अतिमानसिक चेतनेचे अवतरण
विचार शलाका – ३०
चेतना ही एखाद्या शिडीसारखी असते. प्रत्येक युगामध्ये असा एखादा महान जीव असतो की, जो या शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालण्यासाठी आणि आजवर सामान्य चेतना जेथवर जाऊन पोहोचू शकली नाही तेथवर जाण्यासाठी समर्थ असतो. उच्च अवस्था प्राप्त करून घेऊन, जडभौतिक चेतनेपासून पूर्णतः विलग होऊन जायचे असेही शक्य असते. पण मग तेव्हा व्यक्ती या शिडीचा भाग राहात नाही. परंतु, जडभौतिकाशी संपर्क न गमावता, या शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालण्याची क्षमता हीच, विश्वातल्या महान युगामधील महान उपलब्धी राहिलेली आहे. म्हणजे, ‘सर्वोच्च’ अवस्थेपर्यंत जायचे आणि त्याच वेळी, विविध पातळ्यांवरील, परस्परांमधील संबंध एक प्रकारच्या रिक्तपणाने तोडून न टाकता, सर्वोच्चाचा धागा तळागाळाशीदेखील जोडून ठेवायचा.
अशा रीतीने वर आणि खाली जाणे आणि तळाचे सर्वोच्चाशी ऐक्य घडवून आणणे हेच साक्षात्काराचे पूर्ण रहस्य आहे आणि हेच ‘अवतारा’चे कार्य असते. प्रत्येक वेळी जेव्हा तो अशा रीतीने शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालतो तेव्हा या पृथ्वीवर एक नवीन निर्मिती घडून येते.
श्रीअरविंदांनी ज्याला ‘अतिमानस’ (Supramental) असे संबोधले आहे त्या नवीन पायरीची भर त्यांनी घातली आहे. त्याचा परिणाम म्हणून, चेतना ही अतिमानसिक जगामध्ये प्रवेश करू शकेल आणि तरीही ती स्वतःचे वैयक्तिक रूप, तिची पृथगात्मकता (individualization) टिकवून ठेवू शकेल आणि एका नवीन निर्मितीच्या प्रस्थापनेसाठी खाली अवतरू शकेल. अर्थातच ही काही अंतिम निर्मिती असणार नाही, कारण जीवाच्या या पुढच्याही अधिक श्रेणी असतात. परंतु सध्या तरी आम्ही ही अतिमानसिक चेतना अवतरीत व्हावी म्हणून कार्यरत आहोत. त्याचा परिणाम म्हणून या जगाची पुनर्रचना होईल, या विश्वामध्ये सत्य दिव्य व्यवस्था पुन्हा एकवार परतेल.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 178-179)
- नैराश्यापासून सुटका – ३३ - October 22, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३२ - October 21, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३१ - October 20, 2025







