अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १९

असे म्हटले जाते की, “जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा आनंदामध्ये प्रवेश करते.” पण मला तरी हा सर्वात जवळचा मार्ग वाटत नाही. कारण हा आनंद कदाचित काहीसा कोरडा, रुक्ष असू शकतो.

या देहाद्वारेच (वासनामुक्तीची) ही समस्या जर सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून झोकून द्या. वासनांच्या मागे धावण्याचा लांबचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, जर व्यक्तीने साधेपणाने, पूर्णपणे, विनाअट, नफ्यातोट्याची कोणतीही समीकरणे न मांडता, त्या परमोच्च सत्याप्रत, परमोच्च संकल्पशक्ती‌प्रत, परमोच्च अस्तित्वा‌प्रत स्वतःला समर्पित केले; त्याच्या हाती, स्वत:च्या संपूर्ण अस्तित्वाला सर्व अंगांनिशी संपूर्णतया सोपविले, तर तो अहंकारापासून सुटका करून घेण्याचा सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग असतो. लोकं म्हणतील की, तो मार्ग आचरणात आणणे खूप अवघड आहे. परंतु तेथे किमान एक प्रकारची आत्मीयता तरी आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जनशील जीवन आहे.

…संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि देवघेवीविना असे जे आत्मदान असते, त्यालाच मी सकारात्मक मार्ग (Positive way) असे म्हणते. स्वत:च्या स्वार्थाचा कोणताही विचार न करता, स्व-केंद्रित न होता, स्वत:शी काहीही निगडित न करता; सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्येच निमग्न राहणे यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही. ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्यायोग्य आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो. वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, पायरीपायरीने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे यामध्ये जो फरक आहे, तो येथे आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 268-269)

श्रीमाताजी