्तीमध्ये एक प्रकारचा उदात्तपणा असतो, एक महान विशुद्धता असते, सौंदर्याविषयी निरतिशय प्रेम असते आणि या सगळ्या गोष्टी इतक्या शक्तिशाली असतात की, अगदी अत्यंत दुष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा मनुष्यसुद्धा अशा खऱ्याखुऱ्या सौंदर्यपूर्ण कृतीसमोर किंवा वीरवृत्तीच्या किंवा निःस्वार्थी कृतीसमोर नतमस्तक होतो. म्हणजे तो तसे वागण्यास प्रवृत्त होतो इतकी तो गोष्ट शक्तिशाली असते, ही गोष्ट मुलांना समजावून सांगितली पाहिजे.

कारण (सर्वच) मनुष्यमात्रांमध्ये एक ईश्वरी उपस्थिती असते, या पृथ्वीवरील ती सर्वात अद्भुत अशी उपस्थिती असते. ती उपस्थिती हृदयामध्ये सुप्त स्वरूपात असते. हृदयामध्ये म्हणजे शारीर-हृदयामध्ये नाही, तर सर्व मनुष्यमात्रांच्या चैत्य केंद्रामध्ये (psychic centre) ती उपस्थिती असते. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा त्या ईश्वरी उपस्थितीचे वैभव पुरेशा विशुद्धपणे आविष्कृत होते तेव्हा, त्या उपस्थितीचा पडसाद हा सर्व जीवमात्रांमध्ये सुप्त असणाऱ्या त्या ईश्वरी उपस्थितीला जाग आणतो.

– श्रीमाताजी (CWM 15 : 298-299)