श्रीमाताजी आणि समीपता – ०४

श्रीमाताजी आणि समीपता – ०४

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

‘आई आणि मूल’ यांच्यातील ‘प्रेम’ याचा अर्थ फक्त आईनेच मुलावर प्रेम केले पाहिजे असा होत नाही तर, मुलानेसुद्धा आईवर प्रेम केले पाहिजे आणि तिची आज्ञा पाळली पाहिजे असा होतो. तुम्हाला ‘श्रीमाताजीं’चे खरे बालक व्हायचे आहे, पण त्यासाठी प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे तर ती म्हणजे, तुम्ही स्वतःला त्यांच्या हाती सोपविले पाहिजे; म्हणजे मग त्या तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. त्यासाठी तुम्ही त्यांच्या इच्छेनुसार आचरण केले पाहिजे आणि त्या इच्छेकडे दुर्लक्ष करता कामा नये किंवा श्रीमाताजींच्या विरोधात बंडही पुकारता कामा नये. तुम्हाला हे सारे व्यवस्थित माहीत असूनसुद्धा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष का करत आहात?

बालकाचा प्राण ज्याची मागणी करतो (म्हणजे त्याच्या प्राणिक इच्छावासना ज्याची मागणी करतात), त्या मागणीची पूर्तता न करणे, हा सुजाण मातेच्या प्रेमाचाच एक भाग असतो; कारण तिला हे माहीत असते की, बालकाच्या प्राणाची ती मागणी पुरविणे हे त्याच्यासाठी अतिशय वाईट ठरू शकते.

(मथितार्थ असा की) तुमच्या प्राणावेगाच्या आज्ञा पाळू नका, तर तुम्हाला झालेल्या खऱ्या बोधाचे अनुसरण करा आणि स्वतःला ‘श्रीमाताजीं’च्या इच्छेचे माध्यम बनवा. कारण तुम्ही तुमच्या खऱ्या अस्तित्वामध्ये उन्नत व्हावे हीच श्रीमाताजींची नेहमी इच्छा असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 460)

अभीप्सा मराठी मासिक