आंतरिक आध्यात्मिक प्रगती ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, तर बाह्य परिस्थितीला आपण अंतरंगातून कशी प्रतिक्रिया देतो यावर ती अवलंबून असते. आध्यात्मिक अनुभवाचा तो नेहमीच अंतिम निष्कर्ष राहिलेला आहे. आणि म्हणूनच योग्य दृष्टिकोन बाळगण्यावर आणि त्यात सातत्य राखण्यावर आम्ही इतका भर देत असतो; बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसणाऱ्या आंतरिक स्थितीवर म्हणजे समतेच्या आणि स्थिरतेच्या स्थितीवर आम्ही भर देत असतो. आंतरिक आनंदाची स्थिती एकाएकी येऊ शकणार नाही पण, जीवनातील धक्के व आघात यांच्या नेहमीच अधीन असणाऱ्या पृष्ठवर्ती मनामध्ये राहण्यापेक्षा, अंतरंगात अधिकाधिक प्रवेश करून, तेथून जीवनाकडे पाहण्यावर आमचा भर असतो. या आंतरिक स्थितीमुळेच व्यक्ती जीवन आणि त्याच्या अस्वस्थकारी शक्तींपेक्षा अधिक शक्तिशाली बनू शकते आणि विजय प्राप्त करण्याची थोडीफार तरी आशा बाळगू शकते.

अंतरंगामध्ये अविचल (quiet) राहणे, अडीअडचणी किंवा चढउतार यांमुळे अस्वस्थ किंवा नाउमेद होण्यास नकार देऊन, त्यामधून सहीसलामत पार होण्याचा दृढ संकल्प बाळगणे, या योगमार्गावरील शिकण्यायोग्य गोष्टींपैकी काही प्रारंभिक गोष्टी आहेत.

या व्यतिरिक्त अन्य काही करणे म्हणजे चेतनेच्या अस्थिरतेस प्रोत्साहन देण्यासारखे आहे, परंतु तुम्ही अंतरंगामध्ये स्थिर आणि अविचल राहू शकलात तर मग, अनुभवांचा प्रवाह काहीशा स्थिरपणाने वाहू लागेल. अर्थात या वाटचालीमध्ये व्यत्यय आणि चढउतार येणारच नाहीत, असे नाही. परंतु या गोष्टी योग्य रितीने हाताळल्या गेल्या तर, या कालावधीमध्ये साधनाच झाली नाही, असे होत नाही. तर हाच कालावधी अडचणी संपुष्टात येऊन, आधी आलेले अनुभव पचवण्यासाठीचा कालावधी ठरू शकतो.

बाह्य परिस्थितीपेक्षा आध्यात्मिक वातावरण हे नेहमीच अधिक महत्त्वाचे असते. साधकाला जर ते प्राप्त होऊ शकले आणि तो स्वतः ज्यामध्ये श्वास घेऊ शकेल व ज्यामध्ये जीवन जगू शकेल असे स्वतःचे आध्यात्मिक वातावरण साधक स्वत: तयार करू शकेल तर, ती परिस्थिती प्रगतीसाठी खरी सुयोग्य परिस्थिती असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 140)

(आज ही मालिका समाप्त होत आहे.)

सर्व प्रकारच्या पसंती-नापसंतीपासून मुक्त असणे आणि ईश्वरी संकल्पाकडून जे काही प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करणे ही गोष्ट कोणत्याही मनुष्याला अगदी सुरुवातीलाच शक्य होत नाही.

त्यासाठी व्यक्तीकडे प्रारंभी कोणती गोष्ट असली पाहिजे? तर, ईश्वर जो संकल्प करेल तो भल्यासाठीच असतो, अशी नित्य धारणा व्यक्तीकडे असली पाहिजे. हे असे कसे काय, हे जरी मनाला उमगले नाही तरीही, व्यक्तीने तशी धारणा बाळगली पाहिजे. तसेच, जी गोष्ट तिला अजूनपर्यंत आनंदाने स्वीकारता येत नाहीये ती गोष्ट तिने सहिष्णू वृत्तीने स्वीकारली पाहिजे. पृष्ठभागावर, बाह्य घटनांबद्दलच्या तात्कालिक प्रतिक्रियांच्या काही तात्पुरत्या गतीविधी कदाचित असू शकतील परंतु तेव्हासुद्धा व्यक्तीने स्थिर समत्वापर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. एकदा हे समत्व दृढपणे प्रस्थापित झाले की मग बाकी सर्व गोष्टी येऊ शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 134)

