विचार शलाका – १४
मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच ‘धर्मग्रंथां’मध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, “जे कोणी तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतात त्यांच्याबाबतीत तुम्ही अत्यंत कृतज्ञ असलेच पाहिजेत आणि त्याच्या साथसंगतीची तुम्ही इच्छा बाळगलीच पाहिजे.”
…एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर, जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा, ते म्हणजे जणू काही तुम्हाला एखादा अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे वाटेल. “अरे देवा, अजून एक दोष!” असे म्हणत न बसता किंवा त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुमच्या प्रगतीच्या आड येत होती ती आता तुमच्या पकडीत आलेली असते. आणि एकदा का ती गोष्ट तुमच्या पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की, अमुक एक गोष्ट करण्यायोग्य नाही असे साधकाला ज्या क्षणी समजते, त्याच क्षणी, ती दूर सारण्यासाठी, बाद करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी लागणारी शक्तीही त्याच्या ठायी असते. दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर खेचून काढलेल्या मलिनतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.
– श्रीमाताजी (CWM 03 : 220-221)
- पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी… - April 27, 2026
- योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय - April 26, 2026
- योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल - April 25, 2026




