नैतिक शिक्षणाची संधी
(विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण कसे द्यावे हे श्रीअरविंद यांनी सांगितले होते, ते आपण कालच्या भागात विचारात घेतले. त्या संदर्भात ते पुढे लिहीत आहेत…)
मुलांच्या अंतरंगात उठणाऱ्या नैतिक भावावेगांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची संधी – भलेही मग ती संधी त्यांच्या मर्यादित क्षेत्रातील का असेना – जोपर्यंत त्यांना दिली जात नाही तोपर्यंत नैतिक शिक्षणाचा प्रभाव त्यांच्यावर पूर्ण क्षमतेने पडू शकत नाही. ब्राह्मणाकडे असणारी ज्ञानतृष्णा, आत्म्याप्रत असणारी भक्ती, शुचिर्भूतता, त्यागबुद्धी; क्षत्रियाकडे असणारे धैर्य, साहस, सन्मान, उदात्तता, दाक्षिण्य, देशभक्ती; वैश्याकडे असणारी परोपकारवृत्ती, कौशल्य, उद्योग, दानशूरतेचे उपक्रम आणि सढळपणा; आणि शूद्राने स्वत:ला विसरून अगदी नि:स्वार्थपणे व प्रेमळपणाने केलेली सेवा या सर्व गोष्टी म्हणजे आर्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत.
आम्ही आपल्या संपूर्ण राष्ट्रामध्ये आपल्या युवकांमध्ये अशाच प्रकारची नैतिक वृत्ती असावी अशी इच्छा बाळगत आहोत. पण आर्य परंपरेनुसार स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी जोपर्यंत आपण या युवकांना देत नाही तोपर्यंत आपल्याला ती तशी वृत्ती त्यांच्यामध्ये कशी काय आढळून येईल? मोठे झाल्यानंतर त्यांची जीवने ज्या द्रव्याने घडली जावीत असे आपण अपेक्षित करत आहोत तशी जीवने बालपणी व कुमारवयामध्ये त्यांना परिचित झालेल्या मूल्यांच्या आधारे घडविण्याची संधी आपण त्यांना दिली पाहिजे. म्हणूनच, प्रत्येक मुलाला, त्याच्या प्रकृतीमध्ये जे सर्वोत्तम आहे त्याचे विकसन करण्यासाठी बौद्धिक प्रोत्साहन दिले गेले पाहिजे आणि त्याला प्रत्यक्ष व्यवहारात देखील तशी संधी दिली गेली पाहिजे. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 01 : 391)
- दुर्गुणांचे शुद्धीकरण - June 18, 2026
- नैतिक शिक्षणाची संधी - June 17, 2026
- नैतिक शिक्षणाची सर्वोत्तम पद्धत - June 16, 2026






