श्रीमाताजी आणि समीपता – ०१

श्रीमाताजी आणि समीपता – ०१

नमस्कार,

कालपर्यंत आपण ‘पूर्णयोगांतर्गत ध्यान’ या मालिकेद्वारे श्रीमाताजींनी प्रतिपादित केलेल्या काही ध्यानपद्धती विचारात घेतल्या. पूर्णयोगाचा गाभा म्हणजे ईश्वरी शक्तीप्रत, श्रीमाताजींप्रत खुले होणे हा आहे, असे श्रीअरविंद यांनी वेळोवेळी सांगितले आहे.

बरेचदा असे होते की, आपल्यामधील एक भाग, (अंतरात्मा) श्रीमाताजी या ‘ईश्वरी शक्ती’ आहेत असे मान्य करण्यास तयार असतो, परंतु केवळ भौतिक गोष्टींमध्येच अडकलेले आपण, त्यांच्या रुप-वेश-भाषा इत्यादी बाह्य गोष्टींकडे बघत राहतो आणि त्या ‘ईश्वरी शक्ती’ असल्याचे मान्य करण्यास राजी होत नाही. हे असे होते तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो हे श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामध्ये आले आहे. ते लिहितात, “तुमच्यामधील आत्मा तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरित करत असेल आणि तेव्हा तुमच्यामधीलच कोणीतरी, तुम्हाला ती गोष्ट तुम्ही करू नये असे सुचवत असेल तर ते म्हणजे, तो ‘प्रकाश’किरण आणि त्या ‘शक्ती’चे कार्य टाळण्यासाठी तुमच्या प्राणाने (vital) उपयोगात आणलेले एक हत्यार असण्याची खूपच शक्यता असते.’’ आणि हा साधनेतील मोठाच अडथळा असतो.

तसे होऊ नये आणि श्रीमाताजी किंवा ईश्वरी शक्तीप्रत आपण खुले राहावे, त्यांच्याशी आपली आंतरिक जवळीक निर्माण होणे कसे व का महत्त्वाचे आहे, आपल्या साधनेच्या दृष्टीने त्याचे काय मोल आहे, श्रीमाताजींशी समीपता कशी साध्य होईल, या सर्व गोष्टींमधील बारकावे श्रीअरविंद यांनी वेळोवेळी साधकांना सांगितले आहेत. त्यातील निवडक भाग उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘श्रीमाताजी आणि समीपता’ या मालिकेद्वारे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. वाचकांना साधनेसाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होईल असा विश्वास वाटतो.

धन्यवाद.
संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

अभीप्सा मराठी मासिक