अहंकाराचा अभाव म्हणजे समता नव्हे, तर इच्छावासना आणि आसक्तीचा अभाव म्हणजे समता. म्हणजे मी असे म्हटले आहे की, ‘समता‌’ या शब्दामधून इच्छावासना आणि आसक्तीचा अभाव यांचा निर्देश होतो; अहंकाराची जाणीव नाहीशी होईल का, ती सूक्ष्म आणि व्यापक रूपामध्ये टिकून राहील, हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 133)

संपूर्ण समता प्रस्थापित होण्यासाठी वेळ लागतो. आंतरिक समर्पणाद्वारे जिवाने ईश्वराला केलेले आत्मदान, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आध्यात्मिक स्थिरतेचे व शांतीचे अवतरण आणि समतेला विरोध करणाऱ्या अहंकारी, राजसिक आणि त्यासारख्या सर्व भावनांना दृढतापूर्वक, सातत्यपूर्ण व दीर्घकाळ दिलेला नकार या तीन गोष्टींवर समता आधारित असते. त्यासाठी हृदयामध्ये संपूर्ण आत्मनिवेदन व अर्पण भाव असणे ही गोष्ट सर्वप्रथम आवश्यक असते. रजोगुणाचा, अहंकाराचा त्याग इ. गोष्टी परिणामकारक होण्यासाठी आध्यात्मिक स्थिरतेमध्ये आणि समर्पणामध्ये वृद्धी होणे ही स्थिती आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 131)

समत्व-वृत्ती ही खऱ्या आध्यात्मिक चेतनेचा मुख्य आधार असते. जेव्हा एखादा साधक प्राणिक भावावेगाच्या लाटेबरोबर, भावनेद्वारे, वाणीद्वारे वा कृतीद्वारे स्वत:ला वाहवत जाऊ द्यायला संमती देतो तेव्हा, तो साधक या समत्वापासूनच विचलित होतो. स्थिर झालेले समत्व हे नि:संशयपणे खूप मोठ्या प्रमाणात, कधीकधी तर अगदी अमर्यादपणे माणसाची सहनशीलता आणि क्षमाशीलता वाढविते. तरीही ती क्षमाशीलता म्हणजे समत्व नव्हे.

शांत व अविचल मन आणि प्राण म्हणजे समत्व. तुमच्या बाबतीत घडलेल्या किंवा तुमच्याविषयी बोलल्या गेलेल्या किंवा तुमच्याबाबत केल्या गेलेल्या कोणत्याही गोष्टींनी वा घटनांनी अस्वस्थ किंवा विचलित न होता, वैयक्तिक भावभावनांमधून उत्पन्न होणाऱ्या विकारांपासून मुक्त होऊन, त्यांच्याकडे थेटपणे पाहणे आणि त्या गोष्टींच्या पाठीमागे काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे; त्या का घडतात, त्यापासून आपण काय धडा घेतला पाहिजे; आपल्यामध्ये असे काय आहे की, ज्यामुळे त्या गोष्टी आपल्या विरोधात उभ्या ठाकल्या; त्यापासून कोणता आंतरिक लाभ किंवा प्रगती आपण करून घेऊ शकतो, हे सारे स्वच्छ दृष्टीने पाहणे म्हणजे समत्व. प्राणिक आवेगांवरील आत्म-प्रभुत्व म्हणजे समत्व. राग, अति-संवेदनशीलता, गर्व, तसेच इच्छावासना आणि तत्सम गोष्टी या साऱ्या प्राणिक आवेगांवरील आत्म-प्रभुत्व म्हणजे समत्व. तसेच (राग, अति-संवेदनशीलता, गर्व, इच्छावासना इ.) या गोष्टींना आपल्या भावनिक अस्तित्वाचा ताबा घेऊ न देणे, त्यांच्यामुळे आपली आंतरिक शांती बिघडवू न देणे; त्यांच्या भरीस पडून, बोलण्याची किंवा कृती करण्याची घाई न करणे; तर नेहमीच आत्म्याच्या आंतरिक शांत स्थितीत राहून बोलणे आणि कृती करणे म्हणजे समत्व.

