पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

(पूर्वार्ध)

श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या आधीपासूनच अस्तित्वात असते. सर्वसाधारणपणे असे आढळते की, व्यक्ती अनुभवाच्या बळावर नाही, तर श्रद्धेच्या बळावर योगसाधनेला सुरुवात करते. ही गोष्ट फक्त योगमार्ग आणि आध्यात्मिक जीवनाबाबतीतच लागू पडते असे नाही; तर ती सामान्य जीवनात सुद्धा लागू पडते. कार्यप्रवण व्यक्ती, संशोधक, नवज्ञान-शोधक (inventors), ज्ञाननिर्माते (त्यांच्या वाटचालीला) सुरुवात करतात ती श्रद्धेनेच. जोपर्यंत एखादी गोष्ट सिद्ध होत नाही किंवा घडून येत नाही तोपर्यंत अगदी निराशा जरी आली, अपयश आले, किंवा विरोधी पुरावा सापडला, नकार मिळाला तरीदेखील ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहतात; कारण त्यांच्यामधीलच कोणीतरी त्यांना सांगत असते की, (तुम्ही ज्याचा पाठपुरावा करत आहात) त्यामध्ये तथ्य आहे, त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे, ती गोष्ट साध्य केली पाहिजे.

अंधश्रद्धा चुकीची नाही का, असे रामकृष्ण परमहंस यांना विचारले असता, ते तर पुढे जाऊन असे म्हणाले की, श्रद्धा एकाच प्रकारची असू शकते आणि ती म्हणजे अंधश्रद्धा. कारण श्रद्धा ही एकतर अंधच असते अन्यथा ती श्रद्धाच नसते, मग ती इतर काहीतरी असते – मग ते तर्कशुद्ध अनुमान असेल, पुराव्याने सिद्ध केलेली प्रचिती असेल किंवा स्थापित झालेले ज्ञान असेल. (उत्तरार्ध उद्याच्या भागात)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 92-93)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही. मला असे वाटते की, (जे लोक अमुक एका गोष्टीला अंधश्रद्धा असे संबोधतात) त्या गोष्टीवर ते पुराव्याविना विश्वास ठेवणार नाहीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असावा. परंतु पुराव्यानंतर जो निष्कर्ष निघतो तो निष्कर्ष म्हणजे श्रद्धा नसते, तर तो निष्कर्ष म्हणजे एक मानसिक प्रचिती असते किंवा तो त्यातून झालेला बोध असतो.

श्रद्धा ही अशी एक गोष्ट असते की, जी पुराव्याच्या किंवा ज्ञानाच्या आधी व्यक्तीकडे असते आणि ज्ञानाप्रत किंवा अनुभूतीप्रत घेऊन जाण्यासाठी ती तुम्हाला मदत करते. ईश्वर अस्तित्वात आहे याचा कोणताही पुरावा देता येत नाही, परंतु जर माझी त्यावर श्रद्धा असेल तर, मला दिव्यत्वाची अनुभूती येऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 91)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे. जे सत्य मनाला अजूनपर्यंत ज्ञान म्हणून कवळता आलेले नाही त्या सत्याची एक झलक म्हणजे श्रद्धा.

*

साधकाने आध्यात्मिक गोष्टींवर श्रद्धा ठेवावी अशी त्याच्याकडून अपेक्षा केली जाते; पण ती श्रद्धा अज्ञानमय नव्हे तर प्रकाशमय असणे अपेक्षित असते. त्याने अंधकारावर नव्हे तर, प्रकाशावर श्रद्धा ठेवणे अपेक्षित असते. ही श्रद्धा बाह्य रंगरूपांकडून किंवा दृश्यमान तथ्यांकडून मार्गदर्शन घेण्यास नकार देते (ही श्रद्धा बाह्य रंगरूपांना किंवा दृश्यमान तथ्यांना भुलून, त्यांच्या आधारे निर्णय घेत नाही.) कारण त्या पाठीमागे असणारे सत्य तिला दिसत असते. ही श्रद्धा साक्षी, पुरावे यांच्या कुबड्या घेऊन चालत नाही आणि म्हणून शंकेखोर बुद्धीला ती अंधश्रद्धा आहे असे वाटत असते.

