अरविंद घोष – ३४
‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
मीरा अल्फासा (श्रीमाताजी) दि. २४ एप्रिल १९२० रोजी या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी पाँडिचेरी येथे परतल्या.
पुढे एकदा कधीतरी त्यांचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, ”मी जेव्हा जपानहून परत येत होते (१९२० साली) तेव्हा एक घटना घडली. मी समुद्रामध्ये बोटीवर होते आणि असे काही घडेल अशी अपेक्षाही नव्हती. (मी माझ्या आंतरिक जीवनामध्ये व्यस्त होते, परंतु शरीराने मी बोटीवर राहात होते.) तेव्हा एकदम, एकाएकी, पाँडिचेरीपासून समुद्रामध्ये दोन मैलावर असताना, हवेतील वातावरण अचानकपणे बदलले आणि मला जाणवले की, आम्ही श्रीअरविंदांच्या प्रभावक्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत. तो अगदी भौतिक, सघन असा अनुभव होता.
पुढे ‘सत्प्रेम’ या एका साधकाशी बोलताना त्या म्हणतात, ”जेव्हा मी जपानवरून परतले तेव्हा आम्ही दोघांनी (श्रीअरविंद आणि मी) एकत्रितपणे कार्य सुरु केले; त्यांनी अगोदरच मनोमय जगतामध्ये अतिमानसिक प्रकाश उतरविलेला होता आणि ते मनाचे रूपांतरण करण्याच्या प्रयत्नात होते. श्रीअरविंद मला म्हणाले, “हे खूपच विलक्षण आहे, हे कधीही न संपणारे कार्य आहे. वास्तविक सर्व काही करून झाले आहे तरीही काहीच पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही आणि त्यामुळे पुन्हापुन्हा परत एकदा तेच सगळे करावे लागत आहे.” (क्रमश:)
- नैराश्यापासून सुटका – ०१ - September 19, 2025
- जीवन जगण्याचे शास्त्र – ०१ - August 14, 2025
- आत्मसाक्षात्कार – ०१ - July 17, 2025