असे समत्व पूर्णांशाने आणि परिपूर्ण प्रमाणात असणे ही गोष्ट सोपी नाही, तरीही व्यक्तीने अशा समत्वास आपल्या आंतरिक स्थितीचा आणि बाह्य हालचालींचा पाया बनविण्याचे अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत.

समत्वाचा आणखी एक अर्थ आहे. तो म्हणजे विविध व्यक्ती, त्यांची प्रकृती, त्यांच्या कृती, त्यांना कृतिप्रवण करणाऱ्या शक्ती या सर्व गोष्टींकडे समदृष्टीने पाहणे. (समदृष्टीने पाहताना) त्या व्यक्तीने स्वतःच्या मनातून, त्यांच्याविषयीच्या दृष्टिकोनातील आणि त्यांच्याविषयीचे मत बनविण्यामधील सर्व वैयक्तिक भावभावना दूर सारलेल्या असतात, तसेच त्यांच्याविषयीचे सर्व मानसिक पूर्वग्रह व्यक्तीने मनातून दूर केलेले असतात. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्यांच्याविषयीचे सत्य दिसण्यास मदत होते.

वैयक्तिक भावभावनांमुळे नेहमीच विपर्यास होतो आणि इतरांच्या कृतींकडे पाहताना, त्या कृती (वस्तुनिष्ठपणे) पाहण्याचे सोडून, व्यक्ती त्या पाठीमागील गोष्टी (म्हणजे अमुक एका कृतीमागे ती कृती करणाऱ्या व्यक्तीचा हेतू काय होता इत्यादी गोष्टी) पाहायला लागते; वास्तविक, बरेचदा अशा गोष्टी तिथे अस्तित्वातच नसतात. आणि ज्या गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या अशा गोष्टींमध्ये म्हणजे गैरसमजुती, चुकीचे आडाखे अशा गोष्टींमध्ये त्यांचे पर्यवसान होते. छोटे परिणाम करणाऱ्या गोष्टीही मग विक्राळ रूप धारण करतात. मी हे पाहिले आहे की, जीवनातील अनिष्ट घटनांपैकी निम्म्यापेक्षा अधिक घटना याच कारणामुळे घडतात.

परंतु सर्वसामान्य आयुष्यात मात्र वैयक्तिक भावभावना, संवदेनशीलता या बाबी मानवी प्रकृतीचा एक नेहमीचा भाग असतात आणि स्वसंरक्षणासाठी त्यांची गरज पडू शकते. असे असूनदेखील मला असे वाटते की, अगदी तेथेसुद्धा इतरांविषयीचा आणि सर्व गोष्टींविषयीचा एक दृढ, विशाल आणि समत्वपूर्ण दृष्टिकोन हा संरक्षणाचा अधिक चांगला मार्ग असू शकतो. साधकासाठी मात्र, भावभावना, अति-संवेदनशीलता यांवर मात करून, आत्म्याच्या शांत सामर्थ्यामध्ये जीवन जगणे, हा त्याच्या प्रगतीचा एक आवश्यक भाग असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130-131)

सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये अंतरंगामध्ये अविचल राहणे म्हणजे समत्व (equality).

*

समत्वाशिवाय साधनेचा भरभक्कम पाया रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य स्थिरतेने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारण्यास शिकले पाहिजे. या गोष्टी हीच समत्वाची कसोटी असते. सर्व गोष्टी सुरळीत असताना, माणसं आणि परिस्थिती सुखकारक असताना समत्व बाळगणे आणि स्थिरता राखणे सहजसोपे असते; पण जेव्हा परिस्थिती विपरित असते तेव्हाच स्थिरता, शांती, समत्व यांच्या परिपूर्णत्वाचा कस लागतो आणि अशा परिस्थितीमध्येच त्या अधिक दृढ, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130, 129)

