मद्यपान आणि अनारोग्य
प्रत्येक देशामध्ये असे काही समूह असतात की जे मद्याचा निषेध करतात किंवा पूर्ण वर्ण्य करतात. मदिरेला स्पर्शही करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यातील सदस्य करतात. आणि काही ठरावीक शहरांमध्ये त्यांच्या विक्रीला बंदी असते. पण इतर ठिकाणी, जिथे दारूचे सेवन आधी माहीत नव्हते, तिथेही आता त्याचा प्रभाव वाढत आहे.
उदाहरणार्थ, भारतामध्ये जिथे अनेक शतके दारूबंदीचे साम्राज्य होते, तिथे प्राचीन गोष्टींमध्ये असलेल्या राक्षसांपेक्षाही अधिक भयानक स्वरूपात तिचा शिरकाव झाला आहे. कारण ज्या भयानक राक्षसांविषयी ते बोलत ते राक्षस केवळ शरीरालाच इजा करणारे असत, तर दारूमध्ये मात्र विचार आणि चारित्र्य नष्ट करण्याची ताकद असते. त्यातील पहिली सुरुवात शरीरापासून होते. जे पालक खूप जास्त प्रमाणात तिचे सेवन करतात, त्यांच्या मुलांना त्रास होतो. ती माणसाच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करते आणि खरंतर जे मानवतेचे सेवक असायला हवेत त्यांना दारू तिचे गुलाम बनवून टाकते.
आपण प्रत्येकानेच खरंतर मानवतेचे सेवक असले पाहिजे. आणि जर का आपण आपल्या खाण्याने किंवा पिण्याने, आपली मनं व शरीरं कमकुवत करून टाकू, तर जे नोकर, नीटपणे काम करू शकत नाहीत अशा वाईट नोकरांमध्ये आपली गणना होईल.
शस्त्र तुटून गेल्यावर एखाद्या सैनिकाची स्थिती काय होईल ? जहाजाचे शीडच गमावल्यावर खलाशाची काय स्थिती होईल ? घोडा लुळापांगळा झाला तर घोडेस्वाराची स्थिती काय होईल? त्याप्रमाणेच, माणसाला प्राप्त झालेल्या सर्वात मौल्यवान अशा त्याच्या क्षमता त्याने गमावल्या तर माणूस काय करू शकेल ? एखाद्या चांगल्या प्राण्याइतकी सुद्धा त्याची किंमत उरणार नाही. कारण प्राणी निदान त्यांना घातक असणाऱ्या अन्नाचे किंवा द्रव्याचे सेवन तरी वर्ज्य करतात.
– श्रीमाताजी
(CWM 02 : 208)
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026
- प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन - March 15, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४ - March 14, 2026






