Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २४०

दिव्य जीवनासाठी फक्त उच्चतर मानसिक चेतनेच्या संपर्कात येणे पुरेसे नसते. ती फक्त एक अनिवार्य अशी अवस्था असते. दिव्य जीवनासाठी अधिक उच्च आणि अधिक शक्तिशाली स्थानावरून ‘दिव्य शक्ती’चे अवतरण होणे आवश्यक असते.

पुढील सर्व गोष्टी सद्यस्थितीत अदृश्य असलेल्या शिखरावरून अवतरित होणाऱ्या ‘शक्ती’विना अशक्यप्राय आहेत :
१) उच्चतर चेतनेचे अतिमानसिक प्रकाश आणि शक्तीमध्ये रूपांतरण,
२) प्राण आणि त्याच्या जीवनशक्तीचे विशुद्ध, विस्तृत, स्थिरशांत, दिव्य ऊर्जेच्या शक्तिशाली आणि उत्कट साधनामध्ये रूपांतरण,
३) तसेच स्वयमेव शरीराचे दिव्य प्रकाश, दिव्य कृती, सामर्थ्य, सौंदर्य आणि हर्ष यांच्यामध्ये रूपांतरण

‘ईश्वरा’प्रत आरोहण या एका गोष्टीबाबत इतर योग आणि पूर्णयोग यांमध्ये साधर्म्य आढळते परंतु पूर्णयोगामध्ये केवळ आरोहण पुरेसे नसते तर मन, प्राण, शरीर यांच्या सर्व ऊर्जा रूपांतरित करण्यासाठी ‘ईश्वरा’चे अवतरण होणेदेखील आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 118-119)

साधना, योग आणि रूपांतरण – २३५

व्यक्ती आणि तिचे घटक यांच्या व्यवस्थेमध्ये एकाचवेळी दोन प्रणाली कार्यरत असतात. त्यातील एक केंद्रानुगामी असते. या प्रणालीमध्ये वर्तुळांची किंवा कोशांची एक मालिका असते, आणि तिच्या केंद्रस्थानी अंतरात्मा असतो. दुसरी प्रणाली ऊर्ध्व-अधर (vertical) अशी असते. म्हणजे यामध्ये आरोहण आणि अवरोहण असते, पायऱ्या-पायऱ्यांची एक शिडी असावी तशी ती असते. मनुष्याकडून ‘ईश्वरा’कडे होत जाणाऱ्या संक्रमणामध्ये, एकावर एक रचलेल्या स्तरांची जणू ही मालिकाच असते आणि त्यामध्ये अधिमानस (Overmind) व अतिमानस (Supermind) हे महत्त्वाचे टप्पे असतात.

हे संक्रमण घडून यायचे असेल तर आणि त्याच वेळी ते रूपांतरण देखील ठरावे असेही अपेक्षित असेल तर त्यासाठी, केवळ एकच मार्ग असतो. प्रथम, अंतर्मुखी परिवर्तन झाले पाहिजे, व्यक्तीने आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाचा (psychic being) शोध घेण्यासाठी अंतरंगात शिरले पाहिजे आणि त्यास अग्रस्थानी आणले पाहिजे. आणि त्याचवेळी प्रकृतीचे आंतरिक मन, आंतरिक प्राण व आंतरिक शरीराचे घटक उघड केले पाहिजेत. नंतर, आरोहणाची प्रक्रिया केली पाहिजे. म्हणजे ऊर्ध्वगामी परिवर्तनाची एक मालिकाच तेथे असली पाहिजे आणि निम्न स्तरावरील घटकांचे परिवर्तन करण्यासाठी चेतनेने पुन्हा खाली उतरून आले पाहिजे. व्यक्तीने जेव्हा अंतर्मुखी परिवर्तन घडवून आणलेले असते तेव्हा समग्र कनिष्ठ प्रकृती दिव्य परिवर्तनासाठी सुसज्ज व्हावी यासाठी व्यक्ती त्या प्रकृतीचे आंतरात्मिकीकरण घडवते. ऊर्ध्वगामी होत असताना, व्यक्ती मानवी मनाच्या अतीत जाते आणि आरोहणाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीचे एका नवीन चेतनेमध्ये परिवर्तन होते आणि त्याचवेळी या नवीन चेतनेचा व्यक्तीच्या समग्र प्रकृतीमध्ये संचार होतो.

