अरविंद घोष – १८
‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
इ. स. १९०७ मध्ये राजद्रोहाचे संशयित म्हणून अरविंद घोष यांच्यावर कारवाई करण्यात आली पण पुढे त्यांची निर्दोष सुटकादेखील झाली. आत्तापर्यंत ते केवळ एक संघटक किंवा लेखक म्हणूनच राहिले होते, परंतु या घटनेमुळे म्हणा किंवा त्यांच्या तुरुंगवासामुळे म्हणा वा इतर नेते लुप्त झाल्यामुळे म्हणा, अरविंदांना बंगालमधील पक्षाचे अधिकृत प्रमुख म्हणून पुढे येणेच भाग पडले आणि तेव्हा प्रथमच ते व्यासपीठावरून जाहीररित्या वक्ते म्हणून बोलले. इ. स. १९०७ मध्ये ज्या सुरत काँग्रेस परिषदेमध्ये दोन तुल्यबळ मतप्रवाहांमध्ये तीव्र मतभेद होऊन काँग्रेसची दोन छकले झाली; त्या सुरत काँग्रेस परिषदेचे अध्यक्षस्थान अरविंदांनी भूषविले होते. लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी मवाळांच्या संमेलनास जाण्यास नकार दिला होता आणि परिणामतः काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ अशी दुफळी निर्माण झाली होती.
अरविंद घोष आणि लोकमान्य टिळक एक प्रकारे समानधर्मा असल्याने, त्यांच्यामध्ये विलक्षण अनुबंध निर्माण झाला होता. त्यांनी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिचित्र रेखाटणारा लिहिलेला सोळा पानी दीर्घ लेख याची साक्ष देतो. तसेच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर अरविंद घोष यांनी ‘A GREAT MIND, A GREAT WILL’ या शीर्षकाचा मृत्युलेख लिहिला होता.
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी (पुढील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक झालेले) डॉ. के. ब. हेडगेवार आणि (पुढील काळात भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक झालेले) डॉ. बा. शि. मुंजे हे दोघेही अरविंद घोष यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना त्यांनी स्पष्टपणे नकार देत म्हटले, ”मी टिळकांचे स्थान घेऊ शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची निवड साफ चुकली असे मला स्पष्ट म्हणावेसे वाटते. मी तर सोडाच, पण त्यांची जागा घेऊ शकेल अशी कोणतीच व्यक्ती मला तरी दिसत नाही.” (क्रमश:)
- नैराश्यापासून सुटका – ०१ - September 19, 2025
- जीवन जगण्याचे शास्त्र – ०१ - August 14, 2025
- आत्मसाक्षात्कार – ०१ - July 17, 2025






