श्रीमाताजी आणि समीपता – २२

श्रीमाताजी आणि समीपता – २२

साधक : माझी चेतना ही फक्त श्रीमाताजींच्या हृदयावर स्थिरावलेली आहे, जणू काही ती चेतना त्यांच्यामध्येच वसत असावी आणि त्यांच्याशी एकात्म पावलेली असावी. ती केवळ श्रीमाताजींशी एकत्व पावण्याचाच विचार करत असते, ती म्हणते, “मी त्यांच्यामध्ये वसत आहे, आणि माझी वसती तेथेच असली पाहिजे. मला एवढेच पुरेसे आहे, मला त्याव्यतिरिक्त अन्य काहीच नको.” माझी चेतना या विचारांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विचारांना थाराच देत नाही, अगदी उच्चतर किंवा आध्यात्मिक विचारांनासुद्धा त्यामध्ये थारा नाही. या माझ्या भूमिकेकडे तुम्ही कशाप्रकारे पाहता?

श्रीअरविंद : साधारणपणे, आंतरिक अस्तित्व आणि चैत्य अस्तित्व (psychic) जागृत करण्यासाठी ही भूमिका ठीक आहे. परंतु तुम्हाला जर उच्चतर अनुभव आलाच तर त्याला मात्र अडवू नका.

*

साधक : श्रीमाताजींच्या प्रेमाचा भौतिक आविष्कार जेव्हा माझ्या अनुभवास येत नाही, तेव्हा मी विचलित होतो.

श्रीअरविंद : प्रेमाच्या भौतिक आविष्काराची ही अपेक्षा नाहीशी झालीच पाहिजे. साधनेच्या मार्गावरील हा एक घातक असा अडथळा आहे. अशा अपेक्षेची पूर्ती व्हावी म्हणून जी प्रगती घडून येते ती असुरक्षित असते, आणि ज्या शक्तीने ही अपेक्षा निर्माण केलेली असते त्या शक्तीकडून ती प्रगती कोणत्याही क्षणी फेकून दिली जाऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 470, 474)

श्रीअरविंद