चेतनेचा विकास

प्रश्न : समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या जन्मात बुद्धिमान बनावे म्हणून खूप मेहनत केली, पण जर तो पुढच्या जन्मात निर्बुद्ध म्हणून जन्माला आला, तर त्याच्या त्या मेहनतीचा, परिश्रमांचा काय उपयोग?

श्रीमाताजी : अशा व्यक्तीचा चैत्य पुरुष हा निर्बुद्ध नसतो. उदाहरणार्थ असे समजा की, त्या व्यक्तीच्या चैत्य पुरुषाने लेखक असण्याचा आणि त्यामुळे त्याचे अनुभव पुस्तकं आणि भाषणं या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा अनुभव घेतला आहे. म्हणजे तो ज्या परिस्थितीमध्ये, ज्या सहसंबंधांनिशी जगत होता त्या विशिष्ट क्षेत्रातील सगळे अनुभव त्याने घेतले आहेत. पण असे करण्यामध्ये अनुभवाच्या एका क्षेत्राची कमतरता राहून गेली. उदाहरणार्थ, आता तो म्हणतो की, “आजवर मी माझ्या मेंदूने, बुद्धिने विचार करत जगत आलो, एखादा बुद्धिमान माणूस जीवनाला जशा प्रतिक्रिया देईल तशा पद्धतीने आजवर मी देत आलो, आता मात्र मला भावनांनिशी माझे जीवन जगायचे आहे.” कारण बघा नेहमी, बुद्धिच्या अतिवापरामुळे सामान्य जीवनामध्ये भावनांची क्षमता क्षीण होऊन जाते, गमावली जाते. तेव्हा आता एका वेगळ्या अनुभवाचे, विकासाचे क्षेत्र त्याला हवे असल्याने तो त्याच्या वैचारिक उंचीचा त्याग करतो; तो आता बुद्धिमान, प्रज्ञावान लेखक राहत नाही तर, तो एक अतिसामान्य माणूस बनतो, पण आता तो सहृदय बनतो; तो खूप दयाळू, खूप उदार असा बनतो…..

हे काही फार दुर्मिळ उदाहरण आहे असे नाही. उदाहरणार्थ, जो चैत्य पुरुष त्याच्या कमाल वाढीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, एकदा त्याने सत्ताधीशाचे अनुभव (एखाद्या सम्राटाच्या किंवा राजाच्या जीवनाचे) घेतले आहेत तर, आता बारा महिने चोवीस तास शासकीय दिमाख, तामझाम यामध्ये अडकलेले जीवन त्याला नकोसे वाटेल; अगदी सामान्य जीवन, अगदी सामान्य अशा परिस्थितीमध्ये जन्माला येणे, अगदी पारंपरिक सामान्य, मध्यमवर्गीय परिस्थितीमध्ये जन्माला येणे तो पसंत करेल हे शक्य आहे; त्यामुळे देशाचा प्रमुख म्हणून ज्या सगळ्या शासकीय शिष्टाचारांना तो बांधलेला होता त्यांच्याविना, अगदी अज्ञात राहून देखील त्याला काम करता येणे शक्य होईल.

म्हणून जर तुम्ही एका विशिष्ट दृष्टीने त्याकडे पाहिले तर तुम्ही म्हणाल, “हे असे कसे काय ? त्याचे अध:पतन झाले की काय?” पण हे अध:पतन नसते. हे समस्यांना दुसऱ्या बाजूने भिडणे असते, दुसऱ्या दृष्टिकोनातून सामोरे जाणे असते. कारण चेतनेसाठी (खऱ्याखुऱ्या, दिव्य चेतनेसाठी) यश किंवा अपयश ह्या समानच गोष्टी असतात, झगझगाट किंवा सामान्यपण ह्या गोष्टीदेखील सारख्याच असतात. महत्त्वाचा असतो तो चेतनेचा विकास ! आणि जी परिस्थिती अनुकूल आहे असे माणसाला वाटत असते ती कदाचित चेतनेच्या विकासाच्या दृष्टीने खूप प्रतिकूल देखील असू शकते….

– श्रीमाताजी
(CWM 05 : 267)

श्रीमाताजी