श्रीमाताजी आणि समीपता – २५

श्रीमाताजी आणि समीपता – २५

साधक : माझ्या मनामध्ये श्रीमाताजींविषयी शुद्ध भक्तीचा उदय कसा होईल?

श्रीअरविंद : विशुद्ध भक्ती, आराधना असणे आणि कोणताही दावा किंवा मागणी न बाळगता ईश्वराविषयी प्रेम असणे याला म्हणतात शुद्ध भक्ती.

साधक : ती कोठून आविष्कृत होते?

श्रीअरविंद : अंतरात्म्यामधून.

*

साधक : श्रीमाताजींविषयीची आंतरात्मिक भक्ती, मानसिक भक्ती आणि प्राणिक भक्ती यांचे स्वरूप कसे असते? ती कशी ओळखायची?

श्रीअरविंद : कोणतीही अपेक्षा न बाळगता केलेले आत्मदान आणि प्रेम हे ’आंतरात्मिक भक्ती’चे स्वरूप असते, तर श्रीमाताजींनी मला त्यांचे अंकित करावे आणि मी त्यांची सेवा करावी अशी इच्छा असणे हे ‘प्राणिक भक्ती’चे स्वरूप असते. आणि श्रीमाताजी जशा आहेत, त्या जे सांगतात आणि त्या जे करतात त्याविषयी कोणतीही शंका न बाळगता, त्याचा केलेला स्वीकार आणि श्रद्धा हे ‘मानसिक भक्ती’चे स्वरूप असते. वस्तुतः भक्तीची ही बाह्यांगी लक्षणे आहेत. त्यांचे आंतरिक स्वरूप ओळखता येण्याइतके सुस्पष्ट असते पण त्यातील भेद शब्दांत मांडायची आवश्यकता नाही.

साधक : ‘पूर्णयोगा’मध्ये मानसिक आणि प्राणिक भक्तीला काहीच स्थान नाहीये का?

श्रीअरविंद : असे कोण म्हणते? प्रत्येक भक्ती, ती जर खरीखुरी भक्ती असेल, तर त्या भक्तीस येथे स्थान आहे.

*

प्रेम व भक्ती ही चैत्य पुरुषाच्या खुले होण्यावर अवलंबून असते आणि त्यासाठी इच्छावासना नाहीशा होणेच आवश्यक असते. बऱ्याच जणांकडून श्रीमाताजींना आंतरात्मिक प्रेमाऐवजी प्राणिक प्रेम अर्पण करण्यात येते; इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या प्राणिक प्रेमामुळेच अधिक अडथळे निर्माण होतात कारण त्यामध्ये इच्छावासना मिसळलेल्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 476-477, 475)

श्रीअरविंद