प्राणिक प्रवृत्तीचे रूपांतरण
सद्भावना – ०७
(श्रीअरविंद यांच्या पत्रामधून…)
इतरांविषयी आप-पर भाव, पसंती-नापसंती या गोष्टी मानवाच्या प्राणिक प्रकृतीमध्ये भिनल्यासारख्या आहेत. याचे कारण काहीजण आपल्या स्वतःच्या प्राणिक स्वभावाशी सुसंवाद राखतात आणि इतरजण मात्र तसे करत नाहीत; तसेच जेव्हा एखाद्याचा प्राणिक अहंकार दुखावला जातो किंवा माणसांनी कसे वागले पाहिजे याबाबतीत त्याच्या असलेल्या कल्पनांनुसार जेव्हा माणसं वागत नाहीत किंवा गोष्टी त्याच्या पसंतीनुसार घडत नाहीत तेव्हा तो असंतुष्ट होतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आत्म्यामध्ये आध्यात्मिक स्थिरता आणि समता, सर्वांविषयीची एक सद्भावना किंवा एका विशिष्ट अवस्थेमध्ये ‘ईश्वरा’खेरीज इतर सर्वांविषयी एक निश्चल अलिप्तता असते; चैत्य (psychic) अस्तित्वामध्ये सर्वांविषयी मूलभूतपणे समान दयाळूपणा किंवा प्रेम असते परंतु एखाद्याबाबत विशेष नातेही असू शकते – परंतु प्राण (vital) मात्र नेहमीच असमान असतो, पसंती-नापसंतीने भरलेला असतो.
साधनेद्वारे प्राणाला स्थिर-शांत केलेच पाहिजे; ऊर्ध्वस्थित आत्म्याकडून सर्व वस्तुमात्रांबाबतची त्याची शांत सद्भावना आणि समता आणि चैत्य अस्तित्वाकडून त्याचा सार्वत्रिक दयाळूपणा किंवा प्रेम यांचा स्वीकार प्राणाने करायला हवा. या गोष्टी होतील पण हे घडून येण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. राग, अधीरता किंवा नापसंतीच्या आंतरिक तसेच बाह्य प्रवृत्तींपासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे.
गोष्टी जर विपरित झाल्या किंवा चुकीच्या पद्धतीने घडून आल्या तर तुम्ही सहजतेने असे म्हटले पाहिजे की, ”श्रीमाताजींना सारे काही माहीत आहे,” आणि कोणत्याही संघर्षाविना शांतपणाने तुम्ही गोष्टी करत राहिल्या पाहिजेत किंवा करवून घेतल्या पाहिजेत.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 312)
- प्रामाणिकपणा आणि चिकाटी - April 30, 2026
- ईश्वराच्या निवासाचे दरवाजे - April 29, 2026
- अप्रामाणिकपणाचा अडथळा - April 28, 2026