अशा रीतीने जेव्हा आपण बुद्धीच्या पलीकडे आरोहण करत, प्रकाशित उच्च मनाच्या (illuminated higher mind) माध्यमातून अंतःस्फूर्त (intuitive) चेतनेमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण सर्व गोष्टींकडे बौद्धिक श्रेणीतून नाही किंवा बुद्धी या साधनाच्या माध्यमाद्वारे नाही तर अधिक महान अशा अंतःस्फूर्त उंचीवरून आणि अंतःस्फूर्तिमय झालेल्या इच्छा, भावभावना, संवेदना आणि शारीरिक संपर्काच्या माध्यमाद्वारे पाहू लागतो. म्हणून, अंतःस्फूर्त मनाकडून त्यापेक्षाही महान असलेल्या अधिमानसिक उंचीवर जाताना, एक नवीन परिवर्तन होते आणि आपण प्रत्येक गोष्ट अधिमानसिक चेतनेमधून आणि अधिमानसिक विचार, दृष्टी, इच्छा, भावना, संवेदना, शक्तीक्रीडा आणि संपर्काने प्रभावित झालेल्या मन, हृदय, प्राण आणि शरीर यांच्याद्वारे पाहू लागतो, अनुभवू लागतो. परंतु अंतिम परिवर्तन हे अतिमानसिक असते, कारण एकदा का आपण तेथे पोहोचलो, एकदा का प्रकृतीचे अतिमानसिकीकरण झाले की मग आपण ‘अज्ञान’दशेच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलो असतो आणि मग चेतनेचे परिवर्तन गरजेचे राहत नाही. अर्थात त्यापुढेही दिव्य प्रगती, किंबहुना अनंत विकसन होणे अजूनही शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 84-85)

साधना, योग आणि रूपांतरण – १९४

‘अतिमानस योग’ (supramental Yoga) म्हणजे एकाच वेळी, ‘ईश्वरा’प्रत आरोहण (ascent) असते आणि ‘ईश्वरा’चे मूर्त प्रकृतीमध्ये अवतरण (descent) देखील असते. आत्मा, मन, प्राण आणि शरीर यांच्या एककेंद्री समुच्चयाच्या ऊर्ध्वमुख अभीप्सेद्वारेच (aspiration) आरोहण साध्य होऊ शकते. आणि समग्र अस्तित्वाने त्या अनंत आणि शाश्वत ‘ईश्वरा’प्रत आवाहन केले तर त्याद्वारेच अवतरण घडून येऊ शकते. जर हे आवाहन व ही अभीप्सा असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाने या गोष्टी उदयाला आल्या, त्या सातत्याने वृद्धिंगत होत राहिल्या आणि त्यांनी जर सर्व प्रकृतीचा ताबा घेतला, तर आणि तरच अतिमानसिक उन्नयन आणि रूपांतरण शक्य होते.

आवाहन आणि अभीप्सा या फक्त प्राथमिक अटी आहेत, त्या बरोबरीने आणि त्यांच्या प्रभावशाली तीव्रतेमुळे सर्व अस्तित्वामध्येच ‘ईश्वरा’प्रत उन्मुखता (opening) आणि संपूर्ण समर्पण उदित होणे आवश्यक असते. मर्त्य अस्तित्वाच्या आधीपासूनच वर असणारी व पाठीमागे असणारी आणि मर्त्य अर्धजागृत अस्तित्वाला कवेत घेणारी एक महान दिव्य ‘चेतना’ असते. ती महान दिव्य चेतना, प्रकृतीला तिच्या सर्व भागांनिशी आणि सर्व स्तरांवर, कोणत्याही मर्यादेविना ग्रहण करता येणे शक्य व्हावे म्हणून, प्रकृतीने स्वत:ला व्यापकतेने खुले करणे म्हणजे ‘उन्मुखता’! या ग्रहणशीलतेमध्ये धारण करण्याची अक्षमता असता कामा नये, किंवा मूलद्रव्यांतरणाच्या तणावामुळे (transmuting stress) शरीर किंवा मज्जातंतू, प्राण किंवा मन, किंवा संपूर्ण व्यवस्थेतील कोणती एखादी गोष्ट कोलमडूनही पडता कामा नये. (म्हणून त्यासाठी) ईश्वरी ‘शक्ती’चे सदोदित बलशाली असणारे आणि अधिकाधिक आग्रही होत जाणारे कार्य धारण करण्यासाठी सतत चढतीवाढती असणारी क्षमता, आणि अपार ग्रहणशीलता असणे आवश्यक असते. अशी ग्रहणशीलता नसेल तर कोणतेच महान आणि चिरस्थायी असे कोणतेही कार्य घडणे शक्य होणार नाही; आणि अशा वेळी ती ‘योगसाधना’ कोलमडून बंद पडेल किंवा जडतायुक्त अडथळा निर्माण झाल्यामुळे बंद होईल किंवा त्या प्रक्रियेमध्येच काहीतरी विनाशक अटकाव किंवा सुस्ती येऊन ती बंद पडेल अशी शक्यता असते; या प्रक्रियेमध्ये अपयश येऊ नये असे जर वाटत असेल तर योगसाधना निरपवाद आणि समग्र असणेच आवश्यक असते.