(वास्तविक) ती श्रद्धा म्हणजे अंतर्ज्ञान असते. अनुभवाने तिला समर्थन पुरवावे म्हणून हे अंतर्ज्ञान वाट पाहते आणि हे अंतर्ज्ञानच (साधकाला) त्या अनुभवाप्रत घेऊन जाते. मी जर स्वतःला तंदुरुस्त करण्यासाठी, स्वतःच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवत असेन तर, कालांतराने का होईना पण त्याचे मार्ग माझे मला सापडतील. त्याचप्रमाणे, माझी जर रूपांतरणावर श्रद्धा असेल तर, रूपांतरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची उकल करून घेऊन, मी ते साध्य करून घेऊ शकेन.

पण मी जर मनात शंका उपस्थित करूनच (साधनेला) प्रारंभ केला आणि ती शंका मनात तशीच बाळगून वाटचाल केली तर त्या मार्गावर मी कुठवर प्रगत होऊ शकेन? हा प्रश्नच आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 91), (CWSA 28 : 349)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प आणि अभीप्सेला स्थान आहे, मात्र इच्छेला थारा नाही. जर इच्छा असेल तर तेथे आसक्ती, अपेक्षा, लालसा, समत्वाचा अभाव, ईश्वरप्राप्ती झाली नाही तर होणारे दुःख यासारख्या, योगाशी विसंगत असणाऱ्या सर्व गोष्टी आढळून येतील.

*

व्यक्तीला जे काही प्राप्त होते त्याबाबत तिने समाधानी असले पाहिजे आणि तरीही सर्वत्व (all) साध्य होत नाही तोपर्यंत व्यक्तीने, अधिकासाठी कोणताही संघर्ष न करता, शांतपणे आस बाळगली पाहिजे. तेथे इच्छा असता कामा नये, संघर्षसुद्धा असता कामा नये तर अभीप्सा, श्रद्धा, खुलेपणा असला पाहिजे आणि (मुख्य म्हणजे) ईश्वरी कृपा असली पाहिजे.

श्रीअरविंद (CWSA 29 : 61, 60)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे अगदी साधनेतील प्रयत्नांमध्येसुद्धा तुमची इच्छा मिसळलेली आहे, यात शंकाच नाही आणि तीच तुमची अडचण आहे. इच्छा आली की तिच्यासोबतच, प्रयत्नांच्या बाबतीत एक प्रकारची अधीरतेची वृत्ती येते. (म्हणजे त्या प्रयत्नांचे फळ लगेच मिळावे असे व्यक्तीला वाटू लागते.) तसेच, जेव्हा कधी अडचण जाणवते किंवा परिणाम तत्काळ होताना दिसत नाहीत तेव्हा निराशेची व बंडखोरीची प्रतिक्रिया आणि त्यासारख्या गोंधळ व अस्वस्थ करणाऱ्या अन्य भावना निर्माण होतात.

इच्छेच्या या भेसळीपासून पूर्णतः सुटका करून घेणे हे निश्चितच सोपे नाही, ते तसे कोणासाठीच सोपे नसते; परंतु अशी सुटका व्हावी म्हणून एखाद्या व्यक्तीने संकल्प केला असेल तर ही गोष्टसुद्धा शाश्वत शक्तीच्या साहाय्याने प्रत्यक्षात येऊ शकते.

अभीप्सा ही इच्छेचे किंवा अभिलाषेचे रूप असता कामा नये तर, ती अंतरात्म्याची निकड असली पाहिजे. ईश्वराभिमुख होण्याचा आणि ईश्वराचा शोध घेण्याचा शांत, स्थिर संकल्प तेथे असला पाहिजे.

श्रीअरविंद (CWSA 29 : 60-61)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे (व्यक्तीमध्ये) बदल घडून येतो.

*

अभीप्सेमध्ये शब्दांची आवश्यकता नसते. अभीप्सा शब्दांद्वारे किंवा शब्दांवाचूनही व्यक्त होऊ शकते.

*

अभीप्सा ही विचारांच्या रूपातच असली पाहिजे असे काही गरजेचे नसते. ती आंतरिक भावनेच्या रूपातदेखील असू शकते. मन कामामध्ये गुंतलेले असतानासुद्धा ती टिकून राहू शकते.

