चैत्य व्यक्तिमत्त्वाचा विकास
प्रश्न : चैत्य व्यक्तिमत्त्वाचा विकास व्यक्तीने कसा घडवावा?
श्रीमाताजी : अनेकानेक जीवनानुभवामधून चैत्य व्यक्तिमत्त्वाची घडण होत असते, ते वृद्धिंगत होत असते, विकसित होत असते आणि अंतत: ते एक परिपूर्ण, जागृत आणि मुक्त अस्तित्व बनते. असंख्य जन्मांमधून ही विकासाची प्रक्रिया अथकपणे चालू असते आणि जर व्यक्तीला त्याची जाणीव नसेल तर, ती याचमुळे असत नाही कारण की, व्यक्ती स्वत:च्या चैत्य अस्तित्वाविषयी जागृत नसते. – चैत्य अस्तित्वाविषयी जागृत असणे हा अटळ असा आरंभबिंदू असतो.
अंतरंगात वळणे आणि एकाग्र होणे यातून व्यक्तीने स्वत:च्या चैत्य अस्तित्वाच्या जागृत संपर्कात यावयास हवे. चैत्य अस्तित्वाचा प्रभाव नेहमीच बाह्यवर्ती अस्तित्वावर पडत असतो, परंतु हा प्रभाव बहुधा नेहमीच गूढ असतो, तो दिसत नाही, त्याचे आकलन होत नाही, जाणवत नाही; जाणवलाच तर तो अगदी खरोखर अपवादात्मक परिस्थितीत जाणवतो.
हा संपर्क आणि त्याचे साहाय्य बळकट करण्यासाठी आणि शक्य झाल्यास, जागृत चैत्य व्यक्तिमत्त्वाच्या विकसनासाठी, व्यक्तीने एकाग्रतेच्या वेळी लक्ष तिकडे वळविले पाहिजे, त्याला जाणून घेण्याची, संवेद्य करण्याची आस बाळगली पाहिजे; त्याचा प्रभाव स्वीकारण्यासाठी स्वत:ला खुले केले पाहिजे आणि जेव्हा कधी त्याच्यापासून कोणते संकेत, संदेश मिळतील तेव्हा प्रत्येक वेळी ते संदेश अगदी काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे पाळण्याबाबत खूप काळजी घेतली पाहिजे.
थोर अभीप्सा बाळगत जीवन जगणे, आंतरिकरित्या शांत बनण्याची, आणि शक्य तितक्या वेळी नेहमीच तसे शांत राहण्याची काळजी घेणे, व्यक्ती ज्या कोणत्या कृती करते त्या प्रत्येक कृतीबाबत परिपूर्ण प्रामाणिकता जोपासणे – या चैत्य पुरुषाच्या अभिवृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.
– श्रीमाताजी
(CWM 16 : 221-222)
- नैराश्यापासून सुटका – ३३ - October 22, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३२ - October 21, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३१ - October 20, 2025