परंतु कोणत्याही मानवी प्रणालीमध्ये ही अनंत ग्रहणशीलता आणि अमोघ क्षमता नसते, म्हणून ‘ईश्वरी शक्ती’ जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये अवतरित होते तेव्हा, ती त्या व्यक्तीची (ग्रहण)क्षमता वृद्धिंगत करत नेते. ईश्वरी ‘शक्ती’ वरून त्या व्यक्तीमध्ये प्रविष्ट होताना, व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कार्य करण्यासाठी ‘सामर्थ्य’ निर्माण करते. ते सामर्थ्य आणि ती ग्रहणक्षमता जेव्हा त्या ईश्वरी शक्तीद्वारे समतुल्य केली जाते तेव्हाच, अतिमानसिक ‘योग’ यशस्वी होण्याची शक्यता असते. आपण ‘जेव्हा आपले अस्तित्व हळूहळू चढत्यावाढत्या समर्पणाद्वारे ईश्वरा’च्या हाती सोपवीत जातो तेव्हाच ही गोष्ट शक्य होते. तेथे एक समग्र आणि अखंडित अशी सहमती आणि कार्यासाठी जी गोष्ट करणेच आवश्यक आहे ती गोष्ट ‘ईश्वरी शक्ती’ला करू देण्याची धैर्ययुक्त इच्छाशक्ती असणेच आवश्यक असते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद (CWSA 12 : 169-170)

साधना, योग आणि रूपांतरण – १८३

(श्रीअरविंद येथे पारंपरिक योग व पूर्णयोग यातील फरक स्पष्ट करत आहेत.)

प्राचीन योगांच्या तुलनेत पूर्णयोग पुढील बाबतीत नावीन्यपूर्ण आहे.

१) जगापासून किंवा जीवनापासून निवृत्त होऊन स्वर्ग, निर्वाण यांच्याकडे प्रयाण करणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. उलट, हा योग जीवनामध्ये आणि अस्तित्वामध्ये परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. ते उद्दिष्ट गौण आणि अनुषंगिक आहे, असे पूर्णयोग मानत नाही तर तो त्यास वैशिष्ट्यपूर्ण आणि केंद्रवर्ती उद्दिष्ट मानतो.

अन्य योगांमध्ये ‘अवतरण’ (descent) असलेच तर, आरोहणाच्या (ascent) मार्गावरील एक घटना म्हणून किंवा आरोहणाचा परिणाम म्हणून ते घडून आलेले असते. अन्य योगांमध्ये ‘आरोहण’ हीच सत्य गोष्ट असते. पूर्णयोगात आरोहण हे अनिवार्य आहे परंतु त्याचा परिणाम म्हणून घडून येणारे ‘अवतरण’ हीच गोष्ट येथे निर्णायक असते आणि अवतरण हेच येथे आरोहणाचे अंतिम उद्दिष्ट मानण्यात आलेले आहे. आरोहणाद्वारे नवीन चेतनेचे अवतरण घडून येणे ही या साधनेनी उमटवलेली मोहोर आहे. ‘तंत्रयोग’ आणि ‘वैष्णव’ या संप्रदायांची परिसमाप्तीसुद्धा जीवनापासून सुटका करून घेण्यामध्ये होते; तर ‘जीवनाची दिव्य परिपूर्ती’ हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे.

