मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे आहे.)

कधीही चूक करू नका.
कधीही रागावू नका.
नेहमीच समजावून घ्यायचा प्रयत्न करा.

एखादी गोष्ट का घडली, त्यापाठीमागे कोणती भावना होती, मुलांची आंतरिक जडणघडण कशी झाली आहे, त्यांच्यामधील कोणती गोष्ट अधिक सशक्त करण्याची आवश्यकता आहे, त्यांच्यामधील कोणत्या गोष्टीस प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, या सर्व गोष्टींचे नीटपणे निरीक्षण करून त्या समजावून घेतल्या पाहिजेत.

शिक्षक म्हणून तुम्ही एवढेच करायचे आहे आणि मग मुलांना मुक्त सोडा. त्यांना मोकळेपणाने बहरू द्या. त्यांना अनेक गोष्टी पाहण्याची, अनेक गोष्टी हाताळण्याची, शक्य असतील तितक्या गोष्टी करण्याची संधी द्या. त्यामध्ये त्यांना खूप मजा वाटते. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, तुम्हाला जे माहीत आहे असे तुम्हाला वाटते, ते त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका.

त्यांच्यावर कधीही रागावू नका. नेहमी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जे सांगाल ते समजून घेण्याची जर त्या मुलाची क्षमता असेल तर त्याला ते अधिक स्पष्ट करून सांगा. ते समजावून घेण्याचीही जर त्याची कुवत नसेल आणि त्याच्यामधील चुकीचे स्पंदन खऱ्या स्पंदनाने बदलून टाकण्याची तुमच्या अंगी क्षमता असेल तर तसे करा.

शिक्षकांसाठी एखादा प्रशिक्षण कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे, तसा तो आखला तर ते अतिशय उत्तम होईल. अगदी लहान मुलांपासून त्याची सुरुवात केली पाहिजे. ती मुलं इतकी घडणक्षम असतात की, कोणत्याही छोट्याशा गोष्टीचा सुद्धा त्यांच्या मनावर खूप खोलवर ठसा उमटतो. लहान असताना मुलांना जर सत्याचे बाळकडू पाजले तर, जेव्हा ती मुलं मोठी होतील तेव्हा ती अगदी स्वाभाविकपणे बहरून येतील. आणि हे एक खरोखरच चांगले कार्य असेल.

– श्रीमाताजी (Conversation with a disciple : April 05, 1967)

श्रीमाताजी