आत्म-संयम आणि निष्ठा
धम्मपद : वास्तविक जी व्यक्ती अजूनही अशुद्ध आहे. अजूनही जिच्या ठिकाणी आत्म-संयम आणि निष्ठा यांचा अभाव आहे, अशी व्यक्ती खरंतर भिक्षुची पीत वस्त्र धारण करण्याच्या योग्यतेची नसते.
श्रीमाताजी : बौद्ध धर्म ज्याला अशुद्धी म्हणून संबोधतो, त्यात मुख्यत: अहंकार आणि अज्ञान या गोष्टींचा अंतर्भाव होतो; कारण बौद्धांच्या दृष्टिकोनातून, सर्वात मोठा कलंक म्हणजे अज्ञान; पण बाह्य गोष्टींचे किंवा प्रकृतीच्या नियमांचे किंवा तुम्ही जे काही शाळेमध्ये शिकता त्याबाबतीतले अज्ञान नव्हे; तर वस्तुमात्राच्या गूढतम सत्याबद्दल असलेले अज्ञान, आपल्या अस्तित्वाच्या मार्गदर्शक तत्त्वाबद्दल, आपल्या जीवितसाराबद्दल असणारे अज्ञान, धर्माबद्दल असणारे अज्ञान.
येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, आत्मसंयमाचा अभाव व सत्यनिष्ठेचा अभाव या दोन दोषांवर येथे भर देण्यात आलेला आहे. सत्यनिष्ठा म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी; धम्मपदाने सर्वाधिक धिक्कार ढोंगीपणाचा केला आहे. आपल्याला आध्यात्मिक जीवन जगावयाचे आहे असे भासवायचे आणि तसे जगावयाचे नाही, आपल्याला सत्यशोधन करावयाचे आहे असे भासवायचे आणि तसे करावयाचे नाही, दिव्य जीवनासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले असल्याचे ज्यातून दिसून येईल अशा बाह्य गोष्टी धारण करावयाच्या (उदा. पीत वस्त्रे परिधान करावयाची) पण आंतरिकरित्या मात्र स्वत:, स्वत:चा स्वार्थ आणि स्वत:च्या गरजा यातच गुंतलेले असावयाचे, ह्या सर्व गोष्टींची धम्मपद निंदा करते.
धम्मपदाने आत्मसंयमावर किती भर दिला आहे हे पाहण्यासारखे आहे. कारण बुद्धाच्या शिकवणीनुसार, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. बुद्धाने मध्यममार्गावर, सुवर्णमध्यावर नेहमीच भर दिला आहे. तुम्ही कोणत्याही एका बाजूला अधिक झुकलेले असता कामा नये, किंवा कोणत्याही एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणे वाईटच. प्रत्येक गोष्टीत समतोल हवा, परिमितता हवी.
म्हणूनच, आंतरिक समतोल असणे, कृतीमध्ये समतोल असणे, प्रत्येक बाबतीत परिमितता असणे, प्रामाणिक असणे, सचोटी व निष्ठा असणे, हे गुण तुम्हाला आध्यात्मिक जीवन आचरण्यासाठी पात्र बनवितात.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 190)
- नैराश्यापासून सुटका – ३३ - October 22, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३२ - October 21, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३१ - October 20, 2025