(२) व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेऊन, व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी, हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ पारलौकिक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेदेखील येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक चेतनेची (supramental consciousness) शक्ती येथे आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

(३) चेतनेचे आणि प्रकृतीचे संपूर्ण व समग्र परिवर्तन हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे. ते जेवढे संपूर्ण व समग्र आहे तेवढीच त्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्वनिर्धारित करण्यात आलेली साधनापद्धतीदेखील तितकीच संपूर्ण व समग्र आहे. पूर्णयोगामध्ये जुन्या पद्धतींचा स्वीकार हा केवळ एक आंशिक क्रिया म्हणूनच केला जातो आणि त्या जुन्या साधनापद्धती त्याहूनही अधिक वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या साधनापद्धतींपर्यंत नेण्यात येतात.

अशी पद्धती पूर्णतः किंवा तिच्यासारखे काही, पूर्वीच्या योगांमध्ये समग्रतया प्रस्तावित केले आहे किंवा अशी काही पद्धती पूर्वीच्या योगांमध्ये अंमलात आणली गेली आहे असे, मला आढळले नाही. मला जर तशी पद्धती आढळली असती तर, मी हा (पूर्णयोगाचा) मार्ग निर्माण करण्यामध्ये माझा वेळ व्यर्थ दवडला नसता. जर हा मार्ग अगोदरच अस्तित्वात असता, निर्धारित करण्यात आलेला असता, अगोदरच त्याचा आराखडा पूर्णतः रेखाटलेला असता, तो चांगला उजळलेला असता, सुरक्षित आणि सर्वांसाठी खुला करण्यात आलेला असता तर मी सुखाने मार्गस्थ होऊन, माझ्या उद्दिष्ट-धामापर्यंत सुरक्षितपणे, त्वरेने पोहोचलो असतो. या शोधामध्ये आणि आंतरिक निर्मितीमध्ये मला तीस वर्षे खर्च करावी लागली नसती. जुन्याच मार्गांवरून पुन्हा एकवार वाटचाल हे आमच्या योगाचे स्वरूप नाही तर आमचा योग म्हणजे एक ‘आध्यात्मिक साहस’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 400 – 401)

साधना, योग आणि रूपांतरण – ८३

(साधकाला चेतनेच्या आरोहणाचा आणि अवरोहणाचा अनुभव कसा प्रतीत होतो, हे कालच्या भागात आपण पाहिले.)

आरोहण प्रक्रियेचे (ascension) विविध परिणाम आढळून येतात. ही प्रक्रिया चेतनेला मुक्त करू शकते त्यामुळे तुम्ही शरीरामध्ये बंदिस्त नाही किंवा शरीराच्या वर आहात असा अनुभव तुम्हाला येतो, किंवा तुम्ही शरीरासह इतके विशाल होता की जणूकाही तुमचे शारीर-अस्तित्व उरतच नाही. किंवा तुम्ही म्हणजे तुमच्या मुक्त विशालतेमधील केवळ एक बिंदू आहात असा तो अनुभव असतो. त्यामुळे व्यक्तीला किंवा तिच्या एखाद्या घटकाला शरीरातून बाहेर पडता येते आणि तो घटक इतरत्र जाऊ शकतो. शरीरातून बाहेर पडून इतरत्र जाण्याच्या या कृतीसोबतच सहसा एक प्रकारच्या आंशिक समाधीची अन्यथा संपूर्ण योगतंद्रीची अवस्था येते. किंवा त्यामुळे चेतना सशक्त होऊ शकते. आता ती चेतना शरीरापुरतीच किंवा बाह्यवर्ती प्रकृतीच्या सवयींपुरतीच मर्यादित राहत नाही. त्याची परिणती चेतना अंतरंगामध्ये शिरण्यामध्ये, आंतरिक मानसिक गहनतांमध्ये प्रवेश करण्यामध्ये, तसेच चेतना आतंरिक प्राणामध्ये, आंतरिक सूक्ष्म देहामध्ये, अंतरात्म्यामध्ये प्रवेश करण्यामध्ये होते. त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या अगदी आंतरतम चैत्य अस्तित्वाविषयी किंवा आंतरिक मानसिक, प्राणिक आणि सूक्ष्म शारीर अस्तित्वाविषयी सजग होते. त्यामुळे व्यक्ती प्रकृतीच्या घटकांशी संबंधित असणाऱ्या त्या त्या क्षेत्रांमध्ये, त्या स्तरांमध्ये, त्या जगतांमध्ये वास्तव्य करण्यास आणि तेथे वावरण्यास सक्षम होते.

