आघात नव्हे, आशीर्वाद
साधना, योग आणि रूपांतरण – ५८
जिथे कोणी येणार जाणार नाही अशा एका अगदी शांत कोपऱ्यामध्ये बसले पाहिजे, जिथे तुम्ही अगदी सुयोग्य अशा स्थितीत असाल आणि अगदी नि:श्चल बसलेले असाल आणि (असे असेल तरच) तुम्हाला ध्यान करणे शक्य होईल असे समजण्याची सार्वत्रिक चूक करू नका. यामध्ये काही तथ्य नाही. वास्तविक, कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या ध्यान करता येणे ही आवश्यक गोष्ट आहे. डोकं रिकामं करणे याला मी ‘ध्यान’ म्हणत नाही तर ‘ईश्वरा’च्या निदिध्यासनामध्ये स्वत:चे लक्ष एकाग्र करणे याला मी ‘ध्यान’ म्हणते. आणि असे निदिध्यासन तुम्ही करू शकलात तर, तुम्ही जे काही कराल त्याची गुणवत्ता बदलून जाईल. त्याचे रंगरूप बदलणार नाही, कारण बाह्यतः ती गोष्ट तशीच दिसेल पण त्याची गुणवत्ता मात्र बदललेली असेल. जीवनाची गुणवत्ताच बदलून जाईल आणि तुम्ही जे काही होतात त्यापेक्षा तुम्ही काहीसे निराळेच झाले असल्याचे तुम्हाला जाणवेल. एक प्रकारची शांती, एक प्रकारचा दृढ विश्वास, आंतरिक स्थिरता, अढळ अशी निश्चल शक्ती तुम्हाला जाणवेल.
अशा स्थितीमध्ये तुम्हाला कोणी बाधा पोहोचविणे अवघड असते. हे जगत अनेक विरोधी शक्तींनी भरलेले आहे; त्या शक्ती सर्व काही बिघडवून टाकू पाहत असतात; त्यासाठी विविध शक्ती नेहमीच प्रयत्नशील असतात. …पण त्यामध्ये त्या काही प्रमाणातच यशस्वी होतात. तुम्ही प्रगती करण्यास प्रवृत्त व्हावे यासाठी जेवढ्या प्रमाणात बाधा पोहोचविणे आवश्यक असेल तेवढ्याच प्रमाणात त्या तुम्हाला बाधा पोहोचवितात. जेव्हा कधी तुमच्यावर जीवनाकडून आघात होतो तेव्हा तुम्ही लगेचच स्वत:ला सांगितले पाहिजे, “अरेच्चा, याचा अर्थ आता मला सुधारणा केलीच पाहिजे.” आणि मग तेव्हा तोच आघात हा आशीर्वाद ठरतो. अशावेळी तोंड पाडून बसण्यापेक्षा, तुम्ही ताठ मानेने आनंदाने म्हणता, “मला काय शिकले पाहिजे? ते मला समजून घ्यायचे आहे. मला माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे? ते मला समजून घ्यायचे आहे”… अशी तुमची वृत्ती असली पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 04 : 121-122)
- नैराश्यापासून सुटका – ३३ - October 22, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३२ - October 21, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३१ - October 20, 2025





