वार्धक्य? नव्हे, चिरतारुण्य !
प्रगती करण्याची व विकसित होण्याची क्षमता नसणे ही गोष्ट नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक असते आणि त्यालाच खऱ्या अर्थाने ‘वृद्धत्व’ म्हणता येईल. ज्या क्षणी तुम्ही ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगती करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही (आलेल्या अनुभवातून) बोध घेणे अथवा प्रगल्भ होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रूपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध होता; म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा उतरणीचा प्रवास सुरू झालेला असतो. असे काही तरुण असतात, की जे (वर उल्लेख केलेल्या दृष्टिकोनातून पाहता) वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की, जे (खरे तर) तरुण असतात.
तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्योत बाळगलीत; तुम्ही जागरूकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून, सर्व गोष्टी मागे टाकण्याची तयारी ठेवलीत; तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रूपांतरणासाठी नेहमीच खुले राहिलात, तर तुम्ही चिरंतन तरुण राहाल. मात्र तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यामध्ये संतुष्ट होऊन आरामशीर बसलात; आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखायची अशी जर तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत असे समजावे. खरेतर, हीच असते जर्जरता आणि खरेतर, हाच असतो मृत्यू. जे करायचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे, ते नेहमीच अपुरे असते. गतायुष्याकडे पाहू नका. नेहमी पुढे पाहा आणि नेहमी पुढेच चालत राहा.
– श्रीमाताजी (CWM 03 : 238)
- वार्धक्य? नव्हे, चिरतारुण्य ! - June 29, 2026
- दुर्दैवी परिस्थिती वाट्याला आली तर… - June 28, 2026
- कंटाळ्यावरील उपाय - June 27, 2026