कनिष्ठ चेतनेच्या या पुनःपुन्हा आणि नित्य होणाऱ्या आरोहणामुळे मन, प्राण आणि शरीर हे घटक अतिमानसिक स्तरापर्यंतच्या उच्चतर स्तरांच्या संपर्कात येण्यासाठी सक्षम होतात आणि त्या उच्चतर स्तरांच्या प्रकाशामुळे, त्यांच्या शक्तीमुळे आणि त्यांच्या प्रभावामुळे भारित होतात. आणि पुनःपुन्हा व नित्य होणारे ‘दिव्य चेतने’चे आणि तिच्या ‘ऊर्जे’चे हे अवरोहण हेच समग्र अस्तित्वाच्या आणि समग्र प्रकृतीच्या रूपांतरणाचे साधन असते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 216)

साधना, योग आणि रूपांतरण – ८२

(बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक अस्तित्व यांमधील आवरण भेदण्याच्या प्रक्रियेसंबंधी आपण कालच्या भागात माहिती घेतली.)

ही आंतरिक प्रक्रिया अनेक प्रकारे घडू शकते. आणि संपूर्णपणे बुडी घेण्याच्या ज्या सर्व खुणा असतात त्या सर्व एकत्रितपणे आढळून येतील असा एक व्यामिश्र अनुभवदेखील कधीकधी येऊ शकतो. आपण कोठेतरी आतमध्ये जात आहोत किंवा खूप खोलवर जात आहोत अशी एक संवेदना त्यामध्ये असते. आंतरिक गहनतेच्या दिशेने प्रवास चालू असल्याची जाणीव असते; आणि बरेचदा एक स्थिरतेची, सुखद सुन्नतेची (numbness), आणि हातपाय जड झाल्याची जाणीव असते. वरून येणाऱ्या शक्तीच्या दबावामुळे चेतना, शरीरामधून निघून अंतरंगामध्ये वळत असल्याची ती खूण असते. त्या दबावामुळे शरीर हे आंतरिक जीवनासाठी (आवश्यक असणाऱ्या) एका अचल आधाराचे रूप घेते किंवा एक प्रकारच्या सुदृढ आणि स्थिर उत्स्फूर्त आसनाच्या स्थितीमध्ये येते. लाटा खालून वर डोक्यापर्यंत उसळत आहेत अशा प्रकारची एक जाणीव असते, आणि त्यामुळे बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक जागृतीचा अनुभव येतो.

आधारामधील (मन, प्राण, शरीर यातील) कनिष्ठ चेतना वर असणाऱ्या उच्चतर चेतनेस भेटण्यासाठी आरोहण (ascend) करत असते. तांत्रिक मार्गामध्ये ज्यावर खूप भर दिला जातो त्या कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रियेशी ही प्रक्रिया मिळतीजुळती असते. कुंडलिनी शक्ती शरीरामध्ये वेटोळे घातलेल्या स्थितीत सुप्त असते आणि ती मज्जारज्जूद्वारे आरोहण करत जाते आणि चक्रांच्या माध्यमातून ब्रह्मरंध्राच्याही वर स्थित असणाऱ्या ‘ईश्वरा’ला भेटण्यासाठी ब्रह्मरंध्रापर्यंत जाते, या प्रक्रियेशी तो अनुभव समकक्ष असतो. आमच्या पूर्णयोगामध्ये, ही काही विशेष अशी प्रक्रिया नसते, तर समग्र कनिष्ठ चेतना ही कधी प्रवाहांच्या रूपात तर कधी लाटांच्या रूपात उत्स्फूर्तपणे वर उसळी मारत असते, तर कधीकधी ही प्रक्रिया कमी सघन असते. आणि दुसऱ्या बाजूने, ‘ईश्वरी चेतना’ आणि तिच्या ‘शक्ती’चे शरीरामध्ये अवरोहण (descent) होत असते. स्थिरता आणि शांती, ऊर्जा आणि शक्ती, प्रकाश, मोद आणि आनंद, व्यापकता आणि मुक्तता, आणि ज्ञान या गोष्टी जणू शरीरामध्ये वरून ओतल्या जात आहेत असा तो अवरोहणाचा अनुभव असतो. ‘ईश्वरी अस्तित्वा’चा किंवा ‘उपस्थिती’चा अनुभव येतो. कधीकधी यापैकी एखादा तर कधी त्यातील बरेचसे किंवा कधीकधी तर सर्वच एकत्रितपणे, असा अनुभव येतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 215-216)

