द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२
भाग ०२
(व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक का होऊ शकत नाही हे श्रीमाताजी खुलासेवार सांगत आहेत.)
ज्ञानेंद्रियांची कार्यंसुद्धा अशीच विपर्यस्त होऊन जातात. व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती असते तोपर्यंत गोष्टी वास्तवात जशा असतात, त्यानुसार व्यक्ती त्यांच्याकडे पाहत नाही, ऐकत नाही, त्यांचा आस्वाद घेत नाही किंवा त्या गोष्टी वास्तवात जशा असतात त्यानुसार व्यक्तीला त्या संवेदित होत नाहीत. जोपर्यंत काही गोष्टी तुम्हाला सुखावणाऱ्या आणि काही गोष्टी तुम्हाला न सुखावणाऱ्या वाटतात, जोपर्यंत तुम्ही काही विशिष्ट गोष्टींनी आकर्षित होता आणि इतर काही गोष्टी तुम्हाला नकोशा वाटतात, तोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे तुमच्या प्रतिक्रियांच्या, तुमच्या आवडीनिवडीच्या किंवा तिरस्काराच्या दृष्टिकोनातूनच पाहत असता; आणि तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टींमधील सत्य दिसू शकत नाही. ज्ञानेंद्रियं ही साधनं असतात आणि संवेदना, भावना व विचार यांच्याप्रमाणेच तीसुद्धा नीट काम करेनाशी होतात (म्हणजे ती वस्तुंचे सत्य रूप न दाखविता, त्यांचे विपरित रूप प्रस्तुत करतात.)
म्हणून तुम्ही जे काही पाहता, तुम्हाला जे संवेदित होते, तुम्ही जे अनुभवता आणि जो विचार करता त्याविषयी खात्री असण्यासाठी तुम्ही संपूर्णपणे अनासक्त असले पाहिजे. आणि ही गोष्ट काही सोपी नाही, हे अगदी उघड आहे. म्हणून तोपर्यंत (तुम्ही संपूर्णपणे अनासक्त नसाल तर) तुम्हाला झालेले आकलन हे पूर्णत: सत्य असू शकत नाही आणि म्हणून ते प्रामाणिक नसते. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 08 : 398)
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२ - March 12, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१ - March 11, 2026
- संपूर्ण प्रामाणिकपणा - March 10, 2026






