पूर्वतयारी करून घेणाऱ्या पहिल्या दोन प्रक्रिया
आध्यात्मिकता ३३
आपण वाचन करतो, आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, आपण स्पष्टीकरण करतो, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु हजारो स्पष्टीकरणांपेक्षा आणि लाखो शब्दांपेक्षा, खऱ्या अनुभवाचा एक क्षणदेखील आपल्याला बरेच काही शिकवून जातो. त्यामुळे पहिला प्रश्न येतो तो असा की, ”हा अनुभव घ्यायचा कसा?”
स्वतःच्या अंतरंगामध्ये प्रवेश करणे ही पहिली पायरी आहे.
तुमच्या अंतरंगामध्ये असलेल्या सद्वस्तुची (reality) जाणीव होण्याइतपत, तुमच्या अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर जाण्यात एकदा का तुम्ही यशस्वी झालात की मग, तुम्ही स्वतःला क्रमाक्रमाने, पद्धतशीरपणे व्यापक करायचे आणि या ब्रह्मांडाएवढे विशाल व्हायचे आणि स्वतःच्या सीमिततेची जाणीव दूर करायची.
पूर्वतयारी करून घेणाऱ्या या पहिल्या दोन प्रक्रिया आहेत. आणि या दोन्ही गोष्टी शक्य तितक्या जास्तीत जास्त स्थिरपणे, शांतपणे आणि प्रशांततेमध्ये केल्या पाहिजेत. ही शांती, ही प्रशांतता, मनामध्ये नीरवता आणि प्राणामध्ये स्थिरपणा निर्माण करते. हा प्रयत्न, हा प्रयास अगदी नियमितपणे, चिकाटीने पुन्हा पुन्हा नव्याने करत राहिला पाहिजे. आणि मग काही विशिष्ट कालावधीनंतर, (हा कालावधी कमी किंवा जास्त असू शकतो) तुम्हाला अशा एका वास्तविकतेची (त्या सद्वस्तुची) जाणीव होऊ लागते की जी वास्तविकता, सर्वसामान्य, बाह्य चेतनेला वास्तवाचा जो बोध होतो त्यापेक्षा निराळी असते.
स्वाभाविकपणे, बाह्य चेतना आणि आंतरिक चेतना यांमधील पडदा अंतरंगामधूनच ‘ईश्वरी कृपे’च्या कृतीमुळे अचानक दूर केला जाऊ शकतो आणि तुमचा एकाएकी खऱ्या सत्यामध्ये प्रवेश होऊ शकतो. पण असे घडून आले तरीसुद्धा, या अनुभूतीचे संपूर्ण मूल्य आणि संपूर्ण परिणाम प्राप्त करून घेण्यासाठी, तुम्ही स्वतःला कायम आंतरिक ग्रहणशीलतेच्या (inner receptivity) स्थितीमध्ये ठेवले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही दररोज अंतरंगामध्ये प्रवेश करणे आवश्यकच असते.
– श्रीमाताजी [CWM 10 : 19-20]
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026
- प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन - March 15, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४ - March 14, 2026





