उच्चतर शक्तीचे अवतरण

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

‘शक्तीला प्रवेश करू द्या,’ असे मी जेव्हा तुम्हाला लिहिले तेव्हा त्याचा अर्थ असा होता की, तुम्ही ती शक्ती खेचण्याची आवश्यकता नाही, मात्र तुमच्या संपूर्ण अभीप्सेद्वारे आणि सहमतीद्वारे तुम्ही तिच्या प्रवेशाला हातभार लावला पाहिजे.

*

अतिमानसिक प्रकाश ‘हटातटाने’ खाली आणणे, खाली खेचणे हे निश्चितच चुकीचे आहे. अतिमानस ही बलपूर्वक मिळविण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा ते स्वतःहून आपोआप उमलून येईल. पण हे घडून येण्यापूर्वी, बरेच काही करावे लागेल आणि ते धीराने, कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.

*

चक्कर येणे, दुर्बलता किंवा अस्वस्थता या गोष्टी असता कामा नयेत. तुमच्यामध्ये अशी लक्षणे आढळत आहेत याचा अर्थ असा की, शरीराकडून आत्मसात केल्या जाणाऱ्या शक्तीपेक्षा, अधिक शक्ती (Force) शरीरामध्ये खेचली जात आहे. अशा वेळी, अडथळा निघून जाईपर्यंत आणि योग्य संतुलन निर्माण होईपर्यंत, तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 480-481)

श्रीअरविंद