कोणत्याही बाह्य गोष्टींमुळे, हर्ष किंवा शोक यामुळे, किंवा सुख-दु:खामुळे विचलित न होणे, तसेच लोकं काय म्हणतात किंवा काय करतात यामुळे विचलित न होणे, याला योगमार्गामध्ये समतेची अवस्था म्हणतात किंवा व्यक्तीमध्ये सर्व गोष्टींबाबत समभाव आहे, असे म्हटले जाते. या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचणे हे साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे मन तसेच प्राणामध्ये, अविचलता (quietude) आणि निश्चल-निरवता (silence) येण्यास मदत होते. याचा अर्थ असा की, आता खरोखरच प्राण व प्राणिक मन स्वयमेव अविचल आणि निश्चल-निरव होऊ लागले आहे. त्या पाठोपाठ बुद्धीदेखील अविचल आणि निश्चल-निरव होणार हे निश्चित.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 335)

सत्त्वगुणाच्या माध्यमातून प्रगत होणे, ही पारंपरिक योगमार्गातील एक सर्वसाधारण संकल्पना आहे. पतंजलीप्रणीत योगामध्ये सांगितल्याप्रमाणे यमनियमाद्वारे असेल, किंवा बौद्धमतातील अष्टांगमार्गाद्वारे असेल किंवा भक्तिपंथातील साधुता यांसारख्या साधनांचा अवलंब करून, त्याद्वारे शुद्धीकरण आणि पूर्वतयारी करणे, या साऱ्या पारंपरिक योगाच्या संकल्पना आहेत.

पूर्णयोगामध्ये सत्त्वाच्या माध्यमातून विकसन होत नाही, तर येथे सत्त्वाची जागा समतेच्या जोपासनेद्वारा आणि आंतरात्मिक रूपांतरणाद्वारे (psychic transformation) घेतली जाते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 424)

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही आत्ता जशी व्यापकता आणि स्थिरता बाळगली आहे तशी ती नेहमी टिकवून ठेवलीत आणि हृदयामध्ये देखील जर श्रीमाताजींबद्दल सदोदित प्रेम असेल तर मग सारे काही निर्धोक असते. कारण येथे योगाचा दुहेरी पाया रचण्यात आलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे येथे उच्चतर चेतना ही तिची ऊर्ध्वस्थित शांती, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांसहित अवतरित होते आणि ज्या चैत्य अस्तित्वामुळे सर्व प्रयत्न आणि सर्व उत्स्फूर्त गतिविधी खऱ्या ध्येयाप्रत वळलेल्या राहतात, ते चैत्य अस्तित्व खुले होते. (हा असतो तो दुहेरी पाया.)

श्रीअरविंद (CWSA 30 : 466)

चेतना जेव्हा संकुचित असते, ती व्यक्तिगत असते किंवा शरीरामध्येच बंदिस्त झालेली असते तेव्हा ईश्वराकडून काही ग्रहण करणे अवघड जाते. ही चेतना जेवढी जास्त व्यापक होते, तेवढी ती अधिक ग्रहण करू शकते. एक वेळ अशी येते की, जेव्हा ती विश्वाएवढी व्यापक झाल्याचा अनुभव येतो. तेव्हा समग्र ईश्वरच स्वतःमध्ये सामावून घेता येऊ शकेल असे तिला जाणवते.

*

व्यापकता (wideness) आणि स्थिरता (calmness) या गोष्टी योग-चेतनेचे अधिष्ठान असतात. आणि अनुभूती येण्यासाठी व आंतरिक विकास होण्यासाठी ती सर्वोत्तम परिस्थिती असते. शारीरिक चेतनेमध्ये जर व्यापक स्थिरता प्रस्थापित करता आली आणि त्या स्थिरतेने जर संपूर्ण शरीर आणि त्याच्या सर्व पेशी भरून गेल्या, तर तो शरीराच्या रूपांतरणाचा (transformation) पाया बनू शकतो. खरे सांगायचे तर, ही व्यापकता किंवा स्थिरता असल्याशिवाय रूपांतरण शक्यच नाही.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 274) & (CWSA 29 : 125)