अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ०३
(उत्तरार्ध)
आपल्या हाती असलेला वेळ मुळातच अगदी कमी असतो आणि तो अधिकच कमी असल्याचे कालांतराने तुमच्या लक्षात येते. जीवनाच्या अखेरीस तुमच्या लक्षात येते की, तुम्हाला मिळालेली संधी तुम्ही तीनचतुर्थांश वेळेला गमावलेली आहे. मग अशा वेळी तुम्ही हाती राहिलेल्या थोड्या वेळातच दुप्पट काम करू पाहता पण त्याचाही काही उपयोग होत नाही. त्यापेक्षा नेमस्तपणे, समतोलपणे, चिकाटीने, शांतपणे कर्म करत राहणे आणि तुम्हाला देण्यात आलेली कोणतीही संधी वाया न दवडणे, म्हणजेच तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या क्षणाचा वापर खऱ्या उद्दिष्टासाठी व्यतीत करणे हे अधिक उत्तम ठरते.
जेव्हा तुमच्याकडे करण्यासारखे काहीच नसते, तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता; तुम्ही सैरभैर होता, मित्रमैत्रिणींना भेटता, फिरायला जाता. लक्षात घ्या, मी येथे फक्त त्यातल्या त्यात बऱ्या गोष्टींचाच उल्लेख करत आहे, ज्या गोष्टी करताच कामा नयेत त्यांच्याविषयी तर मी येथे बोलतच नाहीये. अशा गोष्टी करत बसण्यापेक्षा, विस्तीर्ण पसरलेल्या आकाशाखाली वा समुद्रासमोर किंवा झाडांखाली शांतपणे बसा आणि पुढीलपैकी एखादी तरी गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा – आपण का जगतो हे समजून घ्या, आपण कसे जगायला हवे हे शिका, तुम्हाला जीवनात काय करावेसे वाटते आणि त्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे याचे चिंतन करण्यामध्ये, तसेच ज्यामध्ये तुम्ही जीवन जगत असता त्या गोष्टींपासून म्हणजे अज्ञान, मिथ्यत्व आणि दुःखभोग यांपासून सुटका करून घेण्याचा उत्तम मार्ग कोणता, या साऱ्या गोष्टींचे आकलन करून घेण्यासाठी आणि त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वेळेचा उपयोग करा.
– श्रीमाताजी (CWM 03 : 250-251)
- माणूस चिंताग्रस्त का आहे? - July 29, 2026
- जीवनाचे खरे उद्दिष्ट - July 22, 2026
- आत्मसाक्षात्काराकडून अधिक उच्चतर ध्येयाकडे… - July 21, 2026