*

स्वतःसाठी काही मिळविण्याच्या इच्छेमधून सहसा (दिव्य शक्ती) खेचून घेणे (Pulling) ही प्रक्रिया घडू लागते; पण अभीप्सेमध्ये मात्र, उच्चतर चेतना अवतरित व्हावी आणि तिने आपल्या अस्तित्वाचा ताबा घ्यावा म्हणून, तिच्याप्रत केलेले आत्मदान (self-giving) असते. जेवढी साद उत्कट असते, तेवढे हे आत्मदान अधिक असते.

श्रीअरविंद (CWSA 29 : 59-60, 58, 58, 61)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३३

अभीप्सा अधिक एक-लक्ष्यी असेल तर साहजिकच प्रगती अधिक वेगाने होते. पण त्यामध्ये जर प्राणाचा, त्याच्या इच्छावासनांसहित आणि शरीराचा, त्याच्या गतकालीन सवयीच्या वृत्तींसहित शिरकाव झाला तर मात्र अडचण येते आणि तसा तो शिरकाव बहुतेक सर्वांमध्येच होतो. असा शिरकाव होतो तेव्हा अभीप्सेमध्ये अस्वाभाविकता येते आणि साधनेमध्ये एक प्रकारची निरसता येते. अशी निरसता हा साधनेतील सर्वश्रुत अडथळा असतो. परंतु व्यक्तीने निराश होता कामा नये; चिकाटी बाळगली पाहिजे. या शुष्क कालावधीमध्येही व्यक्तीने संकल्प दृढ ठेवला तर (अस्वाभाविकता आणि निरसता) या गोष्टी निघून जातात आणि त्यानंतर अभीप्सेची एक महत्तर शक्ती व अनुभूती शक्य होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 61)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३२

अभीप्सा (aspiration) जशी असेल अगदी तंतोतंत त्यानुसारच उच्चतर चेतना अवतरित होईल असे नाही; पण म्हणून अभीप्सा काही निष्फल ठरत नाही. अभीप्सेमुळे चेतना खुली ठेवली जाते; तसेच येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मूकसंमती देण्याची साधकामध्ये जी एक निष्क्रिय अवस्था असू शकते त्या अवस्थेला अभीप्सेमुळे एक प्रकारचा आळा बसतो. आणि उच्चतर चेतनेच्या स्रोतांप्रति एक प्रकारची ओढ निर्माण होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 58)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३१

कोणतेही साहाय्य नसताना, केवळ स्वतःच्या अभीप्सेच्या आणि संकल्पशक्तीच्या आधारे, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींवर मात करता येईल असे बळ क्वचितच एखाद्याकडे असते. आणि अगदी कोणी जरी अशी मात केलीच तरी त्याला या कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींवर केवळ एका विशिष्ट प्रकारचेच नियंत्रण मिळविता येते, त्यांच्यावर पूर्ण प्रभुत्व मिळविता येत नाही.

कनिष्ठ शक्तींशी सामना करत असताना, आपण ईश्वरी शक्ती‌च्या बाजूचे असावे यासाठी आणि ईश्वरी शक्ती‌चे साहाय्य मिळविता यावे यासाठी (साधकाकडे) संकल्पशक्ती व अभीप्सा असणे आवश्यक असते. आध्यात्मिक संकल्पाची आणि हृदयाच्या आंतरात्मिक अभीप्सेची परिपूर्ती करणारी ईश्वरी शक्तीच केवळ (कनिष्ठ प्रकृतीवर) विजय मिळवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 721)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३०

साधक एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तरी त्याने वैयक्तिकरित्या अभीप्सा बाळगणे आवश्यकच असते. सारे काही आपोआप घडून येत आहे आणि विकासासाठी विशिष्ट ज्ञान व सहमतीचीच तेवढी आवश्यकता आहे अशी अवस्था येत नाही तोपर्यंत तरी, ही वैयक्तिक अभीप्सा आवश्यक असते.

*

ईश्वराला केलेले आवाहन म्हणजे ‘अभीप्सा’ आणि चेतना-शक्तीने प्रकृतीवर टाकलेला दबाव म्हणजे ‘संकल्पशक्ती’.

*

‘अभीप्सा’ म्हणजे शक्तींना केलेले आवाहन. शक्तींकडून जेव्हा त्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो तेव्हा साधकामध्ये अविचल ग्रहणशीलतेची एक केंद्रिभूत झालेली पण सहजस्फूर्त अशी स्वाभाविक स्थिती असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 58, 57, 57)