पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे असे दिसते. जो कोणी श्रद्धेने आणि विश्वासाने नामस्मरण करतो त्या प्रत्येकाला जसा अनुभव येतो तसाच तुमचा हा अनुभव आहे. एखादी व्यक्ती संरक्षणासाठी जेव्हा अगदी हृदयापासून धावा करते तेव्हा तो धावा कधीच निष्फळ ठरत नाही.
तुमच्यामध्ये जी श्रद्धा आहे ती कोणत्याही बाह्य परिस्थितीमुळे कधीच विचलित होऊ देऊ नका. कारण सर्व प्रकारच्या प्रसंगांमधून, अडचणींमधून वाट काढत, ध्येयाप्रत घेऊन जाण्याचे सामर्थ्य या श्रद्धेशिवाय अन्य कोणत्याच गोष्टीमध्ये नसते. ज्ञान आणि तपस्येमध्ये कितीही ताकद असली तरीही, ती श्रद्धेपेक्षा काकणभर उणीच ठरते. श्रद्धा ही साधकासाठी त्याच्या योगमार्गावरील वाटचालीसाठी सर्वात मजबूत असा आधार असते.
तुमच्यावर श्रीमाताजींची प्रेममय दृष्टी आहे आणि त्यांचे संरक्षक-छत्र तुमच्यावर आहे. त्यावर भरवसा ठेवा आणि त्याप्रत अधिकाधिक खुले व्हा. तसे केलेत तर ते संरक्षक-छत्र तुमच्यावरील सर्व आघात पळवून लावेल आणि तुम्हाला कवेत घेईल.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 308)
- प्रामाणिकपणा आणि चिकाटी - April 30, 2026
- ईश्वराच्या निवासाचे दरवाजे - April 29, 2026
- अप्रामाणिकपणाचा अडथळा - April 28, 2026