साधना, योग आणि रूपांतरण – ७५

निश्चल – नीरवतेचे (silence) ‘अवरोहण’ ही गोष्ट मी इतर योग-प्रणालींमध्ये ऐकलेली नाही; इतर योगांमध्ये मन निश्चल-नीरवतेमध्ये ‘प्रविष्ट होणे’ हा भाग आढळून येतो. पण तरीदेखील मी जेव्हापासून आरोहण (ascent) आणि अवरोहण (descend) यांविषयी लिहीत आहे तेव्हापासूनच मला अनेक ठिकाणाहून असे सांगितले जात आहे की, (मी सांगत आहे त्या) या योगामध्ये नवीन असे काहीच नाही. आणि म्हणून मला नवल वाटते की, आरोहण आणि अवरोहण म्हणजे काय, हे माहीत नसताना त्यांना त्याचा अनुभव येत होता की काय? किंवा असे होते काय की, त्यांचे त्या प्रक्रियेकडे लक्ष गेले नव्हते?

या योगामध्ये मला आणि इतरांना जो अनुभव आलेला आहे तो असा आहे की, चेतना मस्तकाच्या वर आरोहण करते आणि तेथे वास्तव्य करते. मी जेव्हा प्रथम याविषयी बोललो होतो तेव्हा लोकं माझ्याकडे बघायला लागले आणि मी काहीतरी निरर्थक बोलत आहे असा विचार करू लागले. पूर्वीच्या योगमार्गाचा अवलंब करणाऱ्या व्यक्तींना व्यापकतेची जाणीव नक्कीच झालेली असली पाहिजे कारण अन्यथा स्वतःमध्ये विश्व सामावले असल्याचा अनुभव त्यांना आला नसता किंवा शारीर-चेतनेपासून स्वतंत्र झाल्याचा किंवा ‘अनंतम् ब्रह्मा’शी एकत्व पावल्याचा अनुभव त्यांना आला नसता.

सर्वसाधारणपणे, उदाहरणार्थ तंत्रयोगामध्ये, मस्तकाच्या शिखरावर, ब्रह्मरंध्रापर्यंत आरोहण करणाऱ्या चेतनेचा अनुभव हा सर्वोच्च असल्याचे सांगितले जाते. राजयोगामध्येसुद्धा सर्वोच्च अनुभव घेण्याचे साधन म्हणून ‘समाधी’वर भर दिलेला आढळतो. परंतु हे स्पष्टच आहे की, व्यक्ती जर जाग्रतावस्थेमध्ये ‘ब्राह्मी स्थिती’ मध्ये नसेल तर त्या साक्षात्काराला पूर्णता प्राप्त होऊ शकत नाही. भगवद्गीता अगदी सुस्पष्टपणे ‘समाहित’ असण्यासंबंधी सांगते. (ही अवस्था समाधीमध्ये असणाऱ्या अवस्थेशी समांतर असते.) तसेच ब्राह्मी स्थितीसंबंधीही भगवद्गीतेमध्ये सुस्पष्टपणे उल्लेख येतो. ही अशी एक स्थिती असते की, ज्यामध्ये व्यक्ती जाग्रतावस्थेमध्ये (समाधी-अवस्थेत असल्याप्रमाणे) जीवन व्यतीत करते आणि सर्व क्रियाकलाप करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 377)